📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 13, 2026
विशेष संपादकीय

जीडीपी वाढतोय, मग आनंद कुठे हरवतोय ? Happiness GDP And Human-Development

GDP and infrastructure may measure economic growth, but true development also depends on happiness, mental peace, social support and quality of life.

आनंदाची ‘जीडीपी’ आणि आपण !

डॉ. रिता मदनलाल शेटीया 
लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या  सहायक प्राध्यापिका आहेत.

दरवर्षी मार्च महिन्यात ‘जागतिक आनंद अहवाल’ जाहीर होतो,काही देश अव्वल स्थानावर विराजमान होतात,भारताच्या खात्यात काही शतकी क्रमांकांचे स्थान जमा होते आणि आपण पुन्हा आपल्या दैनंदिन धडपडीत व्यस्त होतो.पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की,आज जगभरात तंत्रज्ञानाचा विस्तार झालाय,उत्पनाची साधने वाढली आहेत,रस्ते-महामार्ग चकाचक होत आहेत.मग तरीही माणूस मनातून इतका ‘अस्वस्थ’ आणि ‘असमाधानी’ का आहे? याचाच उहापोह करणारा हा लेख…

डॉ. रिता मदनलाल शेटीया

‘जागतिक आनंद निर्देशांक २०२६’ च्या निमित्ताने आपल्याला विकासाच्या प्रचलित व्याख्येचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे.

विकास नक्की कशाचा? रस्त्यांचा की माणसांचा? आपण सहसा देशाची प्रगती जीडीपी (GDP – सकल राष्ट्रीय उत्पन्न), नवीन इमारती आणि तंत्रज्ञानावरील गुंतवणुकीवरून मोजतो. पण हा जागतिक अहवाल आपल्याला एका वेगळ्या वास्तवाची जाणीव करून देतो—”पैसा समृद्धी आणू शकतो, पण शांतता आणि आनंद विकत घेऊ शकत नाही.”

फिनलंड, डेन्मार्क किंवा आइसलँडसारखे देश जगावर आर्थिक किंवा लष्करी हुकूमशाही गाजवत नाहीत.तरीही तिथला नागरिक जगातील सर्वात आनंदी नागरिक ठरतो. याचे कारण तिथे ‘माणसाला’ केंद्रस्थानी ठेवून धोरणे आखली जातात. तिथे सरकार नागरिकाची चिंता करते: मोफत शिक्षण, दर्जेदार आरोग्य आणि वृद्धापकाळाची जबाबदारी राज्य घेते. तिथे पैशापेक्षा वेळेला महत्त्व आहे: कुटुंबाला वेळ देणे, निसर्गात वेळ घालवणे आणि मानसिक शांतता जपणे याला सामाजिक प्रतिष्ठा आहे.

भूतानचे ‘ग्रॉस नॅशनल हॅपनेस'(GNH)मॉडेल

जिथे संपूर्ण जग देशाची प्रगती जीडीपी (GDP) वरून मोजते, तिथे आपला शेजारी देश ‘भूतान’ आपली प्रगती ‘ग्रॉस नॅशनल हॅपनेस’ (GNH) म्हणजेच ‘एकूण राष्ट्रीय आनंद’ वरून मोजतो.१९७२ पासून भूतानने आर्थिक वाढीपेक्षा निसर्ग संवर्धन, सांस्कृतिक जतन, मानसिक शांतता आणि सुशासन या गोष्टींना प्राधान्य दिले आहे. जगाने भूतानच्या या मॉडेलकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.

आपल्या देशातील ‘आनंद’ कुठे हरवतोय ?

भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या देशात आनंद कमी असण्यामागे ‘असुरक्षितता’ आणि ‘अति-स्पर्धा’ ही दोन मोठी कारणे आहेत.

१. भविष्याची सतत वाटणारी भीती: आज आपल्याकडे मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील व्यक्तीला सतत एकच भीती असते, “उद्या जर घरातील कोणी आजारी पडले किंवा नोकरी गेली, तर काय होईल?” ही आर्थिक आणि सामाजिक असुरक्षितता माणसाला आतून पोखरून काढते.

२. ‘सुख’ आणि ‘आनंद’ यातील गल्लत: आपण भौतिक सुख-सुविधांनाच आनंद मानू लागलो आहोत. नवीन गाडी, मोठे घर आणि सोशल मीडियावरील ‘लाइक्स’ म्हणजे आनंद अशी व्याख्या बनली आहे. पण या वस्तू मिळवण्याच्या शर्यतीत आपल्या हातचा ‘वेळ’ आणि ‘मानसिक शांतता’ निसटून जात आहे.

३. दुरावलेले नातेसंबंध: आपल्या संस्कृतीत ‘सामाजिक आधार’ हा सर्वात मोठा शक्तीस्त्रोत होता. संकटसमयी शेजारी किंवा नातेवाईक पाठीशी उभे राहायचे. पण वाढते शहरीकरण आणि डिजिटल जगातील आभासी व्यस्ततेमुळे आज माणूस गर्दीतही ‘एकटा’ पडला आहे.

अ) ‘सोशल मीडिया’ आणि आभासी सुखाची तुलना
आजच्या काळात दुःखाचे एक मोठे कारण म्हणजे सोशल मीडियावरील ‘तुलनात्मक संस्कृती’. लोक दुसऱ्यांचे सोशल मीडियावरील भासमान, चकचकीत आणि ‘परफेक्ट’ आयुष्य पाहून स्वतःच्या वास्तवाची तुलना करतात आणि दुःखी होतात. ‘रिल’ आणि ‘स्टोरी’ मधील सुख म्हणजे खरा आनंद नव्हे, हे समजून घेणे काळाची गरज बनली आहे.

ब) ‘डिजिटल डिटॉक्स’ आणि वर्क-लाइफ सीमारेषा
तंत्रज्ञानामुळे आपण २४ तास जगाशी कनेक्ट झालो आहोत, पण स्वतःशी आणि कुटुंबाशी ‘ऑफलाईन’ झालो आहोत. कामाचे ईमेल आणि मेसेज रात्री उशिरापर्यंत अटेंड करण्याच्या सवयीमुळे कौटुंबिक शांतता भंग होत आहे. कामाच्या वेळा आणि वैयक्तिक आयुष्य यांमध्ये स्पष्ट सीमारेषा आखल्याशिवाय मानसिक स्वास्थ्य मिळणे कठीण आहे.

मग आनंदी होण्यासाठी काय करावे लागेल?

आनंद ही केवळ वैयक्तिक बाब नसून ती सामाजिक आणि राजकीय जबाबदारीसुद्धा आहे.

धोरणकर्त्यांसाठी (सरकारसाठी): देशाचे यश केवळ बजेटच्या आकडेवारीवरून न ठरवता नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य, प्रदूषणमुक्त हवा आणि सोप्या आरोग्य सेवा यावरून मोजले गेले पाहिजे.
समाजासाठी: स्पर्धात्मक मानसिकतेतून बाहेर पडून परस्पर सहकार्य आणि संवादाला महत्त्व दिले पाहिजे.
वैयक्तिक पातळीवर: ‘कामाचे तास’ आणि ‘स्वताचा वेळ’ (Work-Life Balance) यामध्ये सीमारेषा आखायला शिकले पाहिजे.
जागतिक आनंद निर्देशांकात भारताचे स्थान खाली असणे ही केवळ एक आकडेवारी नाही, तर तो आपल्या जीवनशैलीला लागलेला आरसा आहे. केवळ सिमेंट-काँक्रीटचे जंगल उभे करून किंवा आर्थिक आकडे फुगवून देश महान बनत नाही; तर त्या देशातील शेवटचा नागरिक रात्री शांतपणे आणि निसंकोचपणे झोपू शकतो का, यावर देशाचे खरे यश अवलंबून असते. “रस्ते किती रुंद झाले यापेक्षा त्यावरून चालणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर किती मोकळे हसू आहे, यावर देशाची खरी समृद्धी ठरते!” आता वेळ आली आहे, आपल्या आनंदाचा ‘इंडेक्स’ आपण स्वतः ठरवण्याची !

( लेखिका अर्थशास्त्र विषयाच्या सहायक प्राध्यापिका आहेत. )

Related posts

अन्नदात्याच्या स्वयंपूर्णतेचाही व्हावा विचार !

भारतीय अर्थव्यवस्था वाढीबरोबर जीएसटी संकलनाचा उच्चांक !

मुंबई महानगर शंभर टक्के सुरक्षित होईल का ?

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406