fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
July 11, 2026
मुक्त संवाद

वारी – सांस्कृतिक संचित वैभव… Wari Cultural Spiritual and Social Heritage

पंढरपूरच्या दिशेने टाळ-मृदुंग, भगवे पताके आणि विठ्ठलनामाच्या गजरात चालणाऱ्या वारकऱ्यांची पारंपरिक वारी दर्शविणारे चित्र.
आषाढी वारी ही केवळ पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाची यात्रा नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अखंड प्रवाह आहे. शेकडो वर्षांची संतपरंपरा, समतेचा संदेश, लोकसंग्रहाची भावना आणि भक्तीचा उत्सव यांचा अद्वितीय संगम वारीत अनुभवायला मिळतो. जाती-पाती, श्रीमंती-गरिबीचे भेद विसरून लाखो वारकरी 'ज्ञानोबा-तुकोबा'च्या नामघोषात सहभागी होतात. बदलत्या काळातही माणसाला माणसाशी आणि माणसाला परमेश्वराशी जोडणारी ही परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचे अमूल्य संचित म्हणून आजही तितक्याच तेजाने उजळून निघते. देहू आणि आळंदी येथून पंढरपूरकडे वारीचे प्रस्थान झाले आहे. या वारीच्या निमित्ताने लिहिलेला हा लेख…

लहू गायकवाड,
नारायणगाव मोबाईल -

महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वारकरी संप्रदाय आणि वारी हे दोन महत्त्वपूर्ण सांस्कृतिक पैलू आहेत.
एक तरी वारी अनुभवावी कारण
सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्या दोन्ही घटकांना सामावून घेऊ शकेल इतका वारी शिवाय मोठा घटक क्वचितच असू शकेल.
माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईल गुढी. वयाच्या सोळाव्या वर्षी संत ज्ञानेश्वर यांनी ही अभिलाषा व्यक्त केली होती.

मध्ययुगीन महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाप्रमाणे अनेक संप्रदायांचा जन्म झाला. वारकरी संप्रदायाची परंपरा भक्त पुंडलिक आणि ज्ञानदेवांपासून सुरू झाली.
वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला.
म्हणून संत बहिणाबाई चौधरी लिहितात.
संत कृपा झाली l
इमारत फळा आली l
ज्ञानदेवे रचिला पाया l
उभारले देवालया l
नामा तयाचा किंकर l
तेने केला हा विस्तार l
जनार्धन एकनाथ l
खांबा दिला भागवत l
तुका झालासे कळस l
भजन करा सावकाश l

वारकरी संप्रदायाला भक्कम आणि परिपक्व करण्याचे काम वारी करत आहे. गरीब असो की श्रीमंत नाही कोणी जात भेद सर्व माणूस माणूस आणि पांडुरंगाचा वारकरी एवढा एकच नामघोष वारीत आहे. कोणत्याही जातीच्या माणसाला भक्तिपंथाच्या माध्यमातून अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठीचा मार्ग म्हणजे वारी होय.

वारी मधून विठ्ठल भक्ती समवेतच समाजप्रबोधन आणि सामाजिक ऐक्य साधण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न केले जातात. सदानंद मोरे आपल्या तुकाराम दर्शन ग्रंथात लिहितात. वारीचे परंपरा ही संत तुकाराम महाराज यांच्या घरात पिढ्यान पिढ्या असल्याचे सांगून वारी हा कृषिजन सोहळा असल्याचे ते प्रतिपादन करतात.
पंढरपूरामध्ये मंदिरातील तुळईवरील एका शिलालेखात 71 व्या ओळीमध्ये वारीचा उल्लेख आहे. देविदास पोटे यांनी वारी नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यात ते लिहितात, वारीला महाराष्ट्राच्या धार्मिक जीवनातला सर्वात मोठा प्रभाव असे म्हटले पाहिजे त्याचप्रमाणे वारी हे महाराष्ट्राचे वैभव असल्याचे विवेचन ते करतात. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी वारकरी संप्रदाय संतांचा भक्ती योग या ग्रंथाची मांडणी केली.

पंढरपूर प्रमाणेच महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या विविध भागांमधून पंढरपूरला येणाऱ्या अनेक वाद्यांविषयी त्यांनी उत्तम भाष्य केले आहे. श्री रामचंद्र देखणे यांच्या मते पंढरीच्या वारकऱ्यांचे आनंद विश्व म्हणजे पंढरपूरची वारी ज्ञानोबा आणि तुकाराम या विश्वाची ऊर्जा कसे आहेत याविषयीची त्यांची मांडणी आहे तसेच पंढरपूरची वारी म्हणजे महाराष्ट्राचे चालते बोलते लोकविद्यापीठ होय. याशिवाय वारी या विषयावर अनेक मान्यवरांनी लेखन केले आहे.

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी सामाजिक धार्मिक आर्थिक व राजकीय विश्लेषणकरून विविध विषयावर लेखन करून विचार मांडले त्या लिखाणातही त्यांनी वारकरी परंपरेवर प्रकाश टाकला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये एकादशी नावाचा शब्द आहे. त्याचा मराठी अर्थ असा आहे एक दिवस देवासाठी देणे. आणि वारी म्हणजे वर्षातून एकदा पंढरपूर येथे पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणे. याविषयी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात.
तुका म्हणे तुम्ही l
चाले या वाटे l
भरवशाने तयाl
भेटे पांडुरंग l

मराठी विश्वकोशाच्या 16 व्या खंडामध्ये वारीविषयी छान मजकूर दिला आहे. तो असा…
वारी करणारा’ ह्या अर्थाने ‘वारकरी’ हा शब्द वापरण्यात आलेला आहे. ‘वारी’ ह्या शव्दाचा अर्थ यात्रा, नियमित फेरी, व्रत, येरझार असा दिला जातो, हे लक्षात घेतल्यास आपल्या उपास्य देवतेच्या-मग ती कोणतीही असो-यात्रेला जो नियमितपणे, एक व्रत म्हणून जातो, तो ‘वारकरी’ असे म्हणता येईल. येरझारांमध्ये जी वारंवारता आहे, तीही येथे अभिप्रेत आहे. तथापि वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूरच्या विठोबाशी संबंधित असलेला वारकरी संप्रदाय, असाच अर्थ घेतला जातो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे विठोबा वा विठ्ठल वा पांडुरंग ह्या आपल्या उपास्य दैवताच्या वारीला ह्या संप्रदायाने जितके महत्त्व दिले आहे, तितके अन्य कोणत्याही पंथाने त्याच्या उपास्य दैवताच्या वारीला दिलेले नाही. वारकरी संप्रदायाच्या आचार धर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा-म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीस व कार्तिक शुद्ध एकादशीस – श्रीविठ्ठलाची वारी पंढरपूर क्षेत्री जाऊन केली पाहिजे. शुद्ध माघी एकादशी व शुद्ध चैत्री एकादशी ह्या दोन दिवशीही पंढरपूर येथे मोठ्या संख्येने वारकरी जमतात. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात. त्यांतही आषाढीला महत्त्व विशेष आहे. ज्यांना वर्षातून एकदाच-म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला-येणे शक्य असते, त्यांनी तसे केले तरी चालते परंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणे, ही वारकऱ्यांची मुख्य साधना होय. श्रीज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर प्रतिवर्षी कार्तिक वद्य एकादशीस वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीलाही नियमाने जमू लागले.

वारकरी संप्रदायाला ‘माळकरी संप्रदाय’ असेही एक पर्यायी नाव आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथांत माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही. माळ घालणे, म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. वारकरी संप्रदायात माळ म्हणजे निव्वल स्मरणी नव्हे.
वारकरी कसा हवा तर
अंतरी निर्मळ l
वाचेचा रसाळ l
माळ त्याचे गळा
असो नसो l
यास खरा वारकरी म्हणतात.

वारकरी संप्रदाय याविषयी अधिक माहिती वाचायची असेल तर आपल्याला गीता भागवतपुराण ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरकृत हरिपाठ, संस्कृतातील भागवतपुराणाच्या एकादश स्कंधावरील संत एकनाथकृत एकनाथी भागवत, भागवतपुराणाच्या द्वितीय स्कंधाच्या नवव्या अध्यायातील ३२ ते ३५ अशा चार श्लोकांवर एकनाथांनीच लिहिलेले चतुःश्लोकी भागवत, एकनाथांचा हरिपाठ आणि तुकारामांची अभंगगाथा , हे ग्रंथ वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत होत. त्यांतही ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकोबांची अभंगगाथा, ही वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी मानली जाते. ह्या संप्रदायातील इतर संतांच्या रचनाही वारकरी अर्थातच आदराने वाचतात.

लाखो वारकरी प्रतिवर्षी पंढरपूर येथे जमतातच परंतु पंथाची दीक्षा न घेतलेले अनेक विठ्ठलभक्तही येतात. आंध्र-कर्नाटकांतून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते. पंढरपूरला आल्यानंतर सर्व वारकरी चंद्रभागेत स्नान करून श्रीपांडुरंगाचे व पुंडलिकाचे दर्शन घेतात. पंढरपुरात आल्यावर पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी भक्तराज पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. मग गावप्रदक्षिणा होते. उरलेला वेळ भजन-कीर्तनात जातो. इतर तीर्थांच्या तुलनेत पंढरपूरचे एक वैशिष्ट्य, म्हणजे इथे तीर्थोपवास करीत नाहीत, श्राद्ध, मुंडण हेही नाही. आषाढी आणि कार्तिकीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे शुद्ध दशमीपासून प्रत्येक फडावर भजन-कीर्तनांचा कार्यक्रम असतो. रात्री हरिजागर होतो. प्रत्येक वारकरी आपापल्या फडावर कीर्तनासाठी जात असला, तरी इतर फडांवरचे कीर्तन वा भजन ऐकायला कोणालाच मज्जाव नसतो.
दशमीपासून चतुर्दशीपर्यंत असे कार्यक्रम चालु असतात.

पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पंढरपूरच्या दक्षिणेस, पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूर येथे काल्याचा कार्यक्रम असतो. गोपाळपूर हे एक वाडीवजा गाव आहे. तेथे गोपाळकृष्णाचे मंदिर आहे. सतराव्या शतकात (१६६६) त्याचे बांधकाम सुरू झाले होते. शामजी अनंत नांदिवरेकर व त्यांचे आप्त ह्यांनी हे मंदिर बांधावयास आरंभ केला आणि गजेंद्र यशवंत नावाच्या व्यक्तीने ते बांधकाम पूर्ण केले. त्या मंदिरात भजने गात दिंड्या जातात. गोपाळकृष्णाला काला दिला जातो. काल्याच्या लाह्या वारकरी परस्परांच्या मुखांत घालतात आणि त्यानंतर वारीची सांगता होते. घरी गेल्यावर कानवल्यांचे (मुरडीव) भोजन करतात. इतके झाले म्हणजे यात्रा संपते.

विठ्ठलाच्या उपासनेत ह्या गोपाळकाल्याचे महत्त्व फार आहे. हा गोपाळकाला आणि वैदिक काळी पूषन् ह्या देवाच्या उपासनेसाठी बनविण्यात येणारा करंभ ह्यांच्यांत काही अभ्यासकांना एक निकटचे नाते जाणवलेले आहे. सातूचे पीठ आणि दही एकत्र करून हा करंभ तयार करीत. पंढरपूरचा विठ्ठलही ताकपिठाने संतुष्ट होतो. पंढरपूर येथील विठोबाच्या देवळाच्या पश्चिमेस एका बोळातल्या देवळात असलेला ताकपिठ्या विठोबा प्रसिद्धच आहे. पूषन् ह्या वैदिक देवाची दंतहीनता सोडली, तर त्याचे वर्णन गोपवेषधारी कृष्णाची आठवण करून देते. वृषभमुखाची काठी त्याच्या हातात असते. त्याने कांबळे परिधान केलेले असते. तो गाईगुरांची खिल्लारे राखतो आणि गोपजनांना वाट दाखवतो.

वारकऱ्यांना कोणत्याही गोष्टीचा मोह नसतो. त्याने संताप्रमाणे राहावे असा एक संकेत आहे.
वारकरी संतांनी राजाश्रयाची आस कधीही धरली नाही.
शिवाजी महाराजांचे आमंत्रण येताच ‘ दिवट्या छत्री घोडे ।
हे तो बऱ्यात न पडे’
आणि ‘ राजगृहा यावे मानाचिये आसे तेथे काय वसे समाधान?
अशी प्रतिक्रिया तुकारामांनी अभंगांतून दिली. सामान्य माणूस हाच ह्या पंथाचा कायम आधार राहिला.
लोकसंग्रह हे ह्या पंथाचे वैशिष्ट्य राहिले.

गीतेचे जे पाच पंचप्राण सांगितले आहे त्यातील लोकसंग्रह महत्त्वाचा एक प्राण आहे. प्रत्येक वारकरी आपापली कामे करूनच उदरनिर्वाह करीत असल्यामुळे भिक्षावृत्तीला ह्या पंथात थारा नाही. ह्या पंथाने तत्त्वचर्चेकडे पाठ फिरवली नाही आणि अंधश्रद्धेवरही आघात केले.
अज्ञानावर आधारलेल्या उपासनेचा त्यांनी निषेध केला
*आंगी लावूनियां राख।
डोळे झांकु नि करती पाप ॥
दाउनि वैरा्याची कळा।
भोगती नव्यांचा सोहळा ॥ 2॥
तुका म्हणे सांगं नकती।
जळो तयाची संगती ॥
वारीचे वर्णन विविध संतांनी आपल्या अभंगामध्ये केले आहे.
संत ज्ञानदेव लिहितात.
ऐसे वैराग्य हे करी l
तरी संकल्पचि सरे वारी
सुखे धृतिचीया धवळारी l
बुद्धी नांदे l
संत नामदेव महाराज लिहितात.
तरी तू पंढरीसी जाय एक वेळ l
पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी जन्मोजन्मी वारी घडली जया l
वारीचे महत्त्व प्रतिपादन करताना तुकाराम महाराज लिहितात.

