मुक्त संवाद

विस्मरणाच्या अरण्यात : निरामयतेने जगण्याचा आग्रह धरणारी कविता

मानवी मूल्यांची झपाट्याने होत चाललेली पडझड, नात्यांतील वाढता कोरडेपणा आणि अस्तित्वाच्या विस्मरणात हरवत चाललेला माणूस — अशा काळात प्रेषित सिद्धभट्टी यांचा ‘विस्मरणाच्या अरण्यात’ हा कवितासंग्रह करुणा, प्रामाणिकपणा आणि निरामय जगण्याचा आग्रह धरणारा संवेदनशील स्वर ठरतो. स्मृती, नाती, आत्मशोध आणि निर्मितीशीलतेच्या निष्ठेचा मागोवा घेत या कविता वाचकाला अंतर्मुख करतात आणि अधिक सुसंस्कृत मनुष्यत्वाचा शोध घ्यायला भाग पाडतात.

मनीषा उगले

मानवी जीवनमूल्यांचा वेगाने ऱ्हास होत असलेल्या आजच्या काळात, प्रेषित सिद्धभट्टी हा कवी ‘माणूसपण सांभाळत’ निरामयतेने जगण्याचा आग्रह धरणारी कविता लिहितो आहे. ‘विस्मरणाच्या अरण्यात’ हा अलीकडेच प्रकाशित झालेला त्याचा कवितासंग्रह याच विचारव्यूहाची साक्ष देतो. जगाकडे पाहण्याची त्याची दृष्टी कमालीची कारुण्यगर्भ आहे. भूतकाळातील स्मृतींची आवर्तने त्याच्या अस्तित्वाला वेढून राहिली असून, त्यांच्याच पार्श्वभूमीवर तो वर्तमान जगण्याचा अन्वयार्थ लावताना दिसतो. या संग्रहात जिवलगांविषयी कृतज्ञतेने लिहिलेल्या काही महत्त्वाच्या कविताही आहेत. बाप आणि लेकातील अबोल नात्याबद्दल भाष्य करताना, त्याची कविता ‘शब्दांतून प्रेम व्यक्त करता न येण्यातली तगमग’ प्रभावीपणे मांडते. बाबांच्या आठवणींच्या थंड प्रकाशात हा कवी आपल्या जगण्याच्या नव्या वाटा शोधू पाहतो. काबाडकष्टात हयात घालवलेल्या, परंतु आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या मुलांच्या कर्तबगारीचा अभिमान बाळगत समाधानाने देह ठेवणाऱ्या आजीच्या हृदयंगम आठवणीही त्याच्या कवितेतून येतात.

दुःखमूल अनुभवांना सामोरे जातानाही या कवीची वृत्ती नकारात्मकतेत अडकून पडत नाही. ‘मोडका हार्मोनियम’सारख्या कवितेतून, विस्कळीत झालेल्या काळातही कौटुंबिक संस्कारांची वीण कशी टिकवून धरता येते, याचे अत्यंत चिंतनशील चित्रण त्याने केले आहे. ‘दुःखाच्या शेवटच्या ओळीस महापरिनिर्वाणाचा असतो पूर्णविराम’ असे व्याकुळ भावसंवेदन त्याच्या कवितेतून प्रकट होते. ‘सर्वांगसुंदर दुःखाचे मखर सांभाळताना’ जगण्याची ही यात्रा निरर्थक होऊ नये, यासाठी चाललेली त्याची धडपड त्याच्या कवितेला एक नवी आणि सखोल दृष्टी प्रदान करते.

पराकोटीच्या स्वार्थी आणि छद्मी जगामध्ये वावरतानाही हा कवी नितळपणे जगण्यावरचा आपला विश्वास ढळू देत नाही; म्हणूनच त्याच्या कवितांना प्रार्थनेचे मोल प्राप्त होते. ‘अस्तित्वाच्या अमीट पाऊलखुणा’सारख्या कवितेतून कवी पारदर्शक मैत्री आणि जिव्हाळा अशा निकोप मूल्यांवरील आपली श्रद्धा अधोरेखित करतो. तो जगाकडे केवळ स्वतःच्या नजरेतून पाहत नाही, तर ‘आपल्याही बाजूने दुर्बीण लावून बघितली माणसं’ असे म्हणत, इतरांच्या भूमिकेत शिरून सत्य तपासण्याची विवेकी भूमिका तो घेतो. ‘विखारी शत्रूलाही क्षणभंगुरतेच्या तराजूत तोललं’ अशा शब्दांतून जगण्याच्या वाटा निर्विषतेतून सुलभ करण्याची शहाणीव तो जपताना दिसतो.

जगण्याच्या कोलाहलातही स्वतःमधील करुणेचे बीज जपून ठेवण्याची तीव्र असोशी या कवीच्या ठायी आहे. अस्तित्वाच्या विभिन्न संदर्भांत स्वतःला वारंवार तपासून पाहण्याची प्रक्रिया त्याच्या मनात अखंड सुरू असते. ही आत्मशोधाची कविता बऱ्याचदा स्वगताच्या रूपाने समोर येते. समूहात असूनही कशातच नसल्याची एक अलिप्ततेची जाणीव त्याच्यात सतत जागी असते; त्यातूनच ‘अडकत जातो अर्थहीन हळवेपणाच्या गर्तेत’ अशी खंतही तो व्यक्त करतो. आयुष्यातील घटना-प्रसंगांचा तटस्थ लेखाजोखा मांडताना त्याच्यातील ही ‘परात्मभावना’ अधिक गडद होत गेलेली दिसते. त्याचवेळी, एक कुटुंबवत्सल माणूस म्हणून ‘आपल्या मायेची पाखर प्रत्येकाच्या जगण्यावर सतत असावी’ अशी असोशीही त्याच्या शब्दांतून व्यक्त होते. वाट्याला आलेल्या दुःखाचा समंजस स्वीकार करताना, अनुभवांच्या कटुतेचा वृत्तीवर परिणाम होऊ न देण्याची मौलिक गोष्ट तो साध्य करू पाहतो. आपल्या व्यक्तिगत दुःखाला वैश्विक करुणेचे अधिष्ठान देणाऱ्या या कविता आधुनिक काळातील ‘प्रार्थना सूक्तां’सारख्या भासतात.

निर्मितीशीलतेच्या प्रेरणेविषयीचे एक अखंड चिंतन या संग्रहात पार्श्वभूमीसारखे व्यापून राहिले आहे. यातूनच कवीच्या लेखनविषयक सत्त्वाची साक्ष मिळते. कवी म्हणतो:
“एकवेळ कोरेच ठेवीन खंडीभर कागद,
पण विकारी तडजोडीची वाळवी
लागू देणार नाही या चिरेबंद शिसवी
पुरातन परंपरेला.”
अशा शब्दांतून त्याची लेखनविषयक अव्यभिचारी निष्ठाच व्यक्त झाली आहे. लेखनाकडे तो अत्यंत गांभीर्याने पाहतो; त्याद्वारे स्वतःलाच पुन्हा नव्याने रचण्याचा प्रयत्न करतो. लेखनासाठी कुठल्याही चलाखीचे आडमार्ग त्याला मान्य नाहीत. “हे निर्मितीचे आई, तुझ्या घेतलेल्या वशाचे पावित्र्य; विकारी दलदलीत कमळासारखे स्वच्छ निरागस शब्दच वाट पाहत शोधत येतात,” ही त्याची व्रतनिष्ठा कवितेचा अस्सल वारसा जोपासणारी आहे.

“या रम्य जगास
माझाही लागावा हातभार
हीच एक आशा कायम ठेवली मनात
प्रेमाची भाषा शिकत
प्रेमाचा होऊन गेलो…”
असा जगण्याविषयीचा एक निर्मळ भाव कवीच्या ठायी दिसतो. या कविता म्हणजे ‘विस्मरणाच्या गडद अरण्यात’ कवीने स्वतःच्या मुळांचा शोध घेत प्रकाशाकडे जाण्यासाठी केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे. हा कवितासंग्रह केवळ वाचनीय नाही, तर तो मानवी अस्तित्वाचा आणि मूल्यांचा शोध घेणाऱ्या एका प्रगल्भ मनाचे आर्जव आहे. या कविता वाचकाला अंतर्मुख करतात आणि अधिक प्रगल्भ मनुष्यत्वाकडे घेऊन जातात, हेच या संग्रहाचे सरसपण आहे.
तुला प्रकाशनाने या पुस्तकाची निर्मिती अतिशय सुबकपणे केली आहे. संग्रहाचे मुखपृष्ठ, मांडणी आणि आतील रेखाटने पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालणारी आणि कवितांचे गांभीर्य अधोरेखित करणारी आहेत. प्रेषित सिद्धभट्टी यांचा ‘विस्मरणाच्या अरण्यात’ हा कवितासंग्रह समकालीन मराठी कवितेत आपली एक वेगळी आणि सशक्त मुद्रा उमटवेल असे निश्चितपणे वाटते.

पुस्तकाचे नाव – विस्मरणाच्या अरण्यात (कवितासंग्रह)
लेखक – प्रेषित सिद्धभट्टी
प्रकाशक तुला प्रकाशन
पृष्ठे : १५२
मूल्य : ३०० ₹

पुस्तक परिचय / परिक्षण – मनीषा उगले

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

5 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

17 hours ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago