June 15, 2025
An open farmland with cracked soil and a pen resting on it, symbolizing the pain expressed in ‘Mati Magtey Painkiller’ poetry collection
Home » शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव ‘ माती मागतेय पेनकिलर ‘ मधून अधोरेखित
मुक्त संवाद शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव ‘ माती मागतेय पेनकिलर ‘ मधून अधोरेखित

कवीचं वास्तव्य बालपणापासूनच ग्रामीण भागात गेलेलं असून कवी याच शेती मातीत वाढलेला आहे, घडलेला आहे. त्याचा पिंडच मुळी या मातीचा आहे. कविला शेती मातीची केवळ आस्थाच नाही तर कविचा शेतीमातीचा खूप जवळून बारीक सारीक अभ्यास आहे. नुसता अभ्यासच नाही तर त्याची या मातीशी घट्ट नाळ जडलेली आहे. कविला शेती मातीची सारी सुख दुःखे माहिती आहेत. त्याला शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची जाणीव आहे.

तु. सी. ढिकले, ७५८८८२८८३४

‘ माती मागतेय पेनकिलर ‘ पुस्तकाचे अंतरंग पाहताच मी फार भारावून गेलो ! सुरुवातीलाच (अर्पणपत्रिका)
” मुरमाड मातीतून आमचं आयुष्य बागायती करणारे
‘ दगूनाना ‘ अन् ‘ गंगाई ‘
बारोमास वावर वहिती ठेवणारे
वडील संजय जाधव अन्
चुलते अरुण जाधव
आणि
अंकुरणाऱ्या कोंबाला
अन् तुकोबांच्या गाथेला…
यावरून नजर टाकताच हे भारवलेपण आणखी गहिरे होत गेले !
या पुस्तकात इतर सर्वसाधारण पुस्तकांप्रमाणे रुढार्थाने प्रस्तावना आणि मनोगत नसले तरी संत तुकारामांच्या अर्थपुर्ण अभंगाने पुस्तकाची खूप सुंदर सुरुवात झाली आहे !

‘ माती मागतेय पेनकिलर ‘ हे पुस्तकाचे शीर्षकच या पुस्तकातील कवितांचा विषय, आशय आणि विषयाची दाहकता समजण्यास पुरेसे आहे. या पुस्तकातील एकूण पाच विभागांत दिलेल्या कवितांच्या आधीच्या या प्रस्तावनावजा ओळी बघा:-
संवेदना पोखरून
हृदयाचं धडधडणं कधीचं
बंद पडलंय मोटारीवरच्या स्टार्टरसारखं!
पण हृदय चिरताना नाकाला
जरा रुमाल लावता का?
तुम्हाला वास येईल कदाचित
पोटॅश युरिया नाहीतर
सुपर फॉस्फेटचा!
या ओळींवरुनच कविच्या भाषेची जातकुळी लगेच लक्षात येते.

या पुस्तकाची शीर्षक कविता ज्या विभागात आहे तो पहिलाच विभाग आहे.. तो म्हणजे..
‘ ह्युमिकशिवाय वाढत नाहीत मुळ्या…’
कवीचं वास्तव्य बालपणापासूनच ग्रामीण भागात गेलेलं असून कवी याच शेती मातीत वाढलेला आहे, घडलेला आहे. त्याचा पिंडच मुळी या मातीचा आहे. कविला शेती मातीची केवळ आस्थाच नाही तर कविचा शेतीमातीचा खूप जवळून बारीक सारीक अभ्यास आहे. नुसता अभ्यासच नाही तर त्याची या मातीशी घट्ट नाळ जडलेली आहे. कविला शेती मातीची सारी सुख दुःखे माहिती आहेत. त्याला शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांची जाणीव आहे.

आजच्या आधुनिक शेतीचा, सेंद्रिय शेतीचा व रासायनिक शेतीचा केवळ अभ्यासच नाही तर त्याच्या परिणामांची सुध्दा कविला चांगली माहिती आहे, जाणीव आहे. कवीसाठी माती हा काही एखादा निर्जीव पदार्थ नाही आहे. शेतकरी शेतीला मायमाऊलीच मानत आला आहे. शेती ही त्याची ‘अन्नदात्रीच’ आहे. कवी हा फार संवेदनशील असतो. सागर जाधव हा कवी सुध्दा फार संवेदनशील मनाचा कवी आहे. त्यामुळे शेती मातीचे दुःख पाहून तो खरोखरच फार व्यथित आहे.

आपण आपल्या शरीराला काही वेदना झाल्या की त्या वेदनांपासून वाचवण्यासाठी आपण पेनकिलर गोळ्या घेतो. आपल्याला बोलता येते. आपल्या वेदना आपण डॉक्टरला सांगू शकतो. डॉक्टर रुग्णाशी संवाद करु शकतो. म्हणून त्याला रुग्णाची वेदना कळते. पण मातीची वेदना कुणाला कळते? मातीची वेदना कळण्यासाठी मातीशी नाळ जोडलेली असावी लागते. ज्याची अशी नाळ जोडली गेली आहे त्यालाच मातीची वेदना कळते. माती त्याच्याशी बोलत असते. ती त्याच्याशी संवाद साधते. कवीलाही मातीची भाषा कळते. मातीची तक्रार त्याला समजते.

लोकसंख्या वाढली. या वाढणाऱ्या लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी नवीन नवीन उपाय निघाले. आधुनिक संकरित बियाणे निघाले. खूप सारी वेगवेगळी रासायनिक खते निघाली. युरियाचा भरमसाठ मारा सुरु झाला. सुरुवातीला याचा चांगला परिणाम दिसून आला. मात्र नंतर नंतर जमिनीतील उपयुक्त जीवाणूंचा नाश होत गेला. रासायनिक शेतीमुळे जमिनीचा पोत घसरु लागला. तिचा उपजाऊपणा कमी झाला. मातीची सुपीकता कमी होत गेली. मातीची ही भीषण अवस्था कुणाला लवकर कळलीच नाही. मातीची ही तक्रार फक्त आणि फक्त संवेदनशील कवी जाणू शकतो. म्हणून कवीला मातीचे हे दुःख सांगण्याची वेळ आली आहे.. आणि सागर जाधवने या कवितांमधून ती फार पोटतिडकीने मांडली आहे. विविध प्रतिमांमधून अगदी मार्मिक भाषेत त्याने ती वाचकांसमोर ठेवली आहे.

शीर्षक कवितेतील या काही ओळी पहा..
देठापासून कांदा मारतोय पीळ
पातही झालीय
करपून पिवळी
अन् ह्युमिक शिवाय आतली
नाही वाढत पांढरी मुळी
केमिकलचा पाजला ओव्हरडोस
अशक्त झालंय वाफ्याचं पोट
अटळ आहे गर्भपात
तुंबलीय मातीवर बुरशीची साय
म्हणजे एका बाजूने ह्युमिक शिवाय मुळी वाढत नाही. रसायनांच्या अती माऱ्याने माती अशक्त म्हणजे नापिक झाली आहे. हे मातीचं खरं दुखणं आहे. शेतकरी काबाडकष्ट करतो. मातीत हिरवं सोनं उगवतोय. पण त्याच्या कष्टाचं चीज होत नाही. त्याच्या मालाला भाव मिळत नाही. मात्र काहीही न पेरता कष्ट न करता सिमेंटचं जंगल कसं काय वाढतं आहे. हे कविने ‘ सिमेंटचा दगड ‘ या आपल्या कवितेत फार मार्मिक शब्दांत सांगितले आहे बघा…
बाजरी पेरली
बाजरी उगवली
गहू पेरला, गहू उगवला
माझी मागची पिढी खपली!
मी बोरवेलने पाणी शेंदलं,
बुलडोझरने आभाळ कोरले
अन् पेरत गेलो
माझ्यातून हरवलेलं
माणूसपण!
आता मला प्रश्न पडलाय;
न पेरताच कसा आलाय
उगवून हा
सिमेंटचा दगड ?
या संग्रहात मुक्तछंदात अनेक आशयगर्भ कविता आहेत. तसेच अनेक अभंग रचनेतून कविने शेती मातीचे हे गाऱ्हाणे रसिकांपुढे ठेवले आहे. अस्मानी सुलतानी संकटांचा मागोवा घेतला आहे…
आपल्या ‘ हिर्वे धन ‘ या अभंग रचनेतून कवी काय म्हणतो ते पहा>>
ऐका पांडुरंगा
कुणब्याच्या हाका
काहो तुम्ही काखा
वरी केल्या
पाऊस पडेना
भेगाळली भुई
आयुष्याची धुई
बंधाऱ्यात
किती झाले ऋण
फिटता फिटेना
रानात घावेना
हिर्वे धन
शेतकऱ्याने कितीही कष्ट केले तरी तो सततच कर्जात बुडालेला असतो. कर्ज कधी फिटता फिरत नाही. कवी याच संदर्भात आपल्या ‘ देणं ‘ या कवितेत काय म्हणतो बघा.
‘ हंबरणाऱ्या गुरांचे,
गर्भार मातीचे,
कोरड्याठाक विहिरींचे
अन् बंद वीज तारांचे ‘
अशी सगळ्यांचीच देणी पार करुन
हाती राहिलेत अवघे
एकशे साठ रुपये
इंडरेलचा डबा घेण्याइतपत !
शेतकरी आत्महत्या करतो त्याची सुध्दा टिंगल करणारी ही शोषक व्यवस्था.. शेतकऱ्याच्या या समस्या कधीच समजू शकत नाही!
आपल्या ‘ वावराला पाळ्या देऊन बघितल्या ‘ या कवितेत कवी म्हणतो…
बेभाव जाणारे तंबाटे
खुडून टाकले उकाड्यात
तरी मनात साठलेल्या अपेक्षांचा
लाल चिखल
जात नाही मनातून!
जेव्हा मांडतो हिशोब देणाऱ्या हातांचे
तेव्हा हाती उरतं फक्त ‘ केळ ‘
ते ही व्यापाऱ्याने सोलपटून दिलेलं!
कविची टोकदार झंझावाती भाषा काहींना कदाचित शिष्टाचार संमत वाटणार नाही. परंतु ज्याचं जळतं त्यालाच कळतं! कविची हा काळजातून आलेला जाळ आहे.
कवी ‘ मातीच नाही जनली तर ‘ या आपल्या कवितेत म्हणतो…
मातीच नाही जनली
तर खायचं काय ?
धतुऱ्या !
कवीने मातीच्या कण अन् कणाचा अभ्यास केला. रासायनिक शेतीची दुर्दशा टिपली तशीच सेंद्रिय शेतीचीही टिपली आहे. ऑरगॅनिकच्या नावाखाली शेतकरी कसा नागवला जातो ते आपल्याला माहित आहेच..
ऑरगॅनिक शेती
भोपळा भ्रमाचा
पैसाही घामाचा
मातीआड!
शेणाच्या वासाला
आणला पर्याय
जिवाणूंची माय
व्यायली ना !
शासन हमीभाव देत नाही. अनेक क्लृप्त्या वापरुन शेतकरी कसा नागवला जातो ते कविने थोडक्यात पण मार्मिक शब्दांत सांगितले आहे…
निर्यात बंदीला भोके साठ सोळा
सोसते उन्हाळा कांदाचाळ
अंगारा धुपारा लावून पाहिला
नेत्याच्या गाडीला बारा चाके
हा कवितासंग्रह त्याच्या शीर्षकावरून तसा शेती संस्कृतीचं जीवघेणं वास्तव अधोरेखित करीत असला तरी या एकूणच नवी मुल्यव्यवस्था निर्माण होत असलेल्या अशा या भयावह कालखंडात कवीने अतिशय संवेदनशीलतेने आणि पोटतिडकीने काही प्रश्न या कवितांमधून वाचकांसमोर ठेवले आहेत. म्हणूनच या कविता वाचकाला अंतर्मुख करतात. कृषी जीवनासह समग्र सांस्कृतिक व्यवस्थेवर कवी भाष्य करतांना वाचकाला सोलपटून काढतो. हे वाचत असताना आपण विशन्न होतो. ही टोकदार मार्मिक भाषा आपल्या डोक्याला मुंग्या आणते! डोळ्यात झणझणीत अंजन घालते आणि वास्तवाचे भान द्यायला भाग पाडते!
या संग्रहात व्यवस्था, नितीमुल्ये, सामाजिक भान, अंधश्रद्धा, गर्दीचे मानसशास्त्र, राजकारण, जातीभेद अशा अनेक विषयांवर कविने मार्मिक भाष्य केलेले आहे.
वेगवेगळ्या संघटना, त्यांचे झेंडे, त्यांचे मोर्चे यातून सामाजिक भान देणाऱ्या रचना यात अंतर्भूत आहेत.
एके ठिकाणी कवी म्हणतो..
तसा नसतोच चेहरा गर्दीला..
… …
मॉब आंधळा होत जातो
मॉबचा उत्तेजितपणा नसतो
कुण्या एकाच्या हातात
मॉब ठिणगी असतो
मोठा जाळ करण्यासाठी
मॉब बहिरा असतो
ऐकू नाही येत त्याला सायरन
मॉब प्रतिक आहे;
आपल्याच सामाजिक विष्ठेचं
ज्याचा वास आपल्याला नकोसा आहे,
पण निघतो तर आपल्याच आतून
कविच्या सामाजिक जाणिवा किती प्रगल्भ आहेत, याची आपल्याला प्रचिती येते. कवी समाजातील हे काळे ठिपके टिपकागदासारखे टिपून आपल्या समोर हे दाहक वास्तव मांडताना कोठेही संताप, आक्रस्ताळेपणा आपल्याला जाणवत नाही. मात्र आपण हे सर्व वाचल्यावर अस्वस्थ झाल्याशिवाय रहात नाही….
‘ सत्ता झाली मोठी ‘ या कवितेत कवी म्हणतो..
झेंडे झाले मूळ
द्वेषाचे कारण
दंगलीचे रान
माजलेले
फुले-शाहू-भीम
ज्याच्या त्याच्या हाती
कोणती रे क्रांती
युगाची या ?
या संग्रहात समाजातील माणसाच्या ‘ हरवलेल्या दिशांचं ‘ ‘ गाठोडं ‘ कविनं आपल्या समोर उघडून मांडलं आहे! या साऱ्या स्मशानाकडे जाणाऱ्या दिशेने माणूस चालत आहे. या गाठोड्यात आठवणींच्या मुंग्या आहेत, उदासीचे डंख आहेत. भुकेची मस्करी आहे…
झालेली हाड हाड आहे.
वैतागलेल्या पायऱ्या आहेत.
” तणनाशक पाजून खून
केलेल्या लव्हाळाचे गवत!
पिकांच्या अतिपोषणासाठी पुरवलेल्या
खतांचा सुगंधी घमघमाट
-रेंगाळतोय ह्या गाठोड्यात ! “
या संग्रहात ‘ माणूसपणाचं खुजेपण ‘ टिपलं आहे. ‘ ढोंगाचा गाभारा ‘ टिपला आहे.
‘ असं गांव शोधतोय मी ‘
या कवितेत एक सुंदर स्वप्नांचा गाव कवी शोधतो आहे…
एक असं हरवलेलं गांव
शोधतोय मी माझ्यात,
जेथे आहेत..
जिवंत पाण्याचे झरे,
ज्यामुळे सदा फुललेले ओठांवर
माणूसकीचे मळे !
असा हा माणुसकीचे मळे फुलवण्यासाठी आतुर झालेला संवेदनशील कवी. इतका हळवा, सृजनशील, सत्वशील विचारांनी वाचकाला भारावून टाकणारा कवी हा स्वतः मनाने किती निर्मळ, निरागस, निरामय आणि सुंदर असेल.. याची आपण कल्पना करू शकतो ! विशेष म्हणजे या संग्रहातील एकही रचना ‘ स्वांत- सुखाय ‘ या सदरातील नाही. प्रत्येक कवितेला सामाजिक मुल्य आहे. या कविता वाचून वाचकाला सद्वीचारांचा फार मोठा ठेवा गवसल्याचा आनंद मिळणार आहे.

कवितासंग्रह:- माती मागतेय पेनकिलर
कवी:- सागर जाधव जोपुळकर, संपर्क: ९४०४८०५०६८
प्रकाशन:- अथर्व पब्लिकेशन
मूल्य:- रु. १९५/-
परीचय:- तु. सी. ढिकले, ७५८८८२८८३४

⚓️ ‘माती मागतेय पेनकिलर’ असे प्रतिकात्मक शीर्षक असलेला हा संग्रह शेतीसंस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव अधोरेखित करतो. या संग्रहातील कवितांचे ‘शेती’ हे आस्थाकेंद्र आहेच, पण पोस्टमॉडर्न ग्रामीण, मध्यमवर्गीय वाताहतीची एक व्याकूळ कहाणी देखील यात आहे. या कहाणीत माणसांच्या व्यावहारिक जगण्याच्या अनेक भल्याबुऱ्या संहिता सामावल्या आहेत. समकाळाच्या पार्श्वभूमीवर या संहितांचा शोध घेणे अनेकार्थाने महत्त्वाचे ठरते, कारण यात एका संवेदनशील कवीमनाचा सूक्ष्म प्रक्षोभ आहे. विशेषतः नवी मूल्यव्यवस्था प्रस्थापित होत जाण्याच्या काळात कवीने आत्यंतिक आस्थेने, संवेदनशीलतेने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आणि या तात्त्विक प्रश्नांचा आपल्याला प्रतिवाद करता येत नाही. बेसुमार भौतिक प्रतिकृतींनी व्यापलेले आणि विविध अस्मितांच्या आकर्षणात गुरफटलेले आजचे हे जग आहे. कवीने वैयक्तिक सुख दु:खाच्या पलीकडे जावून या जगाचे आंतरिक चित्र आपल्यासमोर ठेवले आहे. हे चित्र जीवनातल्या विसंगतीचे, आंतर्विरोधाचे आणि संभ्रमित भोवतालाचे आहे. म्हणूनच ही कविता वाचताना आपण अंतर्मुख होतो. खिन्न होतो. आपल्या मनात नैराश्याची जाणीव अधिक टोकदार होत जाते. पण हे नैराश्य म्हणजे त्रागा नाही. फ्रस्ट्रेशन नाही. तर आपण सर्वांनीच अपरिहार्यतेणे स्वीकारलेल्या अनिश्चित आणि निसत्व काळाची एक निर्णायक आणि माणूसपणाला प्रतिसाद देणारी जाणीव आहे. कृषीजीवनासह समग्र सांस्कृतिक व्यवस्थेवर अत्यंत प्रभावीपणे आणि स्वत:च्या भाषेत भाष्य करणारी ही कविता आपल्याला अंतर्बाह्य व्यापून राहते. कारण या कवितेचे अनुभवक्षेत्र खूप विस्तृत आणि प्रामाणिक आहे.

पी. विठ्ठल Pi Vitthal
p.vitthal75@gmail.com

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading