मधू शिरोडकर यांच्या कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : समाजातली एखादी गोष्ट चांगली असो वा वाईट हे दृष्टीस पडल्यानंतर वृत्तपत्रलेखक अधिक अस्वस्थ होतो. हातात लेखणी घेऊन ती घटना किंवा लोकांना भेडसावणारी समस्या तो लिहितो आणि एखाद्या दैनिकाकडे पाठवत नाही तोपर्यंत त्याला झोप येणार नाही. भले ती छापून येईल कि नाही याची पर्वा त्याला नसते परंतु समाजातल्या जागल्याची भूमिका घेत आपण व्यक्त होऊ शकलो याचे त्याला समाधान असते, असे प्रतिपादन पद्मश्री उदय देशपांडे यांनी काढले.
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे माजी अध्यक्ष मधू शिरोडकर यांच्या कालप्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन दादर येथे नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत आणि माजी संपादक प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते झाले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
श्री देशपांडे म्हणाले, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ही संस्था महाराष्ट्रातील अशा हजारो जागल्यांना एकत्र करून सातत्याने अनेक कार्यक्रम – उपक्रमांच्या माध्यमातून गेली ७५ वर्षांहून अधिक काळ चळवळीच्या रूपात कार्यरत आहे. समाजाच्यादृष्टीने हे काम फार महत्वाचे आहे.
वृत्तपत्र लेखक आणि नवशक्तीचा जमका सदर याचे ऋणानुबंध प्रभाकर पाध्ये यांच्याकाळापासून अखंड सुरू आहे. दररोज सर्वाधिक पत्रे नवशक्तीकडे येतात. हे नाते जपण्यासाठीच आम्ही त्यांना पूर्ण पानभर प्रसिद्धी देतो. यापुढच्या काळात वृत्तपत्रलेखकांकडून अभ्यासपूर्ण परंतु परखडपणे लिखाण व्हावे अशीही आमची इच्छा आहे.
प्रकाश कुलकर्णी, संपादक, नवशक्ती
पत्रलेखक आणि वृत्तपत्रलेखक संघासाठी मधू शिरोडकर यांचे कार्य किती महत्वाचे आहे याचे विवेचन नवशक्तीचे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी केले. वाचकांची मते किती महत्वाची आहेत हे स्पष्ट करताना जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये संपादकीय पानावर त्यांना प्रसिद्धी दिली जाते. या संदर्भात त्यांनी चर्चिल आणि ब्रिटिश साहित्यिकांचे दाखले यावेळी दिले.
ज्येष्ठ साहित्यिक अशोक बेंडखळे यांनी संस्थेचा पत्रवृत्तान्त लिहिताना संस्थेची वाटचाल आणि इतिहास कसा प्रगल्भ आहे हे सांगितले. समाजाशी आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांची जाण असलेले शेकडो लेखक या संस्थेतून निर्माण झाले आहेत. समाजातल्या सर्व थरातील मान्यवरांची संस्थेच्या व्यासपीठावर आलेली मंदियाळी पाहता, याचे गमक म्हणजे सुनियोजित कार्यक्रम करणारी ही संस्था आहे. मधू शिरोडकर यांनी ५० वर्षांपूर्वीची संघाची वाटचाल आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी माजी उपमहापौर अरुण देव, संघांचे माजी अध्यक्ष विजय कदम, माजी प्रमुख कार्यवाह विश्वनाथ पंडित, नंदकुमार रोपळेकर आणि दत्ताराम घुगे यांचीही भाषणे झाली.
संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रम प्रमुख दिगंबर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. माजी अध्यक्ष मनोहर साळवी यांनी आभार मानले.
कार्यक्रमात संघाच्या वतीने समाजप्रबोधनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या विश्वनाथ पंडित, अरुण खटावकर, लीना वालावलकर, श्रीनिवास डोंगरे, राजन देसाई, भाऊ सावंत, दीपक गुंडये, गुरुनाथ तिरपणकर, संजय साळगावकर, सूर्यकांत भोसले, अनंत दाभोळकर, नितीन कदम, दत्ता खंदारे, शिरीष बने, कमलाकर जाधव, पंकज पाटील आणि रामचंद्र जयस्वाल यांना ‘निर्भीड जागल्या’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच पत्रस्पर्धेत यश मिळवलेल्या विजय ना. कदम, मधुकर कुबल, नीता शेरे, रामचंद्र मेस्त्री आणि प्रा. जयवंत पाटील यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
