विश्वाचे आर्त

शरीराच्या गावात विवेक हवा जागृत

राग, द्वेष, मत्सर, अहंकार, अहंपणाचा त्याग करून विवेकाने विकास साधावा लागतो. गावात जशी स्वच्छता साधली जाते तसे मनाची स्वच्छता येथे होते. आरोग्यही सुधारते. विकासासाठी मनाचे ऐक्य गरजेचे आहे. साधनेत श्वासावर ऐक्य साधून विकास होतो.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

ते विवेकाचे गाव । की परब्रह्मीचे स्वभाव ।
नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे ।। १३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा

ओवीचा अर्थ – ते विवेकाचे मुळ वसतीस्थान आहेत. आणि परब्रह्माच्या ठिकाणचे स्वभाव किंवा जणूं काय मूर्तिमंत ब्रह्मविद्येचे सजविलेले अवयवच आहेत.

राज्यात निर्मल ग्राम, आदर्श गाव, इको व्हिलेज, पर्यावरण समृद्ध गाव आदी योजना राबविण्यात येतात. सर्व योजनात श्रमदानास महत्त्व दिले आहे. गावाच्या एकीतून विकास साधला जातो. एकीच्या बळाची ताकद त्यातून स्पष्ट होते. पण सर्वच गावांमध्ये हे शक्य होत नाही. प्रश्न गंभीर होऊ लागले की ऐक्य वाढते. भीती पोटी ऐक्य येते. अडीअडचणीच्या काळातच देवाचे स्मरण होते. इतरवेळी देव भेटला तरी दर्शन घेण्याची बुद्धी होत नाही. यामुळेच आज अनेक शहरातील जुनी मंदिरे ओस पडलेली पाहायला मिळतात.

पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी गाव एकत्र येतो. पण गावात विवेक जागा असेल तरच प्रश्न सुटतो. अन्यथा हे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच पडून राहतात. प्रश्नाचे स्वरूप गंभीर झाल्यानंतर मात्र माघारी शिवाय पर्याय नसतो. अहंकार बाजूला ठेवून प्रश्न सोडविण्यासाठी एकत्र यावेच लागते. विकासासाठी अहंकार, अहंपणा बाजूला ठेवावा लागतो. तंटे, वाद, राग, द्वेष यांचा त्याग करावा लागतो. तरच विकासाची वाट सुकर होते. अनेक गावांनी विकासासाठी हेच मुद्दे अवलंबले आणि श्रमदानातून विकास साधला.

दारूबंदी, चराईबंदी, वृक्षतोडबंदी, लोटाबंदी, उघड्यावर शौचासबंदी असे अनेक उपक्रम राबवून गावात विवेक जागृत केला. अशा या योजनांमुळे गावाचे आरोग्य, स्वच्छता राखली गेली. जनजागृती करून पाणलोट विकासातून पाणीप्रश्न सोडविला. काही डोंगरकपारीतील गावांनी नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करून सायफनने थेट पाइपलाइनने पाणी आणून कायमचा प्रश्न मिटविला. ना वीज बिलाची झंजट ना पाणी बिलाचा तगादा. बारमाही पाण्याचा स्रोत गावाच्या वाड्यावस्त्यात आणून महिलांचे श्रम वाचवले.

हे सर्व विवेकाने, ऐक्याने शक्य झाले. एकीमुळेच देशास स्वातंत्र्य मिळाले. आत्मज्ञान प्राप्तीचा मार्गसुद्धा असाच आहे. शरीराच्या गावात विवेक जागृत ठेवायला हवा. राग, द्वेष, मत्सर, अहंकार, अहंपणाचा त्याग करून विवेकाने विकास साधावा लागतो. गावात जशी स्वच्छता साधली जाते तसे मनाची स्वच्छता येथे होते. आरोग्यही सुधारते. विकासासाठी मनाचे ऐक्य गरजेचे आहे. साधनेत श्वासावर ऐक्य साधून विकास होतो. अध्यात्माच्या विकासाची हीच पायरी आहे. आत्मज्ञान प्राप्तीसाठी शरीराच्या गावात विवेक जागा करा. ऐक्य आपोआपच साधले जाईल. एकीने अनेक प्रश्न सुटतात. मनाचा ढळलेला तोल सावरता येतो. खचलेल्या मनाला उभारी मिळते. मनाला आधार वाटतो. साधनेत मनाचे ऐक्य साधले तर विकास निश्चित आहे. ब्रह्मविद्येचा विकास तेथे निश्चित होईल.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

निंबाच्या निबोळ्यांतून उलगडलेले भक्तीचे महत्त्व

ज्ञानेश्वर माऊलींनी एका अत्यंत साध्या ओवीतून मानवी जीवनाचे गूढ तत्त्व उलगडले आहे.निंबाच्या झाडावरील विपुल निंबोळ्या…

3 hours ago

फडणवीस दिल्लीला खरचं जाणार का हो…

स्टेटलाइन – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न गाजतो आहे—मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार का? केंद्रीय…

2 days ago

डॉ. अतुल मोहोड यांची सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती

दापोली : येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड…

3 days ago

इंधन दराची अपारदर्शकता… मोदी सरकारचे अपयश ! Failure of Modi government

जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर मोठ्या प्रमाणावर कमी होत असताना भारतीय ग्राहकांना डिझेल, पेट्रोल व…

3 days ago

महाराष्ट्र बदनाम हुआ डार्लिंग तेरे लिये…!

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पाच्या पहिल्याच पावसातील त्रुटींवरून सुरू झालेल्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

3 days ago

शहाजीराजांचा दरबार – भारतीय सांस्कृतिक समन्वयाची प्रयोगशाळा

भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि ज्ञानपरंपरा यांना जोडणारा सेतू उभारण्याची कल्पना आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि…

3 days ago