मुक्त संवाद

अरसड: अस्वस्थ करणारी कादंबरी

वाचकाला विचार करायला लावणे; चटका लावणे हे श्रेष्ठ साहित्यकृतीचे बलस्थान असते. आणि ते ह्या कादंबरीने साधले आहे. एखादा चित्रपट पाहून प्रेक्षक सुन्न मनाने बाहेर पडावा तसे या कादंबरीच्या बाबतीत घडते. खरं म्हणजे या कादंबरीचा शेवट शोकात्मही नाही आणि सुखात्मही नाही वाचकांना ती वेगळ्याच भावावस्थेत घेऊन जाते. ही कादंबरी अजून थोडी पुढे सरकायला हवी होती असे वाटणे हे लेखकाचे यश म्हणायला हवे.

उद्धव सोनकांबळे
(७५५८२९१२३७)

व्यंकटेश सोळंके यांची अरसड ही कादंबरी वाचनात आली. वाचून मन अस्वस्थ झाले. कारण यात स्त्रीच्या आयुष्यातला सासुरवास अतिशय विदारक आहे. मनी ही या कादंबरीची प्रमुख व्यक्तिरेखा. इतर अनेक पात्रं या कादंबरीत येतात पण कथानक मनीच्या जीवनाभोवती फिरत राहतं. ही कादंबरी वाचताना स्थळ व प्रदेश महत्वाचा वाटत नाही तर स्त्रीचे दुःख व छळ सर्वव्यापी व सार्वकालिक वाटतो. कोणतीही नववधू आपल्या जोडीदाराविषयी अतिशय उत्कंठित असते.

हर्ष आणि भय याच्या सीमारेषेवर ती चालते. भविष्याचे एक सुंदर स्वप्न घेऊन ती परक्या घरात प्रवेश करते. जिथं आपलं कोणीच नाही अशा सगळ्या अपरिचित माणसांना आपली माणसं म्हणून स्वीकारणं किती कठिण असतं ! पण स्त्री हे करते. मनीही आपल्या आयुष्याचं एक निरागस स्वप्न घेऊन सासरघरी प्रवेश करते. पण तिच्या आयुष्यात वेगळंच काही वाढून ठेवलेलं असतं. छळ, अपमान आणि उपासमाराची मालिका सुरु होते.

मनी असह्य होते. तरीही सोसत राहाते. बंड करत नाही. नकार देत नाही. प्रश्न विचारत नाही. अपार सहनशीलता हा तिचा गुण वाचकाला अस्वस्थ करतो. म्हणूनच कादंबरीत अनेक पात्र असतानाही सर्वांत ती उठून दिसते. अनेक खलपात्र असूनही त्यांच्या दुर्गुणांमुळे ते लक्षणीय वाटत नाहीत. मनीचा छळ कसा व कुणाकडून होतो. का होतो. तो किती क्रुर व अमानविय आहे. हे जाणून घेण्यासाठी अरसड वाचायला हवी.

स्त्री सासरच्यांना नकोशी झाल्यावर माहेर हा तिचा आधार असतो; पण वडिलाच्या मृत्युनंतर मनी इथेही निराधार होते. भयाण अंधारात तिचा लहान मुलगा रमण हाच एक तिला तिच्या जीवनाचा किरण वाटतो. नव्हे अपमान गिळत दुःख भोगत ती त्याच्यासाठीच जगते.

प्रस्तुत कादंबरीतील कथानक हे प्रवाही आहे. कथानकात उपकथानक असा प्रकार होऊन कादंबरीस क्लिष्टता येताना दिसत नाही. कादंबरी उत्कंठावर्धक आहे. वाचकांना पुढे काय याची ओढ लावते. कादंबरी जेव्हा संपते तेव्हा वाचक अस्वस्थ होतो. कारण मनीच्या जीवनाची कहानी अपूर्णच आहे असे वाटते. पुढे तिचे काय झाले असेल ? तिच्या आयुष्याचे अरसड फुलले असेल का? तिच्या आयुष्यात सुखाचे श्वास आले असतील का? तिच्या मुलाने तरी तिला आधार दिला असेल का? असे अनेक प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण होतात. आणि तो सुन्न होतो.

वाचकाला विचार करायला लावणे; चटका लावणे हे श्रेष्ठ साहित्यकृतीचे बलस्थान असते. आणि ते ह्या कादंबरीने साधले आहे. एखादा चित्रपट पाहून प्रेक्षक सुन्न मनाने बाहेर पडावा तसे या कादंबरीच्या बाबतीत घडते. खरं म्हणजे या कादंबरीचा शेवट शोकात्मही नाही आणि सुखात्मही नाही वाचकांना ती वेगळ्याच भावावस्थेत घेऊन जाते. ही कादंबरी अजून थोडी पुढे सरकायला हवी होती असे वाटणे हे लेखकाचे यश म्हणायला हवे.

