मुक्त संवाद

ओढ पंढरीची.. भाग १ : आषाढी वारी.. आत्मिक उर्जा

मी बैलगाडी, ट्रक, दिवाबत्तीपासून ते आज हायटेक वारीचा प्रवास पाहिला आहे. आजच्या विज्ञान युगातही वारीचे महत्व कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. केवळ भारतीयांचेच नव्हे तर परदेशी अभ्यासक अभ्यास व आनंद म्हणून वारीत सहभागी होतात.

ॲड. शैलजा मोळक
मो. 9823627244

ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांचे व अष्टमीला श्री ज्ञानेश्वर महाराजांचे पंढरपूरसाठी प्रस्थान होते. दोन्ही संतांच्या पालख्या पुणे जिल्ह्यातून देहू व आळंदी येथून निघतात. वारकऱ्यांमधे बहुसंख्य लोक शेतकरी असतात त्यामुळे पाऊस पडला की पेरण्या करून शेतकरी हा पंढरीच्या विठूरायाच्या भेटीसाठी निघतो. पाठीवर पडशी घेतो व पालखी सोबत पायी निघतो. ऊन, वारा, पाऊस कशाचीच चिंता न बाळगता रहातो, जे असेल तर खातो, सोय- गैरसोय न पाहाता वारीचा आनंद घेतो. पाऊस नसेल तर तो पावसाला प्रार्थना करतो. पेरण्या झाल्याशिवाय त्याला निघता येत नाही. पाऊस नसेल तर तो विठूरायला आळवणी करतो.

मी तशी आध्यात्मिक व धार्मिक नाही. पण माझी मानसवारी मात्र माझ्या जन्मापासून अव्याहतपणे सुरू आहे. आजीबरोबर ४/५ वर्ष लहानपणी वारी केल्याचे आठवते. कळत्यापणी एक वर्ष आठ दिवस प्रत्यक्ष पायी वारी केली. माझा जन्म माऊलींचे वंशपरंपरागत चोपदारांच्या घरात झाल्याने वारीचे कायमच आकर्षण राहिले आहे. मी बैलगाडी, ट्रक, दिवाबत्तीपासून ते आज हायटेक वारीचा प्रवास पाहिला आहे. आजच्या विज्ञान युगातही वारीचे महत्व कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. केवळ भारतीयांचेच नव्हे तर परदेशी अभ्यासक अभ्यास व आनंद म्हणून वारीत सहभागी होतात.

‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम..विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ आणि पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ हा गजर टाळ-मृदुंगाच्या आवाजात झाला की अंगावर काटा येतो हा अनुभव वारीत घेता येतो.

वारीची सुरूवात हैबतबाबा पवार-आरफळकर यांनी सन १८३२ मधे केली. हैबतबाबा ग्वाल्हेरमधील शिंदे सरकारकारांकडे सरदार होते. शिस्तप्रिय अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी शिंदे सरकारांकडील सैन्यासही शिस्त लावली होती. एकदा ते आळंदीला आले असताना तेथे त्यांना साक्षात्कार झाला, त्यातून त्यांनी पालखी सोहळा सुरु केला. तो पुढे वाढतच गेला, परंतु त्यापूर्वी देहूच्या संत तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायणबाबा हे संत तुकाराम व संत ज्ञानदेवांच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरीला जात असत. काही वर्ष एकत्र पादुका नेल्या जात. कालांतराने समाज वाढत गेला व हैबतबाबांनी त्याला एक वेगळे शिस्तबध्द स्वरूप प्राप्त करून दिले. सैन्याप्रमाणे तुकड्या करून त्याला दिंडीचे स्वरूप दिले. त्यात कसे चालावे, कोठे थांबावे, मुक्काम कोठे करावा, दुपारचे जेवण,विसावा इ. गोष्टी हैबतबाबांनी घालून दिलेल्या नियमानुसार आजही वारकरी परंपरेने पाळतात.

माझ्या जीवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी॥
माझ्या वारीच्या गावात । रोज नवी नवलाई ॥
टाळ मृदुंग वीणेतून । रोज भेटे विठाई ॥
असा गजर करत वारकरी संप्रदायातील सारा शेतकरी समाज पाऊस पडला की पेरण्या उरकून वारीत सामील होतो. वारीत सारी दुःख, व्याधी, समस्या, कुटुंब विसरून विठ्ठल भक्तीत रममाण होऊन १८/२० दिवसात वर्षभराचे संचित, नवचैतन्य, उर्जा साठवून वारकरी आपल्या जीवाला आनंद मिळवतो.

वारीसोबतचा लवाजमा त्याकाळी शिंदे सरकार, अंकलीचे शितोळे सरकार यांनी दिला होता. त्याप्रमाणे आजही परंपरेने घोडे व ज्ञानेश्वरांच्या पालखीचा तंबू हा शितोळे सरकारांचा असतो. सुमारे ४०० कि. मी. हून घोडे आळंदीत पोहोचतात. ज्येष्ठ वद्य अष्टमीला पालखी प्रस्थान सोहळा होऊन पालखी आजोळघरी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मार्गस्थ होते आणि १८ दिवसांनी आषाढ शुध्द दशमी दिवशी पालखी पंढरपुरला पोहोचते.

एक तरी ओवी अनुभवावी प्रमाणे आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी असं म्हटलं जातं. एकदा वारी केलेली अनेक माणसं ही कायमची वारीला जोडली जातात. वारीत स्त्री – पुरूष शेतकरीच नव्हे तर तरूणाई, सुशिक्षित, डॅाक्टर, इंजिनिअर, शिक्षक, अलीकडे आयटी क्षेत्रातील मुलंही मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात.

अगदी एमबीए करणारी मुलं सुध्दा वारीचे व्यवस्थापन शिकायला, पहायला, अनुभवायला जातात. वारी हे एक रात्रीचे गाव असते. रात्री ते वसते व सकाळी उठून चालायला लागते. वारी म्हणजे भारतीय संस्कृतीचं चालतं बोलतं मंदिर. वारी म्हणजे समानता, समता, बंधुता, मानवतां, सर्वधर्मसमभावाचे प्रतिक. याचाच अर्थ संत विचारातील सर्व मूल्यांचा अंतर्भाव आपल्या राज्यघटनेत डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला दिसतो. म्हणूनच आज वारीसोबत संविधान दिंडी, निर्मल दिंडी, स्वच्छता दिंडी, आरोग्य दिंडी, पर्यावरण दिंडी, नेत्रदान दिंडी, अंनिस दिंडी अशा विविध प्रकारच्या दिंडी आपापल्या विचारांच्या प्रचार प्रसारासाठी सहभागी होतात. यात वारकऱ्यांची सेवा करण्यापासून त्यांचे विविध विषयी प्रबोधन करण्याचे काम केले जाते.

वारीतील दररोज मुक्कामाच्या जागी होणारी समाजआरती, गोल व उभी रिंगणे व त्या नंतरची उडी व खेळ, भारूड विरंगुळा म्हणून अनुभवलाच पाहिजे. संत ज्ञानेश्वर व सोपानकाका बंधुभेट, नीरास्नान, वाखरीतून माऊलींच्या पादुका श्रीमंत शितोळे सरकारांच्या गळ्यातील पादुका, ज्ञानदेव-विठ्ठल भेट हे सारं हृदयस्पर्शी व नेत्रदीपक असते. नदीचे पाणी येते आणि ओसरते पण भक्ती कधीच ओसरत नाही. वारीत प्रत्येक क्षणाला ती वाढतच राहाते. वारकरी वारीत चालताना अखंड नामस्मरण, भजन, हरिपाठ म्हणत भक्तीरसात तल्लीन होऊन जातात. वारीतील अभंगाचे क्रम व नियम ठरलेले असतात. सकाळी रूपाचे, भूपाळी, वासुदेव, आंधळे, पांगळे,गौळणी इ. व दुपारी जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरंपरेचे अभंग,नाटाचे अभंग शिवाय ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात. हरिपाठ झाल्यावर भूमीला स्पर्श करून वंदन केले जाते. परंपरेत शिस्त फार महत्वाची मानली जाते.

वारीत विविध जातीधर्माच्या लोकांना मान आहे. मराठा, माळी, ब्राह्मण, गुरव, सोनार, भोई, वडार, कासार, सुतार, शिंपी, सर्वधर्मीय गावकरी, मुस्लीम, बौध्द, परीट, धनगर असे सर्वांना विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मान आहेत. म्हणजेच वारी हिंदुत्ववादी लोकांची नाही. तो एक वेगळा लेखाचा विषय होऊ शकतो. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत सुमारे २३ दिंड्या या बौध्द व हिंदू मागास समजणाऱ्या समाजाच्या आहेत. सुमारे २५० हून अधिक दिंड्या या आळंदी ते पंढरपूर चालतात. मराठा सोडले तर इतर उच्चवर्णीय समाजाच्या विशेष दिंड्या वारीत दिसत नाहीत.

वारी शिकवते लीनता, नम्रता, आपुलकी, प्रेमभावना, समानता, बंधुता, भगिनीभाव. वर्षातून एकदाच भेटणारी, कडकडून मिठी मारणारी, परस्परांच्या पाया पडणारी,वाळवंटातून निरोप घेताना डोळ्यांतून अश्रू गाळणारी माणसे इथे भेटतात. निमंत्रण, पत्रक, निरोप नसलेल्या या वारीत कोणालाच काही कमी पडत नाही. हौशे, गवशे, नवशेही या वारीत सामील होतात. वारी सोडून असलेली वारी म्हणजेच दिंड्या व्यतिरिक्त चालणारी वारी ही वारीइतकीच मोठ्या संख्येने सहभागी असते.

सुमारे ५/१० लाखांचा समुदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर तामीळनाडू, आंध्र, कर्नाटक, गोवा, हरियाणा, उत्तरप्रदेश अशा परप्रांतातून तसेच परदेशातूनही वारीचा अनुभव घ्यायला येतात. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानकाका, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम अशा सात महत्वाच्या पालख्यांबरोबर शेकडो विविध संतांच्या पालख्या विविध मार्गांनी येऊन वाखरीत एकत्र भेटतात. वाखरीतील संतमेळा पाहून ‘विठू माझा लेकुरवाळा’ हे काल्पनिक चित्र डोळ्यांसमोर येते. वारकरी देवाला भेटायला पंढरीला जातात ही भावना वारकऱ्यांची नसून ते माऊली, तुकोबा व इतर संतांना घेऊन विठ्ठल भेटीला जातात ही भावना मनांत असते. कितीही श्रम झाले तरीही माऊली त्यांना बळ देते, विश्वास देते या भावनेतून हा मोठा पल्ला ऊन, वारा, पाऊस यासह वारकरी अतिशय आनंदाने ही वाट चालतात.

संत ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वासाठी- ‘आता विश्वात्मके देवे… ‘ हे पसायदान मागितले. तर संत तुकारामांनी – ‘हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥’
हे मागणे विठ्ठलाकडे मागितले. म्हणूनच संत ज्ञानेश्वर हा श्वास व संत तुकाराम हा निःश्वास असे म्हटले जाते.
चला तर मग.. आपणही वारीचा आनंद व अनुभव एकदा तरी घ्याच..!

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

10 hours ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

23 hours ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

1 day ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

1 day ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

2 days ago

स्त्रीवादी साहित्याची नवी दिशा : डॉ. ऊर्मिला चाकूरकर यांचे अभ्यासपूर्ण अध्यक्षीय भाषण New direction of feminist literature

स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…

2 days ago