मुक्त संवाद

पत्रकारांनी जरूर वाचावे असे पुस्तक ‘वार्तांच्या झाल्या कथा’ News in the form of stories

दैनिक सकाळ मध्ये प्रदीर्घकाळ कार्यरत असणारे राजीव साबडे यांनी स्वतःच्या अनुभवांवर लिहिलेले वार्तांच्या झाल्या कथा हे पुस्तक आता पत्रकारितेत कार्यरत असलेल्या प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.

अरविंद जोशी, ज्येष्ठ पत्रकार, सोलापूर

श्री साबडे यांनी साडेतीन दशके आपली सेवा बजावलेली आहे आणि आता ते निवृत्त झालेले आहेत. म्हणजे एका परीने ते माझ्या पिढीतले पत्रकार आहेत. आता सध्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांनी आणि सोशल मीडियाने पत्रकारितेमध्ये जे नवे प्रवाह आणले आहेत ते माझ्या पिढीतल्या पत्रकारांना नक्कीच पटणारे नाहीत. पत्रकारितेतील कित्येक संकल्पना आता बदलून गेल्या आहेत आणि नेमक्या शब्दात सांगायचे तर बिघडून गेल्या आहेत.

अशा वातावरणात पूर्वीच्या पत्रकारितेतील काही संस्कारांचे दर्शन घडवणारे असे लेखन वाचण्यात आले की मनाला थोडे बरे वाटते. श्री साबडे यांनी स्वतः वार्तांकन केलेल्या काही घटनांचे सविस्तर विवेचन केलेले आहे. त्यात पुण्यामध्ये खळबळ जनक ठरलेले जोशी अभ्यंकर हत्याकांड, जनरल वैद्य यांची हत्या, त्यासंबंधात चालवले गेलेले खटले, आचार्य रजनीश यांची पूर्ण कहाणी, टेल्को, राजीव गांधी यांची हत्या, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीत झालेल्या शीख विरोधी दंगली, इस्रायल मधील युद्धजन्य परिस्थिती अशा काही विषयांचा समावेश आहे. या सर्व कथनाला त्यांनी ललित स्वरूप दिलेले आहे.

पत्रकार आणि लेखक यांच्यात एक मोठा फरक असतो. पत्रकार हा लेखक असतोच असे नाही. आणि त्याच्या बातमीच्या लिखाणाचा आकृतीबंध हा उलट्या त्रिकोणाचा असतो. म्हणजे घडलेली घटना आधी सांगितली जाते आणि पार्श्वभूमी नंतर दिली जाते. परंतु श्री साबडे यांनी आधी पार्श्वभूमी सहित सर्व घटना दिलेल्या आहेत आणि घडलेली घटना, तिचे परिणाम, त्यासंबंधातील न्यायालयीन कामकाज यावर क्रमाक्रमाने प्रकाश टाकलेला आहे. त्यांची ललित लिखाणाची शैली सुद्धा प्रभावी आहे. आणि त्यांनी कव्हर केलेल्या सगळ्या बातम्या आपल्याला माहीत आहेत परंतु त्यांच्या लिखाणातून त्या संबंधातील कितीतरी नवीन माहिती आपल्याला त्यांच्या या पुस्तकातून कळते.

ललित लेखक हे नेहमीच वस्तुस्थितीवर आधारून काहीतरी लिहिताना आपल्या पदरचा मालमसाला त्यात घालतात. आणि काही वेळा मूळ घटनांचा विपर्यास करण्याचे स्वातंत्र्य सुद्धा उपभोगतात. मात्र पत्रकाराला कोणत्याही स्वरूपात लेखन केले तरी हे स्वातंत्र्य घेता येत नाही. साबडे यांनी ते घेतलेले नाही त्यामुळे आपल्याला ललित लेखनाचा आनंद तर मिळतोच परंतु वस्तुस्थिती पासून त्यांची लेखणी कुठेही भरकटताना दिसत नाही.

दोन-तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेली फुट आणि त्या फुटीतून निर्माण झालेल्या सर्वोच्च न्यायालयातल्या खटल्यावर सोशल मीडियामध्ये सातत्याने चर्चा होत होती. विशेष म्हणजे ते वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना सर्वोच्च न्यायालयात काय झालेले आहे याचे वृत्त नित्य मिळत होते आणि त्यावरून प्रत्येक वेळी या खटल्याचा निकाल काय लागेल याचे अंदाज व्यक्त केले जात होते. माझ्यासारख्या गेल्या पिढीतल्या पत्रकाराला ही गोष्ट नक्कीच खटकत होती. कारण मी जी पत्रकारिता शिकलो तिच्यामध्ये, खटल्याचे वार्तांकन करावे परंतु निकाल काय लागेल याचे अंदाज व्यक्त करू नयेत असे शिकवलेले होते. परंतु असे अनेक संकेत बाजूला ठेवून सध्याची पत्रकारिता केली जात आहे.