अरसड ही कोणत्या विचार प्रवाहातील कादंबरी ? असा प्रश्न वाचकाला पडू शकतो. खरं म्हणजे स्त्रीचे दुःख, तिची समस्या, तिचे प्रश्न, तिचा छळ, तिचा कोंडमारा, तिची घुसमट व तिचा जाच या साऱ्या गोष्टी सर्व विचारधारेतील सामाईक घटक आहेत. म्हणून मनीचा सासुरवास हा प्रत्येक
स्त्रीच्या मनाला कातरतो. असे दुःख कोण्याही स्त्रीच्या वाट्याला येऊ नये असे वाटते. म्हणून मनी ही सर्व सासुरवाशा स्त्रियांची दुःखांच्या दुनियेतली प्रतिनिधी आहे असे वाटते.

दलित, आदिवासी, बहुजन, अभिजन अशा सर्व वर्गांतील स्त्रियांना मनीच्या छळाचे वर्णन वाचून नक्कीच अस्वस्थ वाटेल. म्हणून अरसड ही कादंबरी सर्व वाङ्मय विचार प्रवाहांना आपली वाटेल यात शंका नाही. सर्व स्तरातील वाचकांना ही कादंबरी संग्रही ठेवण्याची ईच्छा होईल.

अरसडच्या कथेसाठी लेखकाने मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यातील क्षेत्र दाखवले असले तरी ही कादंबरी स्थळाच्या सीमा ओलांडील असे वाटते. स्त्रीचे दुःख तिची वेदना कालातीत आणि स्थलातीत असते; आणि हे दुःख मांडणारी साहित्यकृती सुद्धा म्हणूनच स्थळकाळाच्या मर्यादा ओलांडून पुढे जाणारी असते. अरसडमध्ये ही क्षमता नक्कीच आहे असे खात्रीपूर्वक वाटते. अलंकाराच्या मोहात न पडणारी साधी पण प्रवाही भाषा, ग्रामीण बोलीचा बाज, अनेक ठिकाणी येणारा काव्यात्म शब्दसाज यामुळे या कादंबरीचे कथानक सुगम हृदयगम झाले आहे.

अरसडमध्ये मनीच्या छळाचे असे अनेक प्रसंग आहेत की ते वाचून डोळे भरून येतात. मनीचे एक काल्पनिक चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. मनात अस्वस्थता निर्माण होते. मनीच्या जीवनात पुढे सुख आले असेल का? या एका उत्कंठेसाठी कादंबरी वाचावी वाटते; आणि ती वाचून पूर्ण झाल्यावरही मन जणू मनीला शोधत राहते. कारण ती वाचकाच्या मनात एक अस्वस्थ पोकळी निर्माण करते.
परितक्त्या स्त्रीचे जीवन किती भयाणक असते. तिच्या पदरातील काटे आणि पायाखालील विस्तवाच्या वेदना ती कशी सोसते. तिच्या जीवनाच्या हिरवळीचे कसे पडीक रान होते.हे अरसड वाचल्याशिवाय कळणार नाही.

कादंबरीच्या कथेचा अर्क समीक्षात्मक शैलीत प्रा .डॉ .मथुताई सावंत यांनी मलपृष्ठावर उतरवला असून. त्यांची पाठराखण योग्य व सार्थ वाटते. लोकवाङ्मय गृह प्रकाशनामुळे या कादंबरीची उंची निश्चितच वाढली आहे. मिलिंद कडणे यांचे अर्थसूचक मुखपृष्ठ या कादंबरीला लाभले आहे. वाचक अरसडचे नक्कीच कौतुक करतील.

कादंबरी :अरसड
लेखकव्यंकटेश सोळंके
प्रकाशन – लोकवाङ्मय गृह
मूल्य- ४०० रु
मुखपृष्ठ: मिलिंद कडणे
पृष्ठे: २२०

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

तुकोबांच्या विचारांतच आजच्या काळाचा विवेकाचा मार्ग

आधुनिक समाजातील दिखाऊपणा, अहंकार, भेदाभेद आणि विवेकाचा ऱ्हास यावर तुकाराम महाराजांच्या विचारांची मूल्यवान चिकित्सा करणारा…

6 hours ago

भारतात कुपोषण निर्मूलनासाठी सामाजिक बांधिलकी व योगदान काय हवे ? Malnutrition Eradication

कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक…

11 hours ago

धान्यापासून ब्रँडपर्यंत; एक्सट्रुजन तंत्रज्ञानातून ग्रामीण उद्योगाची नवी वाट

बाजरी, ज्वारी, नाचणी, मका आणि कडधान्ये केवळ कच्चा शेतमाल न राहता त्यापासून पौष्टिक स्नॅक्स, पफ्स,…

19 hours ago

कवयित्री मनीषा पाटील लिखित ‘काहूर’ कवितासंग्रहात आहे तरी काय ? Kahoor Poetry Collection by Manisha Patil

कणकवली- समाज साहित्य प्रतिष्ठान - सिंधुदुर्ग आणि मिळून साऱ्याजणी परिवार - कणकवली यांच्यावतीने कवयित्री मनीषा…

20 hours ago

तिसरी मुंबई कोणासाठी? विकासाच्या स्वप्नाआड भूमिपुत्रांचे काय?

स्टेटलाइन - रायगडच्या १२४ गावांच्या जमिनीवर उभी राहणारी ‘तिसरी मुंबई’ जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनविण्याचे…

1 day ago

Weather Forecast : १७ ऑगस्टपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर…

1 day ago