Gurumantra to overcome the recession of real estate
सरकारने शहराबाहेरील भुखंड विकसीत करून तेथे बांधकामाचे प्रकल्प सरकारने रियल इस्टेट या प्रतिष्टेच्या उद्योगाला पुर्व पदावर आणण्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची नितांत गरज आहे. रियल इस्टेट ह्या उद्योगावर अनेक व्यवसायांचे भवितव्य अवलंबून आहे त्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने त्वरीत लक्ष देऊन या उद्योगाला उभारी देण्याची खूप गरज आहे. सरकारने याचा विचार करावा…
महादेव पंडीत
महादेव पंडीत
सांगली येथील वॅालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १९८९ च्या बॅचचे स्थापत्य अभियंता.
जिओटेक्नीकल व स्थापत्य सल्लागार म्हणुन जवळ जवळ ३० वर्षाचा मेरेथॅान अनुभव.
ईमेल : mip_68@hotmail.com
भ्रमनध्वनी : ९८२००२९६४६
अन्न, वस्त्र व निवारा ह्या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. निवारा ही गरज स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील रियल इस्टेट ह्या क्षेत्राशी संलग्न आहे. स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्राचा रियल इस्टेट हा विभाग आत्माच आहे. समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाचे आपले स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न असते आणि ते आपल्या हयातीत पुर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. प्रत्येकजण बरीच ओेढाताण करून आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पुर्ण करण्याच्या इराद्यानेच जीवन जगत असतात आणि त्यामुळेच रियल इस्टेट हा उद्योग नेहमीच भरभराटीत असतो. सन 2005 ते सन 2015 हा कालखंड रियल इस्टेट साठी खूपच सुवर्णमय होता.
रियल इस्टेट ह्या उद्योगामुळे सर्वच व्यवसायात आर्थिक उलाढाल होत असते आणि म्हणूनच ह्या क्षेत्राला चांगलाच दर्जा प्राप्त झालेला आहे. एका माणसाने स्वतःसाठी घर खरेदी केले तर, महानगरपालिका, राज्य सरकार, वीज महामंडळ, पाणी पुरवठा विभाग, तसेच केंद्र सरकार इत्यादी अशा अनेक सरकारी, निमसरकारी क्षेत्राला बराच महसूल मिळतो. घर बांधणीसाठी लागणाऱ्या सर्वसाधारण सामुग्रीचे कारखाने तसेच अनेक उद्योगधंदे अतिशय भरभराटीत असतात. त्याचप्रमाणे बँका, इलेक्ट्रीकल साधन सामुग्री, अंतर्गत सजावटीचे सर्व साहित्य, टीव्ही, फ्रीज, वातानुकुलित संच फर्निचर, स्टील फॅब्रीकेशन व मटेरियल टेस्टींग प्रयोगशाळा असे अनेक व्यवसाय रियल इस्टेट ह्या क्षेत्राशी अत्यंत जवळचे तसेच निगडीत आहेत. रियल इस्टेट ह्या उद्योगामुळे असंख्य कामगारांचा रोजी रोटीचा प्रश्न चुटकीसरशी निकाली होत असतो. अनेक अभियंते व वास्तू विशारद आपले कौशल्य पणाला लावून अनेक मनमोहक इमारती बांधत असतात त्यामुळे रियल इस्टेट हे क्षेत्र सर्वपरिचीत आहे आणि ह्याच कारणामुळे मानवाच्या दैनंदिन जीवनावर ह्या क्षेत्राची चढउतार दिसत असते.
भारत देशात अद्याप सर्वत्र इंटरनेट सुविधा पोहचलेल्या नाहीत आणि त्यामुळेच ऑनलाईन व्यवहार प्रचलित त्याचप्रमाणे अंगवळणी पडलेले नाहीत. सर्वत्र रोखीने व्यवहार चालतात आणि त्यामध्येच सर्वांना विश्वास वाटतो. अद्याप प्रत्येक कारागीराला बँकेचे व्यवहार सुद्धा कळत नाहीत त्यामुळेच नेहमीच ते रोखीने व्यवहार करत असतात. 07 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री साडे आठ वाजता अचानक रूपये पाचशे व रूपये एक हजार ह्या दोन्ही चलनी नोटा भारत देशाच्या चलनी व्यवहारातून बंद केल्या आणि आकस्मितरित्या रियल इस्टेट ह्या देशाच्या महत्वाच्या क्षेत्राच्या उन्नतीला अचानक खीळ बसली. अगदी नोटबंदी पासूनचे दुःखने अद्याप चालूच आहे. खरेतर रियल इस्टेट हा उद्योग बऱ्याच अंशी रोखीने चालायचा, पण अचानक संकट आल्यामुळे ह्या उद्योगाला सावरण्याचा अवधीच मिळाला नाही आणि आजतागायत रियल इस्टेट उद्योगाला पूर्वीच्या रूबाबात डोलण्यासाठी रामबाण औैषधच मिळालेले नाही.
नोटबंदीनंतर लगेचच 1 मे 2017 रोजी केंद्र सरकारने सर्व बिल्डरांना एका ठराविक चौकटीत बसविण्यासाठी रेरा या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी अंमलात आणली. रेरा या कायद्यामध्ये एकंदरीत 92 कलमे आहेत त्यातील काही जाचक कलमांमुळे रेरा कायदा हौशी बिल्डरांसाठी कर्दनकाळ तर कॉर्पोरेट क्षेत्रासाठी वरदान ठरलेला आहे. एकंदरीत रेरा ह्या कायद्यामुळे रियल इस्टेट ह्या उद्योगाला काही अंशी ब्रेक लागला असे म्हणणेच येथे सार्थ ठरेल.
नोटबंदी व रेरानंतर लागलीच एक देश एक कर या छत्राखाली सर्व व्यावसायिकांना आणण्यासाठी केंद्र सरकारने 01 जुलै 2017 पासून जीएसटी प्रणाली लागू केली आणि त्यामुळे सर्वच लहान मोठे, मध्यम व्यावसायिक अगदी अलगतपणे कराच्या जाळ्यात अडकले. 01 जुलै 2017 नंतर केंद्र व राज्य सरकारला मात्र दिवाळीचे दिवस येण्यास सुरूवात झाली. प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला सरकारी तिजोरीत मायंदाळ पैसा जमा होऊ लागला पण रियल इस्टेट व त्यांच्या अखत्यारीतील सर्व व्यावसायिकांना दिवाळखोरीची लागण होण्यास सुरूवात झाली.
नोटबंदी, रेरा व जीएसटी असे ठराविक अंतराने कायद्याच्या कक्षेतील नियम पण दैनंदिन व्यवहारातील हल्ले रियल इस्टेटवर येत राहिले. रियल इस्टेट मार्च 2020 मध्ये कात टाकून नवीन भरारी घेईल असे वाटत होते पण कदाचित नियतीच रियल इस्टेटवर नाराज झाली असेल असेच सध्या वाटत आहे. जानेवारी 20 नंतर थोडी थोडी रूळावर येणारी रियल इस्टेटची गाडी 22 मार्च 2020 पासून कोव्हीड 19 ह्या काळ्याकुट्ट चिखलास खोलवर रूतली आणि त्यानंतर आजपर्यंत सर्वांच्याच हृदयाचे ठोके चुकलेत असेच वाटते आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू लावला आणि भारतवासीयांना पुढील संकटाची तसेच लॉकडाऊनची चाहूल लागली. कोरोनाचा महाभयंकर धक्का इतका तीव्र होता की शहरापासून ते अगदी गावखेड्यापर्यंत सर्वजण चिंतातूर झाले आणि आता पुढे आपल्या जीवाचे काहीच खरे नाही अशी भिती कारागीर, कामगार, नोकरदार, छोटे मोठे पेटी ठेकेदार, कंत्राटदार आपआपली राहाती शहरे व कामधंदा सोडून मिळेल त्या वहाणाने तर काहीजण पायपीट करत आपआपल्या मुळ भागाकडे जाऊ लागले. खरेतर रियल इस्टेट हा उद्योग पैशाबरोबरच कुशल तसेच अकुशल कारागिरावर जास्त अवलंबून आहे. एप्रिल 20 ते ऑॅगस्ट 20 पर्यंतचा सर्व काळ कोव्हीडच्या लॉकडाऊन मध्ये वाया गेल्यामुळे रियल इस्टेट ह्या क्षेत्राची खूपच मोठी पडझड झालेली आहे आणि सप्टेंबर 20 पासून आजपर्यंत कामगार वर्गाच्या कमतरतेमुळे रियल इस्टेट ह्या उद्योगाची पुरती दैना झाल्याचे दिसून येत आहे.
घर विकत घेणारा प्रत्येक माणूस पैसे जमा करून घर घेत नाही आणि पैसे जमा करून घर घेणे कधीही शक्य नाही त्यामुळे प्रत्येकजण बँक या जवळच्या मित्राची मदत घेतात. बिल्डर आणि बँक ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक प्रकल्प बँकेसोबत संलग्न असतो त्यामुळे प्रत्येक नागरिकांचे घर घेण्याचे स्वप्न अगदी सहजपणे साकार होते. पण गेले १५ महिने घोंघावत असलेले कोव्हीड १९ हे संकट सामान्य माणसाला रोजचे दैनंदिन व्यवहार व जीवन चालवण्यास बरेच अडथळे निर्माण करत आहे, त्यामुळे सामान्य माणसाने सध्या तरी घर घेण्याचे स्वप्न बघण्याचे स्थगित केले आहे. सध्या रियल इस्टेट मध्ये घरांची मागणी खूपच अत्यल्प आहे त्यामुळे बँका सुद्धा काही अंशी रडकुंडीला आल्या आहेत. रियल इस्टेट सध्या खूप काळ्या कुट्ट अंधारातून वाटचाल करत आहे, त्यामुळे बँकांचे कर्ज विभाग अक्षरक्षः मेटाकुटीला आलेले आहेत. बँक आणि बिल्डरांकडे ग्राहकाने सध्या तरी पाठ फिरवली आहे.
रियल इस्टेट हा पूर्ण उद्योग निपचित पडल्यामुळे त्यावर नेहमीच आधारीत असलेला नोकरवर्ग सुद्धा कात्रीत सापडला आहे. नवीन प्रकल्प उभे राहत नसल्यामुळे जुन्या लोकांनाच नारळ मिळत आहे. त्यामुळे नवीन नोकरी धंदा निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रियल इस्टेटवर अवलंबून असणारे सर्व व्यवसाय व रोजगार थंडावले आहेत. एकूणच बिकट परिस्थितीत वाटचाल करणारा रियल इस्टेट हा उद्योग कधी उभारी घेतो आणि सर्वसामान्यांचे जीवन कधी सुरळीत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. डॉक्टर, शास्त्रज्ञ तसेच राजकरणी मंडळी कोव्हीडच्या बाबतीत काहीच रोखठोक भाष्य करत नसल्यामुळे सर्वत्र अनि॑श्चितता निर्माण झालेली आहे. कोणालाही काहीही सुचत नाही. सर्व चक्रच बंद पडल्यासारखे वाटत आहे त्यामुळे प्रत्येकजन सध्या काळजीपूर्वक पाय टाकत आहे.
कोव्हीडच्या लॉकडाऊनमुळे बरेच पदवीधर विविध क्षेत्रातील मिळालेल्या नोकरीच्या संधीला मुकलेले आहेत. काहींना नोकरीच मिळालेली नाही. मेट्रो शहरातील लोकल सेवा ही प्रत्येक शहराची रक्तवाहिनी समजली जाते, पण सध्या ती सर्वसामान्यासाठी पुर्णपणे बंद असल्यामुळे प्रत्येकाचे कामकाज पुर्णपणे थंडावलेले आहे. सर्वत्र खाजगीकरणाचे वारे वाहत असल्यामुळे सरकारी नोकर भरती प्रक्रीया बंद पडली आहे. रियल इस्टेट थंडावल्यामुळे रोजगार निर्मितीच थंडावली आहे त्यामुळे नोकरी धंद्याच्या शोधात युवकवर्ग भांबावलेला आहे. नोकरी नाही त्यामुळे घर नाही आणि घर नाही म्हणजे इतर सर्व गोष्टी नाही, मग सांगा बरे रियल इस्टेट हा उद्योग कशी उभारी घेईल ? रियल इस्टेट हा उद्योग मुख्यत्वे नोकरदारांवर अवलंबून असतो नोकरीची हमी असेल तरच कर्ज मिळते अन्यथा त्याला कर्ज मिळत नाही आणि कर्ज नाही तर घराचं स्वप्न पण नाही. तसेच गेल्या 15 वर्षात घरांचे भाव गगनाला भिडल्यामुळे सध्या गुंतवणूकदार पण या क्षेत्रामुळे पाठ फिरवून उभा आहे, याचे कारण आहे गुंतवणूकीवर योग्य तो परतावा मिळत नव्हता आणि आता कोव्हीडमुळे योग्य तो परतावा मिळण्याची धुसर शक्यता सुद्धा दिसत नाही त्यामुळेच आज रियल इस्टेट अगदीच मरणासन्न अवस्थेत असल्यासारखी दिसत आहे.
सरकारने रियल इस्टेट या प्रतिष्टेच्या उद्योगाला पुर्व पदावर आणण्यासाठी काही ठोस पावले उचलण्याची नितांत गरज आहे. रियल इस्टेट ह्या उद्योगावर अनेक व्यवसायांचे भवितव्य अवलंबून आहे त्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने त्वरीत लक्ष देऊन या उद्योगाला उभारी देण्याची खूप गरज आहे. सरकारने याचा विचार करावा…
सर्वांच्या अगदी जीवनांशी निगडीत असलेल्या उद्योगाला सरकारने हातभार लावण्याची अगदी नितांत गरज आहे. ग्राहकां सोबतच विकासकांना सुध्दा काही सवलती जाहीर केल्यानंतर नक्कीच रियल इस्टेट उद्योग फिनिक्स पक्षासारखी भरारी घेऊन सुवर्णमय रूबाबात नांदेल आणि त्यामुळे प्रत्येक भारतवासीयांचे घरांचे सुवर्ण स्वप्न साकार होईल.
सत्यपाल भिकी यांनी केले भाषांतर; हिंदी अनुवादानंतर पंजाबी आवृत्ती मुंबई ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहात बदलत जाणारे आर्थिक आणि भू-राजकीय समीकरण, पारंपरिक जागतिक वित्तीय संस्थांच्या वर्चस्वाला उभे…
दैविकी उदार वाणीने प्रज्वलणारे नवरसांचे दीप ज्ञानेश्वरीतील माउलींची प्रत्येक ओवी साधकाच्या अंतःकरणाला स्पर्श करून जीवनाकडे…
आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…
कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…