पंढरीची वारी जयाचिये घरी l
पायधुळी शिरी वंदन त्याची l

पंढरपूर वरून वारी करून आलेल्या वारकऱ्याला गावात येतात सगळेजण त्याचे दर्शन घेतात.

वारीला जाण्यासाठी अनेक दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात.
दिंडी हा शब्द एक वाद्य आहे.
दिंडी दरवाजा असतो दिंडी म्हणजे डाळ किंवा खिडकी किंवा मोठ्या दरवाजाला लगत असलेले छोटे दार.
दिंडी म्हणजे वारकरी संप्रदायाचा भजन करणारा सुसंगतीत आणि विशिष्ट रचना असलेला आध्यात्मिक घटक. जो केवळ आणि केवळ भगवंताकडे घेऊन जातो.
दिंडीमध्ये हरिनामाचा गजर चालू असतो.
नामदेव महाराज लिहितात.
दिंड्या गरुटक्याचे भार l
मृदुंग वाजती अपार l
वैष्णव नाचती जय जयकार l
नादे अंबर गर्जत असे l
दिंडी ही परमात्म्याच्या महाद्वाराला पोहोचवणारी वाट आहे.

सोपे कर्म आम्हा सांगितले संती l
टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा l
दिंडीमध्ये टाळ आणि मृदुंग घेऊन भगवंताच्या नामाचा गजर केला पाहिजे असे आम्हाला संतांनी सांगितले आहे असे स्वतः तुकाराम महाराज सांगतात.
शेकडो वर्षांपासून सुरू असलेली वारी आणि दिंडीची सांस्कृतिक अध्यात्मिक परंपरा पुढे चालू राहिली पाहिजे. कारण ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासाचे संचित आहे.
अठरापगड जातीचे लोक दिल्लीच्या माध्यमातून एकत्र येतात आणि भेदभाव विसरून पांडुरंगाचे चरणी लीन होतात.
आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वारी असते.
जून महिन्यात पाऊस पडला की शेतकरी पेरणी करतो आणि पांडुरंगाच्या वाटेला जाण्याची सुरुवात करतो.
त्यावेळी केलेली पेरणी पुढील महिन्यात पिकामध्ये रूपांतरीत होते.
वारकरी विचारतो देवा मी तर रोप लावल्यानंतर पंढरपूरला आलो ते तूच सांभाळले.
आणि देव म्हणतो मी देवशयनी ते प्रबोधिनी एकादशी या काळात झोपलो होतो ते मी सांभाळले नाही.
त्यागासाठीची ही स्पर्धा सर्वोत्तम आहे.
आषाढी आणि कार्तिकी दोन्ही वाऱ्या महत्त्वाच्या आहेत.
संत एकनाथ लिहितात.
वारकरी पंढरीचा l
धन्य धन्य जन्म त्याचा l
जाये नेमे पंढरीशी l
चुको नेदी तो वारीशी l
आषाढी कार्तिकी
सदा नाममुखी l
एका जनार्दनी करी वारी l
धन्य तो ची बा संसारी l

अशा प्रकारे शेकडो वर्षापासून आलेले पंढरपूरच्या वारीचे हे पुण्यस्वरूप आपण जरी आता डिजिटल केले असले तरी ते माणसांना जोडणारे आहे त्याला तंत्रज्ञानाची जोड देणे उत्तम आहे .

कधी पर्यावरणाची वारी तर कधीही तरुण वारकरी सायकलवर पंढरपूर येथे जाऊन सायकलवारी काढतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ या विभागाचे विद्यार्थी वारीसोबत जातात. वृक्षारोपण करतात स्वच्छता करतात.आणि त्यांची वारी ही स्वच्छतेची वारी असते.

आधुनिक धावपळीच्या युगातही वारी टिकली पाहिजे वाढली पाहिजे आणि पुढच्या पिढीत गेली पाहिजे. तो आपल्या सांस्कृतिक वैभवाचा सांस्कृतिक संचिताचा ठेवा आहे. एका अर्थाने वारी म्हणजे प्रत्येकाला अंतर्मुख करायला लावणारी अध्यात्मिक यात्राच आहे.

Related posts

देहविक्रीसाठी हॉटेलवर बोलवलं अन्…

लाल मातीचे सुख !

पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम…

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!