मागच्या पिढीत मात्र या संबंधात कसा संयम पाळावा हे शिकवले जात होते. जनरल वैद्य यांच्या हत्येनंतर झालेल्या खटल्याच्या कामकाजाचे वार्तांकन करताना न्यायालयाची बेअदबी होणार नाही व लष्कराविषयी लोकांच्या मनातला आदर कमी होणार नाही अशा पद्धतीने आपण संयमाने कसे वार्तांकन करत होतो हे साबडे यांनी लिहिलेले आहे.

सध्याच्या पत्रकारांमध्ये हा संयम राहिलेला नाही. हाती पडेल ती माहिती तिखट मीठ लावून प्रसिद्ध करणे आणि त्यातून कोणाची बदनामी होत असली तरी त्याचे भान न ठेवणे हा सध्याच्या पत्रकारांचा बाणा झालेला आहे. अशा पत्रकारांनी ही संयमित पत्रकारिता करण्याबाबतचे संकेत या पुस्तकातून नक्कीच शिकून घेतले पाहिजेत.

या पुस्तकात जोशी – अभ्यंकर हत्याकांडा विषयीचा जो सविस्तर लेख आलेला आहे. तो पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या थरारक घटनांची आठवण जागी करणारा आहे. या प्रकरणाचे वार्तांकन करताना आपण स्वतःवर कोणती बंधने घालून घेतलेली होती याचे विवरण साबडे यांनी केलेले आहे. ते शब्दशः देतो म्हणजे नव्या पत्रकारांना एक धडा मिळेल.

‘सकाळ’ च्या परंपरेनुसार संपादक श्री. ग. मुंणगेकर यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे आम्ही या प्रकरणाच्या वार्तांकनात काही बंधने स्वतःवर घालून ती काटेकोरपणे पाळली होती. क्लेशदायक प्रसंगांची छायाचित्रे न छापणे, भीषणता दाखवणारी वर्णने न करणे , दुर्दैवी कुटुंबीयांच्या मुलाखती न घेणे, भावनातिरेकाने त्यांनी व्यक्त केलेला आक्रोश शब्दातून न मांडणे, निष्काळजीपणाचा दोष कोणावर तरी न ठेवणे, शक्य तिथे पोलिसांनी सुचवलेली बंधने पाळणे, गुन्हेगारांच्या तंत्राचे तपशील न देणे, इत्यादी.

यातून पत्रकारांना बरीच काही शिकण्यासारखे आहे. हा संयम मला महत्त्वाचा वाटतो कारण 26 / 11 च्या मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी आपल्या देशातल्या वृत्तवाहिन्यांनी अतिरेक्यांना पकडण्यासाठी आपल्या कमांडो कडून कोणते डावपेच आखले जात आहेत याचे वार्तांकन केले होते. त्यामुळे ते डावपेच पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या सूत्रधारांना कळत होते आणि ते अतिरेक्यांना त्यांची माहिती देऊन आपल्या कमांडोचे काम अवघड करत होते. तेव्हा वृत्तवाहिन्यांनी हे वार्तांकन करू नये अशी विनंती त्यांना करण्यात आली. परंतु या बेजबाबदार वृत्तवाहिन्यांनी अशा प्रकारे आपल्या हक्कावर ‘बंधन’ घातले जाणार असेल तर आपण सरकारच्या बातम्यांवर बहिष्कार घालू अशी धमकी दिली. या पार्श्वभूमीवर मला पत्रकारांनी कशी संयमित पत्रकारिता केली पाहिजे, या संबंधातील साबडे यांचे लेखन महत्त्वाचे वाटते.

वार्तांच्या झाल्या कथा या पुस्तकात याशिवाय पुणे शहराच्या विकासातील पारशी समाजाचे योगदान, राजीव गांधी यांचे योगदान आणि त्यांचा अध:पात, अटल बिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्याही झालेल्या काही चुका इत्यादी संस्मरणीय लेख आहेत. ते जरूर वाचले पाहिजेत. त्यांच्या निमित्ताने देशाच्या दोन दशकांचा राजकीय इतिहास आपल्यासमोर उलगडला गेलेला आहे.

पुस्तकाचे नाव – वार्तांच्या झाल्या कथा
लेखक- राजीव साबडे
प्रकाशकरोहन प्रकाशन
पृष्ठे ३२० किंमत ४९५ रुपये

गोष्टीरूपी बातम्या अर्थात  वार्तांच्या झाल्या कथा

मुद्रित माध्यमांचा पूर्ण दबदबा असतानाच्या काळात ३४ वर्षे पत्रकारिता केलेल्या राजीव साबडे यांनी स्थानिक विषयांपासून जागतिक स्तरापर्यंत अनेक घटना, घडामोडींचं प्रत्यक्षदर्शी वार्तांकन केलं. अनेक मोठ्या राजकारणी नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. देश हादरवणाऱ्या अनेक घटना, प्रसंगांचे भीषण परिणाम त्यांनी पाहिले, अनुभवले आणि वार्तांकित केले. पूर्वी केलेल्या आपल्या या वार्तांकनाच्या संदर्भाना ललित लिखाणाची जोड देऊन त्यांनी केलेल्या लेखांच्या मांडणीमुळे वाचताना ते प्रसंग जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात; मग ते पुण्यात घडलेलं जोशी-अभ्यंकर हत्याकांड असो, राजीव गांधींची हत्या असो, दिल्लीमधील शिखांचं हत्याकांड असो की पोलंडमधील ऑशविट्झच्या छळ छावणीची भेट असो… साबडेंनी ही सर्व वर्णनं इतकी जिवंत करतात की, काही काळापूर्वी वर्तमानपत्रात वाचलेली ती बातमी आता कथेसमान वाटू लागते. पुस्तकातील इतर लेख जसं की, पुण्याच्या विकासामधील बावाजींचं योगदान, टेल्को आणि पुण्याचं घनिष्ठ नातं, सोनेरी काळ अनुभवलेला रजनीश आश्रम आणि त्याची उतरती कळा, अटल बिहारी वाजपेयींसोबत अनुभवलेले मौलिक क्षण असे सर्वच लेख मनाला स्पर्शून जातात आणि तो काळ डोळ्यासमोर उभा करतात.

'सत्य-असत्याशी मन केले ग्राही, मानियले नाही बहुमता' या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे या लेखनात त्यांनी अनेकांना न रुचणारं आपलं कर्तव्यकठोर मतप्रदर्शनही केलं आहे. या 'कथा' एकमेकांपासून वेगळ्या असल्या तरी त्यातील समान सूत्र चिकित्सक पत्रकाराच्या वेधक दृष्टीचं आहे. अनेकांगी वार्तांकनातून निर्माण झालेल्या गोष्टीरूपी बातम्या अर्थात वार्तांच्या झाल्या कथा !

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: book recommendationBook reviewbook review MarathiCourt NewsCourt ReportingCrime JournalismCrime Reportingeditorial writingethical journalismFeature WritingGeneral VaidyaHistorical ReportingIndian Journalisminvestigative journalismIye Marathichiye NagariJoshi Abhyankar CaseJournalism BookJournalism Careerjournalism IndiaJournalism LessonsJournalism Reviewjournalism studentsJournalist ExperiencejournalistsMarathi BookMarathi BooksMarathi JournalismMarathi LiteratureMarathi Reviewmedia ethicsMedia Historymedia professionalsMedia Studiesnews analysisNews EthicsNews ReportingNews WritingNewsroom Culturepolitical journalismPress Ethicsprint mediaPune HistoryRajiv GandhiRajiv SabadeReporter GuideReportingReporting Skillsresponsible journalismRohan PrakashanSakal NewspaperWartanchya Zalya Kathaअटल बिहारी वाजपेयीइंदिरा गांधीइये मराठीचिये नगरीगुन्हे वार्तांकनगुन्हेगारी पत्रकारिताजनरल वैद्यजबाबदार पत्रकारिताजोशी अभ्यंकर हत्याकांडटेल्कोनैतिक पत्रकारितान्यायालयन्यायालयीन वार्तांकनपत्रकारपत्रकार अनुभवपत्रकारांसाठी पुस्तकपत्रकारितापत्रकारिता पुस्तकपत्रकारिता मूल्येपत्रकारिता शिक्षणपत्रकारितेचे धडेपुणे इतिहासपुस्तक परिचयपुस्तक परीक्षणपुस्तक शिफारसपुस्तक समीक्षाप्रिंट मीडियाबातमीबातमी लेखनमराठी पत्रकारमराठी पुस्तकमराठी साहित्यमीडिया अभ्यासमीडिया इतिहासमीडिया एथिक्समीडिया व्यावसायिकरजनीश आश्रमराजीव गांधीराजीव साबडेरोहन प्रकाशनलेखनवार्तांकनवार्तांच्या झाल्या कथावृत्तपत्रवृत्तलेखनवृत्तसंपादनशीख दंगलीसकाळसत्य पत्रकारितासंपादकसंपादकीयसंयमी पत्रकारिता

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

4 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

16 hours ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago