आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – अवकाळीचे वातावरण या आठवडाभरात कसे राहील ?
माणिकराव खुळे : महाराष्ट्रातील संपूर्ण कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, अमरावती अश्या २६ जिल्ह्यात शनिवार ( ता. ३ ) ते १० मे पर्यंतच्या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून अगदीच किरकोळ ठिकाणी एखाद्या- दुसऱ्या दिवशी विजा, वारा व गडगडाटीचे वातावरण राहून, झालाच तर अगदीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष असे घाबरून जाऊ नये. केवळ सावधानता बाळगावी, इतकेच.
ह्या वातावरणाचा प्रभाव विदर्भातील ७ जिल्ह्यात विशेष जाणवू शकतो व एखाद्या दुसऱ्या दिवशी किरकोळ गारपीटीचीही शक्यता नाकारता येत नाही, असे वाटते.
प्रश्न – येत्या आठवड्यातील तापमान कसे राहील ?
माणिकराव खुळे : सध्या महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान ३८ अंश तर काहीं ठिकाणी विशेषतः छत्रपती संभाजीनगर, धाराशिव ह्या जिल्ह्यात ४० अंशाच्या दरम्यान जाणवते. सदरचे तापमान जळगाव, जेऊर, सोलापूर, अकोला, अमरावती, वर्धा, ब्रम्हपुरी वगळता जवळपास सरासरी इतकेच जाणवत असुन उद्यापासूनच्या आठवड्यात महाराष्ट्रात हे तापमान अजुन एखाद्या दोन अंशाने खालावण्याची शक्यता आहे. उन्हाची ताप त्यामुळे अधिक सुसह्य जाणवेल, असे वाटते.
प्रश्न – उष्णतेची लाट वा रात्रीचा उकाडा जाणवेल का ?
माणिकराव खुळे : सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीचा उकाडा वा कुठेही उष्णतेच्या लाटेची शक्यता जाणवत नाही.
प्रश्न – हे अवकाळीचे वातावरण कश्यामुळे ?
माणिकराव खुळे : अरबी समुद्रात दिड किमी. उंचीपर्यंत घड्याळ काटा दिशेने फिरणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात ताशी ४५ ते ५० किमी वेगाने वाहणाऱ्या आर्द्रतायुक्त उत्तरी वाऱ्यामुळे हा वातावरणीय बदल समजावा.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.