काय चाललयं अवतीभवती

कोरोनाला हरवण्यासाठी मुलभूत गरजांचा सप्तकोन

अन्न, वस्त्र, निवारा या तीन मूलभूत गरजा व्यतिरिक्त शिक्षण व वाहतूक व्यवस्था ह्या दोन अतिरिक्त गरजा आहेत. पण आजच्या कोरोना महामारीच्या काळात आणखी दोन अतिमहत्वाच्या गरजा वाढल्या आहेत. त्या दोन गरजा म्हणजे आरोग्य व्यवस्था व स्वशिस्त.

महादेव पंडित

महादेव पंडीत

सांगली येथील वॅालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १९८९ च्या बॅचचे स्थापत्य अभियंता.

जिओटेक्नीकल व स्थापत्य सल्लागार म्हणुन जवळ जवळ ३० वर्षाचा मेरेथॅान अनुभव.

ईमेल : mip_68@hotmail.com
भ्रमनध्वनी : ९८२००२९६४६

डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहान शहरात नोव्हेल कोरोना व्हायरस 19 या अतिभयंकर विषाणूने जन्म घेतला आणि आजपर्यंत तो विषाणू जगभर भयंकर थैमान घालत आहे. आजतागायत त्या विषाणू वर शतप्रतिशत प्रतिबंधक असा कोणताही उपाय सापडलेला नाही. कित्येक लोक कोव्हीडमुळे मरण पावत आहेत, तर कित्येक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. लॉकडाऊन हा कोरोनावर अगदी शेवटचा  पर्याय आहे, पण सततच्या लॉकडाऊनमुळे पुढे पुढे लोकांना रोजचे अन्न सुद्धा मिळेनासे होईल आणि पुढे पुढे उपासमारीमुळे लोक मृत्यूमुखी पडतील.

मुलभूत गरजांचा सप्तकोन

लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वच ठिकाणी आरोग्य व्यवस्था कायमची उपलब्ध करणे सरकारच्या हाताबाहेरचे आहे. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीवर यशस्वी मात करताना नेहमीच मानवाची हार होते, कारण आपत्तीचे स्वरूप व प्रखरतेचा अचूक अंदाज बांधणे आजतरी खूप अवघड आहे. आपत्तीवर शतप्रतिशत मात करण्यासाठीची उपाय योजना अत्यंत बारकाईने राबविणे जगातील अगदी अद्यावत तंत्रज्ञानावर आरूढ असलेल्या देशांना सुद्धा शक्य नाही, पण ह्या नैसर्गिक आपत्तीची प्रखरता कमी करण्याची ताकत नक्कीच मानवाच्या हातात आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व वाहतुकीची साधने ह्या पाच मुलभूत गरजा सोबतच आज कोरोना महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्था आणि कोरोना सोबत कसे जगायाचे ? म्हणजेच स्वशिस्त ह्या आणखी दोन गरजा वाढून आता नवीन प्रणालीमध्ये सप्तपदीसोबत सात मुलभूत गरजांचा सप्तकोन तयार झालेला आहे.

आरोग्य व्यवस्था तोकडी

पहिल्या तीन गरजा भागविण्यासाठी आजकाल बहूंताशी लोकांना शहराकडे धाव घ्यावी लागते आणि त्यामुळे आज शहरात खूपच गर्दी होत आहे. शहरातील दररोज वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांच्या लोंढ्यामुळे अस्तित्वात असलेली वहातुक व्यवस्था जशी पूर्ण कोलमडलेली आहे, अगदी त्याचप्रमाणे सध्या चालु असलेल्या कोरोना महामारीत देशाची तसेच राज्यांची अस्तित्वात असलेली आरोग्य व्यवस्था सध्या तोकडी व पुर्ण कोलमडलेली दिसते आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे आणि आज दररोज जवळ जवळ चार लाख लोक बाधीत होत आहेत. मग पूर्वीच्या पारंपारिक आजारांच्या रुग्णा सोबतच एवढ्या मोठ्या प्रमाणावरील रुग्णांचा भार जगातील कोणतेही शहर अगदी जर्मनी, अमेरिका सुद्धा पेलु शकत नाही. आज बऱ्याच रुग्णांना रेमेडेसिव्हिर, ऑक्सीजन व बेडच मिळत नाही. खूपच भयंकर परिस्थिती आज भारत देशावर आलेली आहे.

स्वशिस्त हाच एकमेव रामबाण उपाय

निसर्गात जन्माला येणारा प्रत्येकजण आपल्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी सक्षम असतो. आजपर्यंत निसर्गात मानवी जीवन सर्वश्रेष्ठ मानले जाते. सध्या सर्व शिक्षण मोहिमेअंतर्गत प्रत्येकास शिक्षण मिळत आहे. डॉक्टरांच्या मदतीमुळे आपले आरोग्य निरोगी व सुदृढ करण्यास मदत मिळते. मधुमेह, मलेरिया, टायफॉइड, हृदयविकार ह्या सारख्या पारंपारिक आजारांवर अनेक उपाय तसेच उपचार उपलब्ध आहेत, पण कोरोना सारख्या अतिवेगाने पसरणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर स्वशिस्त हाच एकमेव रामबाण उपाय आहे आणि स्वशिस्तीसाठी स्वतःच्या मनालाच आपला मार्गदर्शक बनवावे लागेल. संसर्गजन्य रोगांच्या साथीमध्ये प्रत्येक व्यक्तीने स्वतःसोबत आपल्या लाडक्या कुटुंबाची तसेच समाजाची अत्यंत काळजीपूर्वक सेवा केली पाहिजेत. सर सलामत तो पगडी पचास ह्या पारंपारिक म्हणीप्रमाणे प्रत्येकाने आपले जीवनमान नियोजित केले  पाहिजेत.

डॉक्टर, शास्त्रज्ञ हे देवदुतच

आपल्या लाडक्या शास्त्रज्ञ, संशोधक व डॉक्टर मंडळींनी आपले पूर्ण कौशल्यपणाला लाऊन एक वर्षाच्या आतच कोव्हॅक्सीन व कोव्हीशिल्ड ह्या दोन लशी तयार करून सध्यातरी कोरोनाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. पण पोलिओ, देवी इत्यादी लशीप्रमाणे ह्या दोन लशींचा अगदी शतप्रतिशत गुण येईल अशा भ्रमात कोणीही राहू नये. लसीचे दोन डोस घेतले आणि भुंग्याप्रमाणे आपण भिरभिरायला लागलो तर पुन्हा तिसरी लाट नक्कीच येईल. तुप खाऊन रूप येत नाही अगदी त्याचप्रमाणे दोन डोस कोव्हॅक्सीन किंवा कोव्हीशिल्डचे घेतले की आपण 100 टक्के कोरोनापासून मुक्त अशा भ्रमात कोणीही राहू नये. कदाचित या वर्षाअखेरीस किंवा जानेवारी 2022 मध्ये ह्या दोन्हीही लसींचा संपूर्ण डाटा उपलब्ध झाल्यानंतर कदाचित एकदम शतप्रतिशत गुणकारी औषध किंवा लस आपले शास्त्रज्ञ व डॉक्टर नक्कीच शोधून काढतील पण तिथपर्यंत प्रत्येकाने स्वशिस्त आपल्या अंगी रुजवली पाहिजे. एक वर्षाच्या आतच रोग प्रतिबंधक लस तयार करून संसर्गजन्य रोगावर मात करणे व मृत्यूची संख्या कमी करण्याचे संपूर्ण श्रेय आपल्या सर्व संशोधक, शास्त्रज्ञ व डॉक्टर मंडळींना जाते आणि खरोखरच ते सर्व लोक आज गुण गौरवास पात्र आहेत. नेहमीच डॉक्टर व शास्त्रज्ञ हे दोघेही देवाच्यानंतर कठीण काळात मानवी मदतीला धावून येणारे खरेखुरे देवदूतच आहेत. ”DOCTOR & SCIENTISTS ARE NEXT TO GOD”

मानव विरुद्ध विषाणू असे महायुद्ध

प्रत्येक नागरिकाने कोरोना महामारी मानव विरुद्ध विषाणू असे महायुद्ध समजून आपले दैनंदिन जीवन व्यतीत करणे आज अत्यंत गरजेचे आहे. कोरोनाला हरवायचे आहे तर मग त्यासाठी आपली जीवन प्रणाली स्वशिस्तीत आणली तरच उद्याचा तरुण वर्ग कार्यरत होईल अन्यथा सर्व आजपर्यंतची  प्रगती कमीतकमी 100 वर्षे तरी अधोगतीकडे प्रयाण करील. ह्या युद्धामध्ये दारूगोळा, बॉम्ब, हवाई क्षेपणास्त्रे, आरमारी हल्ले किंवा भुदल सैनिकांचा हल्ला असा कोणताही प्रकार करावयाचा नाही. पण प्रत्येकाने तोंडावर मास्क, वारंवार स‌ॅनिटायझेन, सोशल डिस्टशींग, गर्दीचे व समारंभाचे कार्यक्रम टाळणे, अनावश्यक भेटीगाठी टाळणे, रस्त्यावर न थुंकणे, सिगारेटचे तुकडे रस्त्यावर  न फेकणे, उघड्यावर शौचालयाला न जाणे इत्यादी गोष्टींचे शतप्रतिशत पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे स्वतःच्या जिभेला व मनाला लॉकडाऊन करणे अत्यंत गरजेचे आहे.

शिक्षण व  ज्ञान ही नेहमीच देण्याची वस्तू

हे विश्वची माझे घर या संताच्या वाणीप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा प्रत्येक देशांकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहिले पाहिजेत. अद्यावत तंत्रज्ञानाचे प्रगतीपथावर आरूढ असणाऱ्या देशांनी तयार केलेल्या लसी जागतिक पातळीवर प्रत्येक मानवास मिळाल्या पाहिजेत ह्या प्रणालीने सर्व जगाचे नियोजन केले पाहिजेत. कोणत्याही प्रकारचे राजकारण मानवी जीवनाच्या आड येता कामा नये. लसीचा फॉर्म्युला सुद्धा जागतिक आरोग्य संघटनेने ज्यांना हवा असेल आणि जे लोक तो मानवतेच्या दृष्टिकोनातून तयार करू इच्छीत असतील तर त्यांना पूरविणे अत्यंत  गरजेचे आहे. कारण शिक्षण व  ज्ञान हे नेहमीच देण्यासाठी असते. राजकारण व अर्थकारण करण्यासाठी लसीचा वापर करणे अत्यंत काळीमा लावणारे दृश्य आहे.

व्हॅक्सीनमैत्रीची गरज

आज जर गोरगरीब दिनदुबळ्या लोकांना महामारित आवश्यक आरोग्य सुविधा पुरविली नाही तर खूप मोठा अनर्थ  मानवी जीवनावर ओढवेल. उद्या मनुष्य प्राणीच जर पृथ्वीवर शिल्लक राहिला नाही तर संशोधन, राजकारण, अर्थकारण सर्वच व्यर्थ आणि म्हणूनच संतांच्या वाणीप्रमाणे विश्वची माझे घर असे समजून प्रत्येक देशाने ”व्हॅक्सीनमैत्री” केली पाहिजेत. भारताने हे ब्रिदवाक्य सत्यात उतरविले आहे. भारताने जवळ जवळ 6 कोटी डोस 80 देशांना मानवतेच्या दृष्टिकोनातून दिले आहेत पण आज भारतात कोरोनाने हाहाकार माजविलेला असताना ॲाक्सीजन शिवाय इतर कोणतीही मदत प्रामुख्याने व्हॅक्सीनमध्ये झालेली नाही. भारत देशा व्यतिरिक्त इतर कोणत्याही देशाने व्हॅक्सीन मैत्रीला दाद दिलेली नाही. फक्त सध्या रशियाने भारताला व्हॅक्सीन मैत्रीच्या बाबतीत हात देण्याचा थोडा फार प्रयत्न केलेला आहे.

युद्ध स्थितीत सरकारला जाब विचारणे अयोग्य

 समजा उद्या जागतिक स्तरांवर तिसरे महायुद्ध सुरू झाले तर आपण सामान्य जनता सरकारला जाब विचारत बसणार का ? अर्थचक्राचा विचार करणार का ? व्यायामाचा व शरीर सौष्ठत्वाचा विचार  करणार का ? ध्यानधारणेसाठी व भक्तीसाठी मंदिरात जाणार का ? कामधंद्याचा विचार करणार का ? लग्न समारंभ, बारसे, वाढदिवस साजरे करणार का ? पर्यटनाला जाणार का ? जिभेच्या चोचल्यासाठी मॉल, किराणा दुकाने फिरणार का ?  या सर्व प्रश्नांची उत्तरे ”कदापि  नाही” हेच असणार मग आजच्या भयंकर महामारीच्या काळात सरकारला मदत करण्याऐवजी अनेक प्रश्न विचारून बेजार का करत आहात ? सरकारची महामारीच्या काळातील नियमावली अत्यंत काटेकोरपणे पाळली पाहिजे, आणि कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. कोरोना रोखण्यासाठीची सरकारची नियमावली सरकारसाठी नसून आपल्यासाठी व आपल्या  कुटुंबासाठी आहे हे नेहमीच प्रत्येकाने लक्षात ठेवणे गरजेचे आहे. युद्ध काळात कधी कोठे निवडणुका घेतात असे कोठेही ऐकीवात नाही पण तरीसुद्धा आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी व निवडणूक आयोगाने मानव विरुद्ध विषाणू हे महायुद्ध चालू असताना बिहार, पश्चिम बंगाल, पाँडेचेरी, केरळ, आसाम आणि तामिळनाडू या मोठ्या राज्यात निवडणूका घेऊन कोरोनाचे सर्वच नियम पायदळी तुडविले आहेत आणि या बेशिस्तीचे पडसाद नजीकच्या काळात निदर्शनास येतील. कोरोना महामारीसुध्दा  मानव विरुद्ध विषाणू असे जागतिक महायुद्धच आहे  असे समजून प्रत्येक नागरिकाने आपआपल्या सरकारला मदतीचा हात देऊन महामारी नष्ट करण्याचा चंग बांधला पाहिजेत.

”स्वशिस्त” हा गनिमी कावा वापरून लवकरात लवकर जिंकायचे आहे.  ”कर्मण्येबाधिकरस्ते मा फलेशु कदाचण” ह्या भगवान श्रीकृष्णाच्या भगवतगीतेतील मोलाच्या संदेशाचा अगदी खोलवर विचार करून प्रत्येकाने पृथ्वीवरील मानवी जीवन सुखकर, आनंदी, निरोगी करून उद्याचे नवीन खुप सुंदर , खुप समाधानी ,सुदृढ आनंददायी नवीन विश्व तयार केले पाहिजेत.

महादेव पंडित

विषाणूला हरवण्यासाठी स्वशिस्त गरजेची

9 जानेवारी 2020 ला चीनमधील अतिप्रगत अश्या वुहान शहरात कोरोनामुळे पहिला बळी गेल्याची नोंद आहे. त्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदी यांनी 22 मार्च 2020 ला भारतभर जनता कर्फ्यु लाऊन पुढील महामारीची आणि संकटाची चाहूल करून दिली आणि त्वरीत 25 मार्च 2020 ला पूर्ण भारत देशाला लॉकडाऊन केले. सुरुवातीला आपल्या पोलीस बांधवांनी स्वत:चे जीवन धोक्यात घालून भारतीयांना शिस्त लावण्याचा आटोकाट प्रयत्न करून देशात सप्टेंबर 2020 पर्यंत पहिली लाट उतरणीला सरकविण्यासाठी मोलाचा हातभार लावला. 01 सप्टेंबर 2020 नंतर मिशन बिगीनमध्ये शाळे व्यतिरिक्त सर्व व्यवहार व सर्व वहातुकीची साधणे फेब्रुवारी 2021 पर्यंत सुरळीत केले पण 01 मार्चनंतर 2021 नंतर कोरोनाच्या विषाणूला आपण चारीमुंड्या  चीत केले आहेत ह्या अर्विभावात देशांच्या नायकांपासून ते सर्वसामान्य माणसांपर्यंत सर्वांनी भुंग्यांप्रमाणे सर्व नियम पायदळी घालून सर्वत्र पूर्वीप्रमाणे भिरभिरायला सुरुवात केली आणि पूर्वीच्या शिस्तीचे बेशिस्तीमध्ये रूपांतर झाले. सप्टेंबर 20 मध्ये दररोज 70 ते 80 हजाराच्या घरात असणारी कोरोना बधितांची संख्या फेब्रुवारी 2021 अखेरीस नागरिकांच्या शिस्तीमुळे 20 हजारापर्यंत इतकी खाली घसरली होती आणि पहिली लाट शत प्रतीशत थोपवण्यात आपले सर्व डॉक्टर, राजकारणी मंडळी, स्वयंसेवक, आरोग्य विभागातील सफाई कामगार तसेच अन्य कर्मचारी पूर्णतः यशस्वी झाले होते पण मार्च व एप्रिल 21 मधील सार्वत्रिक निवडणूका तसेच प्रत्येक नागरिकांची मनमानी जीवनशैली व बेशिस्त वर्तन यामुळे कोरोना बधीतांची संख्या चार लाखांवर पोहोचली आहे. चार ते पाच हजार लोक दररोज मृत्यूमुखी पडत आहेत. यावरूनच आपण अंदाज बांधू शकतो की आपण किती बेशिस्त आणि बेदरकारपणे वागलो आहे. आज मानव कोरोना विषाणू सोबतचे युद्ध अंशतः हरला आहे आणि विषाणू जिंकला आहे, पण भविष्यात विषाणूला कायमच हरवायचे असेल तर ”स्वशिस्त” व  आरोग्य व्यवस्था व लशींचे अत्याधुनिक संशोधन” ह्या दोन मुलभूत गरजांचे  एकत्रीकरण पहिल्या गरजांच्या पंचकोनात जमा करुन मुलभूत गरजांचा सप्तकोनात केले पाहिजेत.

टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

Dnyneshwari Tips On Karma : कर्म सोडू नका तर त्यातला अहंकार सोडा अन् चमत्कार पाहा

आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता?…

9 hours ago

शेतमालास उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव यासंदर्भात हवा कायदा Need of Law For Agricultural Products

अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…

1 day ago

विरोधकांचा आवाज क्षीण झालायं… की सरकार अधिक बळकट झालंय ? Monsoon session of the legislature

मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…

2 days ago

इतिहास वाचनातूनच संस्कार अन् सुराज्याची जडणघडण : संयोगिताराजे छत्रपती Good State Formed Through Reading History

वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…

2 days ago

अर्पणामागचा भाव : शुद्ध भक्तितत्त्वाचा ज्ञानेश्वरीतील अमृतसंदेश Pure Bhakti from Dnyaneshwari |

हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…

2 days ago

आकाशातील ढग व युद्धाच्या धगीत अडकलेली अर्थव्यवस्था ! an economy caught in the grip of war

विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…

3 days ago