स्टेटलाइन
१९ जून १९६६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेने मराठी माणसाच्या हक्कांसाठी संघर्ष करत महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र स्थान निर्माण केले. मात्र, आज त्याच पक्षाच्या वारशावरून दोन नेतृत्वांमध्ये संघर्ष पेटला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना संघटनात्मक आणि सत्तेच्या बळावर आपली पकड मजबूत करत असताना, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वासमोर पक्षातील गळती, कमी झालेला जनसंपर्क आणि संघटनात्मक आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. सहा खासदारांच्या निर्गमनानंतर शिवसेनेतील हा संघर्ष आणखी तीव्र झाला असून, बाळासाहेबांच्या वारशाचे खरे राजकीय उत्तराधिकारी कोण, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
डॉ. सुकृत खांडेकर
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मुंबईत शिवसेना स्थापन केली. बाळासाहेबांच्या करारी आणि लढाऊ नेतृत्वाने शिवसेना नेहमीच धगधगत राहिली. मुंबईतील मराठी माणसाला ताठ मानेने उभे करण्यामागे ठाकरे व त्यांनी स्थापन केलेली शिवसेनाच होती. माझा नेता व माझा पक्ष अशी भावना बाळासाहेब ठाकरे व शिवसेना यांच्याविषयी मराठी माणसाच्या हृदयात निर्माण झाली. याच शिवसेनेने मुंबईतील कामगार क्षेत्रातील लाल बावटा चळवळ संपवली, याच शिवसेनेने दोन्ही समाजवादी पक्षांना संकुचित केले हे त्यांनाही समजले नाही. तत्कालीन बलाढ्य काँग्रेस पक्षाला अंगावर घेण्याचे काम याच शिवसेनेने केले.
भूमिपुत्रांना नोकऱ्यांमधे आणि घरांमधे ८० टक्के हक्काचा वाटा मिळाला पाहिजे यासाठी लढणारी हीच शिवसेना होती. भारतीय कामगार सेना , स्थानिय लोकाधिकार समिती, विद्यार्थी सेना अशा आघाड्यांवर शिवसेना नेहमी रस्त्यावर दिसायची. शिवसेना ही मुंबईतील मराठी माणासाची शक्ति होती, मराठी माणसाचे कवच होते. शिवसेना चार अक्षरांचा मुंबईत जबरदस्त दरारा होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या नावाचा सार्वजनिक जीवनात मोठा दबदबा होता. मातोश्रीवर रोज खुला जनता दरबार असायचा, आपले म्हणणे ऐकून घेणारा व न्याय मिळवून देणारा नेता अशी त्यांची जनतेत प्रतिमा होती.
दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, प्रमोद नवलकर, छगन भुजबळ, नारायण राणे, सुधीर जोशी, वामनराव महाडिक, सतीश प्रधान, लिलाधर डाके, शरद आचार्य, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार, सूर्यकांत महाडिक, सुभाष देसाई अशा अफाट जनसंपर्क असलेल्या नेत्यांची मालिका हे शिवसेनेचे वैभव होते. राज ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, एकनाथ शिंदे, गणेश नाईक ही पक्षाची श्रीमंती होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री होण्याचीही संधी मिळाली.
जोपर्यंत राज्यात शिवसेना- भाजपा युती होती तोपर्यंत गाडी रूळावर होती. पण ज्या दिवशी सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपाला दूर सारून आणि काँग्रेसशी आघाडी करून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच भाजपच्या रडावर त्यांचे नाव नोंदवले गेले. पंचवीस वर्षांची युतीतील मैत्रीचे राजकीय दुष्मनीत रूपांतर झाले. त्याचे परिणाम उध्दव व त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सतत चार वर्षे भोगावे लागत आहेत. पक्षाच्या सहा खासदारांनी उद्धव यांच्या नेतृत्वाविरोधात केलेला उठाव व एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी केलेला घरोबा हे त्याचे ताजे उदाहरण आहे.
२०२४ मधे झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे यांच्या शिवसेनेचे ९ खासदार निवडून आले. त्यातले संजय जाधव ( वय ५९, परभणी ) , भाऊसाहेब वाघचौरे ( ७६, शिर्डी ) , संजय देशमुख ( ५८,यवतमाळ- वाशीम ), नागेश पाटील अष्टीकर ( ५४, हिंगोली )., ओमराजे निंबाळकर ( ४२, धाराशिव ), संजय दिना पाटील ( ५७, ईशान्य मुंबई ) या सहा खासदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. हे सर्व खासदार मशाल चिन्हावर निवडून आले होते. या सर्वांनी बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचे बोर्डावर फोटो लावून मते मागितली होती. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी मेहनत करून त्यांचा प्रचार केला होता. भाजप- शिवसेना शिंदे पक्षाच्या विरोधात जनतेने त्यांना लोकसभेवर निवडून दिले होते. दोन वर्षांत नेमके असे काय घडले की , त्यांना ठाकरेंच्या पक्षात राहणे नकोसे झाले ? आपण पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे त्यांनी कधी सांगितले नाही.
पक्षाच्या नेमक्या कोणत्या निर्णयाबद्दल त्यांचे मतभेद झाले हे कधी पुढे आले नाही. पक्ष सोडून जाण्याची खरी कारणे पुढे आलेली नाहीत. या फुटीर खासदारांनी दोन वर्षात संसदेत महाराष्ट्राचे कोणते प्रश्न मांडले, मतदारसंघाला काय मिळवून दिले, पक्षाची कोणती भूमिका तडफेने मांडली ? आता शिंदेंच्या पक्षात गेले, त्याचा राजकीय व आर्थिक लाभ त्यांना झाला असेल. पण जनतेच्या जीवनात काय फरक पडणार आहे ? आता हे सर्व फुटीर शिवेसनेचे धनुष्य- बाण हे चिन्ह आपल्या हाती घेणार आहेत, म्हणून ते एनडीएमधे येतील. लोकसभेत एनडीए सरकार विधयके किंवा ठराव सादर करील तेव्हा या खासदारांना सरकारच्या बाजुने मतदान करावे लागेल. महिला आरक्षण – मतदार संघ पुनर्रचना विधेयकाला याच खासदारांनी दोन महिन्यापूर्वी लोकसभेत विरोध केला होता . आता ते पुन्हा सादर झाले की त्यावर आता बाजुने मतदान करावे लागेल.
शिवसेना स्थापना दिवस १९ जून. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावून शिवसेना हे नाव व निवडणूक चिन्ह काबीज केले, तेव्हापासून मुंबईत ठाकरे व शिंदे हे दोघेही शिवसेना वर्धापन दिन वेगवेगळा साजरा करतात. ठाकरे यांच्याकडे सत्ता नाही. राज्य गेले, महापालिका गेली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठाकरे यांनी कधी रस घेतला नाही. मुंबई महापालिका हाच ठाकरेंच्या शिवसेनेचा प्राणवायु होता. तो ऑक्सिजन सिलिंडरच भाजपने आपल्याकडे हिसकावून घेतला आहे. सहा खासदारांनी ठाकरेंच्या पक्षावर प्रहार करून पळ काढण्याची नेमकी हीच वेळ का निवडली ? आता त्यांचे बॉस एकनाथ शिंदे आहेत. ते सर्व निर्णय मोदी- शहांना विचारूनच घेत असतात. शिवसेना वर्धापन दिनाच्या तोंडावर दिल्लीतून या सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले. लोकसभा निवडणुकीत चार सौ पार ची घोषणा देणाऱ्या भाजपला बहुमताचा आकडाही गाठता आला नव्हता. मग चंद्राबाबू – नितीशकुमार यांना बरोबर घेऊन एनडीए सरकारची स्थापना झाली.
विधेयके मंजुर करण्यासाठी लोकसभेत ३६२ खासदारांचे संख्याबळ गरजेचे आहे. म्हणूनच आयारामांना भाजपकडून पायघड्या घातल्या जात आहेत. अगोदर पंजाबमधील आम आदमी पक्षाचे सात खासदार फुटले व भाजपमधे आले. नंतर तृणमूल काँग्रेसचे बावीस खासदार फुटले व त्यांना नॅशनॅलिस्ट सिटिझन्स पार्टीमधे विलिन केले. आता ठाकरेंच्या शिवसेनेचे सात खासदार फुटले व त्यांना शिंदेंच्या शिवसेनेने पायघड्या घातल्या. काँग्रेसशी संबंध तोडलेल्या द्रमुकच्या २२ खासदारांवर भाजपची नजर आहेच. शिवाय सपाचे खासदार फुटणार अशी कुजबुज चालू आहे.
शिंदे यांच्या शिवसेनेचे लोकसभेवर सात खासदार निवडून आलेत. प्रतापराव जाधव केंद्रात मंत्री आहेत. ठाकरेंचे सहा खासदार मिळाल्याने शिंदे यांच्या खासदारांची संख्या तेरा झाली आहे. केंद्रात आणखी एक मंत्रीपद मिळेल अशी चर्चा सुरू आहे. आयारामांची भाजपकडे रांग लागल्याने एनडीएमधील चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार यांचे महत्व कमी होईल अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे राज्याच्या राजकारणात महत्व वाढेल. महाराष्ट्रात आपली राजकीय भूमिका अमलात आणण्यासाठी एकनाथ शिंदे अतिशय उपयुक्त नेता आहे, असे मोदी – शहांना समजले आहे. एकनाथ शिंदे जेवढे लोकांना भेटतात, दौरे करतात तेवढे कोणी करीत नाहीत. भाजप हायकमांडशी सर्वाधिक जवळचे संबंध राखणारा हा नेता आहे.
उध्दव ठाकरे यांचे नेतृत्व व त्यांचा पक्ष कमकुवत करण्यात एकनाथ यांचा सिंहाचा वाटा आहे. शिवसेनाप्रमुखांचे आपणच सच्चे वारस आहोत हा त्यांचा मंत्र आहे. ठाकरे पिता- पुत्र हे राज्यात कुठे फिरत नाहीत, फोन घेत नाहीत, जनसंपर्क नाही, पदाधिकारी- कार्यकर्ते यांच्याशी मुक्त संवाद नाही, पक्षाचे मुख्यालय असलेल्या शिवसेना भवनमधे नियमित जात नाहीत. मग जनमानस काय आहे, कार्यकर्त्यांची भावना काय आहे हे कसे समजणार ? ठाकरे भेटत नाहीत आणि शिंदे रात्री उशीरापर्यंत मुंबई- ठाण्यात भेटत असतात. त्याचा लाभ त्यांना मिळतो…
