March 12, 2025
Sarojtai Kashikar elected as president of Farmers' Literary Conference
Home » शेतकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदी सरोजताई काशीकर
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी साहित्य संमेलनाध्यक्षपदी सरोजताई काशीकर

माजी संसदपटू आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप करणार उदघाटन

कोल्हापूर – कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती व्यवसायाला जखडणाऱ्या मानवनिर्मित बेड्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या दाहक समस्यांची मराठी साहित्यविश्वाला जाणीव करून देण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र, अनर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाविषयीच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी, मराठी साहित्य-सारस्वतांची कृषि उद्योगीजगतासोबत सांगड घालून त्यांना कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरित करण्यासाठी आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न म्हणून शनिवार ( दि. ८) व रविवार, (दि. ९ फेब्रुवारी, २०२५ रोजी ) शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील युगात्मा शरद जोशी विद्यानगरी, सहकारमहर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात दोन दिवसीय १२ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित केले आहे.


 
शेती विषय मानून मध्यवर्ती याच केंद्राभवती शेतीसाहित्याची गुंफण करणारी साहित्यनिर्मिती व्हावी राज्याच्या विविध भागात संमेलन आयोजित करण्याच्या प्रयत्नातील हे बारावे वर्ष आहे. एका तपपूर्तीच्या निमित्ताने यंदाचे बारावे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे आयोजित करण्यात आले असून संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद ज्येष्ठ शेतकरी नेत्या, माजी आमदार तथा लेखिका सरोजताई काशीकर संमेलनाध्यक्ष तर  माजी संसदपटू आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप उद्घाटक आहेत. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची स्वागताध्यक्षपदी, शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांची कार्याध्यक्षपदी तर मुंबई हायकोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड सतीश बोरुळकर यांची संयोजकपदी निवड केली आहे.

मागील काही वर्षापासून शेतकरी आत्महत्यांनी धारण केलेले विक्राळरूप, कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ अशा अस्मानी संकटामुळे उत्पादनात येणारी प्रचंड घट, शेतमालाच्या पडत्या बाजारभावामुळे व वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे डबघाईस आलेले शेतीचे अर्थशास्त्र, मागील पाच वर्षांपासून सततची नापिकी, कधी चक्रभुंगा तर कधी बोंडसड, कधी कपाशीवर बोंडअळी तर कधी तुरीवर मर रोग यामुळे शेतीतील उत्पन्नासोबतच उत्पादनही मोठ्या प्रमाणावर घटले आहे, विजेचे बिल देखीलभरण्याची शेतकऱ्यांची ऐपत उरलेली नाही. अशा बिकट स्थितीतही  “रोजचेच मढे, त्याला कोण रडे” अशा निर्विकारपणे शेतीव्यवसायाकडे बघण्याची शासकीय व प्रशासकीय यंत्रणेची मानसिकता तयार झाली आहे त्यामुळे प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फ़ारसा उहापोह होतांना दिसत नाही. राजकीय आणि शासकीय आघाड्यावर शेतीला आधार देणाऱ्या उपाययोजना शोधण्याऐवजी सक्तीने व बळाचा वापर करून वीजपुरवठा खंडित करण्याच्या भीमगर्जना केल्या जात आहेत.


 
समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात सुद्धा यापेक्षा वेगळी स्थिती नाही. शेतकऱ्याची मुले शिक्षण घेऊन अन्य व्यवसायात गेली, पोटापाण्याचा प्रश्न सुटल्याने लिहिती होऊन अभिव्यक्त व्हायला लागली पण त्यांनाही शेतीच्या वास्तवाकडे अभ्यासपूर्ण आपुलकीने पाहावेसे वाटत नाही, हे शेतीव्यावासायाचे फार मोठे शल्य आहे. गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात लक्षावधी  शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले नाही. शेतीच्या वास्तवतेवर सर्वकष प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतीच्या दुर्दशेच्या कारणांचा शोध घेणारे, शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे आणि त्यावर आवश्यक उपाययोजनांची चाचपणी करून जाणिवा समृद्ध करणारे पुस्तक मराठी साहित्यविश्वात आजही उपलब्ध नसणे ही बाब मराठी साहित्यक्षेत्राचे खुजेपण दर्शविणारी आहे.


 
साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे, २०१७ मध्ये तिसरे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन गडचिरोली येथे, २०१८ मध्ये चवथे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई येथे, २०१९ मध्ये ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण (औरंगाबाद) येथे, २०२० मध्ये ६ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, अलिबाग (रायगड) येथे तर कोरोना आपत्तीमुळे २०२१ साली ७ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन ऑनलाईन पद्धतीने, २०२२ मध्ये ८ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन रावेरी (यवतमाळ) येथे, सप्टेंबर २०२२ मध्ये ९ वे ऑनलाईन संमेलन आणि जानेवारी २०२३ मध्ये गुरुकुंज आश्रम (अमरावती) येथे, मार्च २०२४ मध्ये ११ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन, मोहाडी (नाशिक) येथे आयोजित करून पिढ्यानपिढ्याच्या अबोलतेला बोलते, लिहिते व वाचते करण्याच्या यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकरी साहित्य चळवळीच्या प्रयत्नांना यश येऊन साहित्यिकांची नवीन पिढी अभ्यासपूर्ण वास्तवचित्र आक्रमक आणि  सडेतोडपणे रेखाटायला लागली आहे.


 
१२ व्या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्‍या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि सशक्त लेखणीच्या माध्यमातून इंडियाच्या बरोबरीने भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या लढवैया सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.

संमेलनाच्या आयोजनाकरिता विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून आयोजन समितीमध्ये बबनराव यादव (कोल्हापूर), गणेश मुटे (वर्धा), धनश्री पाटील (नागपूर), नियोजन समितीमध्ये अ‍ॅड मनोज पाटील, राजेंद्र कुचकर, सुभाष गरड, राकेश पाटील (कोल्हापूर), मनीषा रिठे (वर्धा), संयोजन समितीमध्ये संजय नांदणे (कोल्हापूर), प्रतिभा काळे (वर्धा), स्वागत समितीमध्ये युवराज आण्णासाहेब पाटील (कोल्हापूर), उषा दरणे, मनोरमा मुटे (वर्धा), व्यवस्थापन समितीमध्ये शिवम मुटे, विनोद काळे (वर्धा), सभागृह व्यवस्था समितीमध्ये गणेश मुटे, कल्याणी काळे (वर्धा), स्वागत कक्ष समितीमध्ये सारंग दरणे, विवेक मुटे (वर्धा) यांची निवड करण्यात आलेली आहे.
 
या संमेलनात उदघाटन सत्र, शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविधांगी सत्र असणार आहेत .या संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार आहेत. तरी सर्व शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading