मुक्त संवाद

अस्तित्वशोधाचे टोकदार प्रश्नोपनिषद: ‘सगळेच ऋतू दगाबाज’

जगण्यातील विसंगती, नात्यांतील दुटप्पीपणा आणि स्त्री-अस्तित्वाच्या खोल जखमांना निर्भीड शब्दांत व्यक्त करणारा कविता ननवरे हिचा ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा कवितासंग्रह समकालीन मराठी कवितेत वेगळे स्थान निर्माण करतो. प्रेम, एकटेपण, अस्मिता, सामाजिक बंधने आणि जगण्याच्या जिजीविषेचा शोध घेताना ही कविता केवळ भावनिक राहत नाही, तर ती प्रश्न विचारते, अस्वस्थ करते आणि वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते.

मनीषा उगले

मराठी स्त्री कवितेच्या प्रस्थापित आणि साचेबद्ध चौकटींना छेद देणारे एक प्रखर भाष्य म्हणून कविता ननवरे हिचा ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा संग्रह समकालीन साहित्यात महत्त्वाचा ठरतो. यातील कविता स्वभावतःच कोणतीही भीड न बाळगता अत्यंत धीट आणि स्पष्ट स्वरूपात व्यक्त होणारी आहे. हा कवितासंग्रह म्हणजे केवळ एका व्यक्तीचे स्वगत नसून ते ‘कवितागत मी’च्या, विशेषतः स्त्री म्हणून असलेल्या अस्तित्वजाणिवेचे एक मर्मभेदी ‘प्रश्नोपनिषद’ आहे.

कविता ननवरे हिची कविता शब्दांच्या निव्वळ सजावटीच्या पलीकडे जात वास्तवाच्या धगीशी नाते सांगते. जे तिला सलते, जे अस्वस्थ करते आणि जे जगण्यातील विसंगती उघड्या पाडते, त्याला ती थेट भिडण्याचे धाडस दाखवते. ही पारदर्शकताच या कवितेचे सर्वांत मोठे बलस्थान आहे. बाईपणाचा कोश ओलांडून ही कविता जगण्याचा अवकाश समग्रपणे कवेत घेऊ पाहते. स्त्रीवादी जाणिवा हा या कवितेचा आत्मस्वर असला तरी त्याचे स्वरूप नारेबाजीचे नसून स्त्री आणि पुरुष नात्यातील सूक्ष्म सत्तासंबंधांच्या राजकारणाची चिकित्सा करण्याची भूमिका घेणारे आहे. समाजातील कर्मठ विचारसरणी आणि आधुनिक जगातील दांभिकपणा यांच्या पेचात अडकलेल्या स्त्रीच्या माणूसपणाचा ती शोध घेऊ पाहते. पुरुषाने तिच्या दैहिक ओळखीच्या पलीकडे जाऊन तिचे स्वतंत्र असणे समजून घ्यावे, अशी आस ती व्यक्त करताना दिसते.

स्त्री-पुरुष नात्यांतील या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वतःच्या अस्तित्वाचा संकोच करू पाहणाऱ्या ‘त्याला’ उद्देशून कवितेतील नायिका जेव्हा आवाहन करते, तेव्हा ती एका विवेकी पिढीची प्रतिनिधी म्हणून उभी राहते. “तुझ्या आयुष्याच्या प्रदीर्घ महानाट्याची / नांदी, संहिता अन् भरतवाक्यसुद्धा मीच आहे / हे विसरू नकोस मला मिठीत घेताना”, या ओळी म्हणजे या नायिकेने स्त्री म्हणून स्वतःच्या मध्यवर्ती भूमिकेची केलेली उद्घोषणाच आहे. प्रेमभावनेचे एक अतिशय व्यापक, समंजस आणि तरीही हळवे असे रूप या कवितांतून दृश्यमान झालेले दिसते. त्यादृष्टीने या संग्रहातील प्रेमकविता आवर्जून वाचण्यासारख्या आहेत.

या कवितासंग्रहाच्या ‘सगळेच ऋतू दगाबाज’ या शीर्षकातून कवयित्रीने परिस्थितीच्या आकलनातून काढलेला निष्कर्ष हाती येतो. तो नकारात्मक स्वरूपाचा आणि ठाम आहे. निसर्गातील ऋतूंप्रमाणे मानवी नाती आणि त्यांनी दिलेली आश्वासनेही वेळप्रसंगी दगा देतात, हे एक विदारक चित्र येथे दिसते. जेव्हा जगण्याचे सर्व सामाजिक आणि भावनिक आधार कोसळतात, तेव्हा कवीसाठी कविताच एक शेवटचा आधार उरते. मृत्यूशी आणि नैराश्याशी दोन हात करण्याची ताकद कविता तिला देते. “सरते शेवटी सगळेच ऋतू दगाबाज ठरतात / तेव्हा मी कागद पेन घेऊन / आत्महत्या पोस्टपोन केलेली असते / कितव्यांदातरी”, हे विधान आत्मसमर्पणाचे नसून जगण्याविषयीच्या जिजीविषेचे आहे.

अंधार आणि उजेड या प्रतिमांचा वापर कवयित्री अत्यंत सूचकपणे करताना दिसते. उजेड हा येथे लोकांताचे रूप म्हणून येतो, जिथे जगाची नजर असते, मुखवटे ल्यावे लागतात. तर अंधार हा उबदार एकांताचे प्रतीक म्हणून येतो, जिथे कवीला स्वतःशी प्रामाणिक राहता येते. “अंधार मिठीत देहाची घडी घालून / नुसतीच पहुडते मी / रात्रीच्या कॅनव्हासवर पसरलेल्या / भासआभासांच्या असंख्य तुकड्यांत”, असे म्हणताना हा अंधार स्वतःला शोधण्याची आणि स्वतःच्या दुभंगलेल्या अस्तित्वाचे तुकडे सांधण्याची जागा ठरतो.

एकटेपण ही कवीची एक जाणीवपूर्वक केलेली निवड असते आणि तेच अखेरीस कवीचे अटळ प्राक्तनही असते, ही भावना या कवितांतून अनेकदा आवृत्त होताना दिसते. या एकटे होत जाण्याच्या प्रक्रियेकडे कवितागत ‘मी’ ज्या साक्षीभावाने पाहते, तो भाव अस्वस्थ करणारा आहे. नात्यांमधले ताण, विसंवाद, चिंता, काळज्या आणि पुन्हा एकत्र येण्याची व्याकुळ असोशी यातून मानवी सुख-दुःखाच्या जाणिवा परिभाषित करण्याचा प्रयत्न ही कविता करते. जेव्हा नात्यातील संवाद आटतो आणि केवळ मौन उरते, तेव्हाची अस्वस्थता “तू कूस बदलशील या एकाच आशेवर / तग धरून आहे मी / तू मौनाची बाराखडी गिरवत असल्याच्या / या गिचमिड काळात” या ओळींतून गडद होते.

स्त्रियांच्या एकूण सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीचे अत्यंत सूक्ष्म वाचन या कवितांतून आढळते. मध्यमवर्गीय कौटुंबिक चौकटीत स्त्रीची होणारी कुचंबणा यात तीव्रतेने मांडली आहे. ‘पोलादी उंबरा’ ही प्रतिमा केवळ घराच्या उंबऱ्याचा निर्देश करत नाही, तर ती वर्षानुवर्षांच्या सामाजिक बंधनांचे आणि मानसिक मर्यादांचे प्रतीक आहे. केवळ तक्रारीचा सूर हा या कवितांचा स्वभाव नाही, तर स्वातंत्र्य, मुक्तता, समन्यायी समाजाचा आग्रह आणि अस्तित्वाचे नवे अवकाश शोधण्याची जिद्द या कवितेतून प्रकर्षाने जाणवते.

ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकला, त्यांनीच गिरवलेल्या “भणंगपणाच्या शापरेखा” या कवितेतून उघड होताना दिसतात. नात्यातल्या फसवणुकीचे आणि उपेक्षेचे शल्य त्यात स्पष्टपणे उमटताना दिसते. कवितेचे सत्त्व समजून घेत ते असोशीने जपण्याचे आर्त हे या संग्रहातील एक मौलिक सूत्र आहे. ‘मी शपथ घेते की’ या कवितेतून प्रगटलेली निष्ठा ही समस्त वाचकांशी आणि कवितेच्या चिरंतन मूल्यांशी असलेली एक प्रतिनिधिक नैतिक बांधीलकी आहे. “मी शपथ घेते की / चिमूटभर आशेनं आणि मूठभर आश्वासकतेनं / डोळे भरून कवितेकडं पाहणाऱ्यांशी / कायमच बांधील राहील माझी कविता”, ही शपथ म्हणजे कवयित्रीचा शब्दांच्या सामर्थ्यावर असलेला अढळ विश्वास आहे. ही कविता दुःखाचे सवंग प्रदर्शन टाळून त्याला एक वैश्विक परिमाण प्राप्त करून देते.

कविता ननवरे हिची ही कविता अशा पिढीचे प्रतिनिधित्व करते जिथे आता स्त्री गप्प बसणार नाही. ती प्रश्न विचारेल, ती स्वतःच्या अस्तित्वाचे हिशोब मांडेल आणि दगाबाज ऋतूंना घाबरून न जाता स्वतःची एक नवी सृष्टी शब्दांच्या माध्यमातून उभी करेल. सहस्त्रकांपासून चालत आलेल्या शोषणाबद्दल आणि संघर्षाबद्दलचा हा सवाल अंतर्मुख व्हायला भाग पाडतो, “बाया गिरवतायत / युगायुगांपासून बाया गिरवतात / अंधाराच्या पाटीवर उजेडाची अक्षरं / मग / बायांच्या आयुष्यातला अंधार अजूनही सरत कसा नाही?” बाजारकेंद्री मूल्यांनी व्यापलेल्या नवभांडवली अर्थव्यवस्थेतील जगात हरवत चाललेल्या सहसंवेदनेचा शोध कवितागत ‘मी’ अत्यंत प्रखरपणे घेताना दिसते. ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा कविता ननवरे हिचा कवितासंग्रह मानवी जीवनातील सुख आणि दुःखाच्या जाणिवांना नव्याने परिभाषित करण्याचा एक प्रामाणिक आणि दमदार प्रयत्न आहे.

पुस्तकाचे नाव : सगळेच ऋतू दगाबाज
लेखिका : कविता ननवरे
प्रकाशक : शब्द पब्लिकेशन, मुंबई
पृष्ठे : ११२
मूल्य : १९५ रुपये

पुस्तक परिचय/परिक्षण – मनीषा उगले

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

5 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

17 hours ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago