Shrutika Bagul's Organic Fertilizer Startup Earns Rs 6 Lakh, Promotes Toxic-Free Farming
शेणखतापासून सेंद्रिय खत, धान्य संरक्षक गोळ्या आणि ‘सीड गणपती’पर्यंत; श्रुतिका बागुल यांचा हरित उद्योजकतेचा प्रवास
गोशाळेतील शेण आणि वनस्पतीजन्य घटकांचा वापर करून नागपूर विदर्भामध्ये सेंद्रिय खत निर्मितीचा अभिनव प्रयोग यशस्वी करत श्रुतिका बागुल यांनी 'वेस्टमधून बेस्ट' ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. 'सप्तरंग रिसर्च अँड ऑरगॅनिक प्रा. लि.'च्या माध्यमातून त्यांनी सेंद्रिय खतांच्या विक्रीतून वार्षिक सहा लाखांहून अधिक उत्पन्न मिळविले असून, विषमुक्त शेती, सुरक्षित अन्नसाखळी आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यासाठी सातत्याने संशोधन सुरू ठेवले आहे. 'स्टार्टअप इंडिया सीड फंड'अंतर्गत मिळालेल्या आर्थिक सहाय्याच्या बळावर त्या आता धान्य संरक्षक गोळ्या, सीड गणपती आणि अन्य अभिनव प्रयोगांच्या माध्यमातून शाश्वत शेतीची नवी दिशा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संशोधनाला पेटेंट मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. यासह त्यांचे शेती व शेतकऱ्यांशी संवादातून आलेले अनुभव…
राजेंद्र घोरपडे
१. आपण विकसित केलेल्या सेंद्रिय शेतीतील स्टार्टअपबद्दल थोडक्यात काय सांगाल?
श्रुतिका बागुल : शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय खतांची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याने या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. आम्ही विकसित केलेल्या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त सेंद्रिय खताची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली असून त्यातून अत्यंत सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. या संशोधनाच्या बळावर आम्हाला ‘स्टार्टअप इंडिया सीड फंड’ अंतर्गत २५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य प्राप्त झाले.
शेतजमिनीत सकस अन्नधान्याची निर्मिती होण्यापासून ते अन्नधान्य ग्राहकांच्या घरापर्यंत सुरक्षितपणे पोहोचेपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेवर आम्ही संशोधन केले आहे. त्यातून विकसित झालेली उत्पादने शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याची जाणीव झाल्यानंतर २०२१ मध्ये ‘सप्तरंग रिसर्च अँड ऑरगॅनिक प्रा. लि.’ या कंपनीची स्थापना केली.
लघु उद्योगाच्या माध्यमातून सेंद्रिय उत्पादनांचा व्यावसायिक स्तरावर विस्तार करण्याचा आमचा संकल्प असून, त्यामुळे अनेकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक ज्ञान यांचा संगम साधत आम्ही घरातच संशोधन प्रयोगशाळा उभारली आहे.
शेतजमिनीचे संवर्धन आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी वनस्पतिजन्य खते, वनस्पतींच्या वाढीसाठी औषधी गुणधर्मयुक्त टॉनिक्स, सेंद्रिय कीटकनाशके तसेच धान्य संरक्षक गोळ्या अशी विविध उत्पादने विकसित केली आहेत. ही उत्पादने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत.
खत निर्मितीच्या उद्देशाने केवळ दोन बैलजोड्यांपासून सुरू झालेली आमची गोशाळा आज ८० गाईंपर्यंत विस्तारली आहे. या माध्यमातून आम्ही पाच प्रकारची खते विकसित केली असून, त्यापैकी दोन खते अर्बन गार्डनिंगसाठी तर तीन खते शेतीसाठी वापरली जातात.
या प्रवासात गोरक्षणातील जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची कमतरता जाणवू लागली. त्यावर उपाय म्हणून आम्ही एक अभिनव तंत्र विकसित केले. त्याच तंत्राच्या आधारे आणखी एक महत्त्वपूर्ण संशोधन करण्यात यश मिळाले असून, सध्या त्या संशोधनाच्या पेटंट प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात आहे. शाश्वत शेती, गोरक्षण आणि सुरक्षित अन्नसाखळी या तिन्ही क्षेत्रांना एकत्रित जोडणारे हे संशोधन भविष्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
२. विषमुक्त शेतीकडे वाटचाल व्हावी या दृष्टीने आपल्या स्टार्टअपचे कार्य सुरू आहे. या संदर्भात आपण आणखी कोणते प्रयोग करू इच्छित आहात ?
श्रुतिका बागुल : सेंद्रिय पद्धतीने धान्याचे उत्पादन घेतले जात असले, तरी त्याची साठवणूकही तितक्याच सेंद्रिय पद्धतीने होणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने विषमुक्त अन्ननिर्मिती साध्य होऊ शकते. साधारणपणे धान्य उन्हात वाळवून साठवले जाते, मात्र ते किडमुक्त ठेवण्यासाठी बोरिक पावडर, टेट्राक्लोराईडसह विविध रसायनांचा वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर आम्ही आमचे चौथे उत्पादन म्हणून ‘धान्य रक्षक गोळ्या’ विकसित केल्या आहेत. या पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आल्या असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपायकारक रसायने वापरण्यात आलेली नाहीत.
दोन गायींपासून सुरू केलेल्या उपक्रमातून आम्ही ‘विठुराया गोशाळा फाउंडेशन’ ही संस्था स्थापन केली असून तिची नोंदणीही करण्यात आली आहे. आता हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर विस्तारण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी सीएसआर निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याच संकल्पनेतून यंदापासून ‘सीड गणपती’ हा अभिनव उपक्रम राबविण्याचा विचार आहे. गोशाळेतील शेणखत आणि मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवात आपण भक्तिभावाने पूजा करतो, मात्र विसर्जनानंतर दिसणारी परिस्थिती मनाला वेदना देणारी असते. त्यामुळे विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत बदल होणे गरजेचे आहे. यासाठी आमचा आता हा नवा प्रयोग आहे.
या उपक्रमांतर्गत पालक, बीट यांसारख्या नैसर्गिक घटकांपासून सेंद्रिय रंग तयार करून गणेशमूर्ती रंगविण्यात येतील. तसेच या मूर्तींमध्ये विविध प्रकारच्या बियांचाही समावेश करण्यात येणार आहे. या गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरीच करण्यात येणार असल्याने पर्यावरण प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल. पर्यावरण संवर्धन आणि सेंद्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणारा हा आमचा नवा स्टार्टअप प्रयोग असेल.
३. सेंद्रीय शेती संदर्भात आपण अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांचे आलेले अनुभव या विषयी थोडक्यात ?
श्रुतिका बागुल : गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील विविध भागांतील शेतकऱ्यांशी संवाद साधताना अनेक वास्तववादी अनुभव समोर आले. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून समजले की, आठ-दहा दिवसांच्या अंतराने फवारणी करणे त्यांना अपरिहार्य वाटते. अन्यथा आंबा टिकून राहत नाही. त्यामुळे रासायनिक फवारण्यांवर त्यांचे मोठे अवलंबित्व निर्माण झाले आहे.
महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना आणखी चिंताजनक बाब समोर आली. अनेक शेतकरी एका दिवशी फवारणी करून दुसऱ्याच दिवशी फळांची तोडणी करतात. इतकेच नव्हे, तर ही फळे ते स्वतःही खातात. त्यामुळे पेस्टिसाइडमुक्त शेतीकडे वळण्याची गरज असल्याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होत असल्याचे आम्हाला दिसून आले.
या रासायनिक शेतीचा फटका केवळ ग्राहकांनाच नव्हे, तर शेतकऱ्यांनाही बसत आहे. हानिकारक रसायनांच्या सततच्या संपर्कामुळे शेतकरी स्वतःच्या आरोग्याशी खेळत आहेत. त्याचबरोबर ग्राहकांनाही नकळत या विषारी घटकांचा सामना करावा लागत आहे.
पूर्वी किराणा दुकानांमध्ये गहू, तांदूळ, डाळी यामध्ये किडे, अळ्या किंवा सोंडे दिसत असत. मात्र आता सुपरमार्केटमध्ये अशा गोष्टी जवळपास दिसतच नाहीत. यामागील कारणांचा शोध घेतला असता काही व्यापाऱ्यांनी सांगितले की, दुकान बंद झाल्यानंतर विशेष प्रकारच्या वायूची फवारणी केली जाते, ज्यामुळे २० ते २५ दिवस किडींचा प्रादुर्भाव होत नाही. पॅकिंगच्या आत असलेल्या धान्यावरही हा वायू परिणाम करत असेल, तर त्याची घातकता किती असेल, याची कल्पना करता येते.
या सर्व अनुभवांमुळे विषमुक्त शेती ही काळाची गरज असल्याचा आमचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. मात्र यासाठी केवळ शेतकरी नव्हे, तर ग्राहकांमध्येही जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कारण शेतकरी हा अन्नदाता आहे. समाज त्याला देवाचे रूप मानतो. अशा परिस्थितीत स्वतःच्या आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणे योग्य नाही, याची जाणीव निर्माण व्हायला हवी.
राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांची मानसिकता मात्र प्रदेशानुसार वेगवेगळी असल्याचे आमच्या लक्षात आले. विदर्भ, जळगाव, रावेर, देवगड, पाचगणी, महाबळेश्वर आणि नाशिक परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना हा फरक प्रकर्षाने जाणवला.
आमच्या अनुभवात सर्वाधिक सकारात्मक प्रतिसाद जळगाव आणि रावेर परिसरातील शेतकऱ्यांकडून मिळाला. ते स्वतःहून सेंद्रिय शेतीकडे वळण्याची इच्छा व्यक्त करत होते. ‘‘आमच्या जमिनी वाचवायच्या आहेत,’’ असे ते आवर्जून सांगत होते.
एकूणच, विषमुक्त शेतीचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती, प्रशिक्षण, नेटवर्किंग आणि सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. शेतकरी, ग्राहक, संशोधक आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यासच सुरक्षित आणि निरोगी अन्नव्यवस्था उभी राहू शकेल.
४. आपल्या सेंद्रीय उत्पादनांच्या बद्दल थोडक्यात…
श्रुतिका बागुल : ‘सप्तरंग रिसर्च ॲण्ड ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड’ची मी फाऊंडर. आम्ही चार प्रकारच्या उत्पादनांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आहोत. हर्बली एनहान्स्ड मॅन्युअर्स, यामध्ये पाच प्रॉडक्ट्स आहेत, प्लांट ग्रोथ एनहान्सर्स यामध्ये एक प्रॉडक्ट आहे, प्लांट प्रोटेक्टर्स यामध्ये आमचे सहा प्रॉडक्ट्स आहेत आणि ग्रेन प्रोटेक्टर टॅबलेट्स यामध्ये आमचे दोन प्रॉडक्ट्स आहेत.
हे जे हर्बली एनहान्स्ड मॅन्युअर्स (Herbaly Enhanced Manures) आहेत, हे आमच्या विठुराया गोशाळा फाउंडेशनचे प्रॉडक्ट आहे जिथे आम्ही पाच वेगळी-वेगळी खते बनवतो. ‘ग्रो फास्ट’ (Grow Fast) आणि ‘ग्रो फास्ट रोज’ (Grow Fast Rose) हे अर्बन गार्डनसाठी आहेत जिथे आपण हे खत डायरेक्टली कुड्यांना देऊ शकतो आणि ‘सप्तरंग’, ‘सप्तरंग ब्लॉसम’ आणि ‘फ्रूट किंग’ हे आमच्या पाण्याच्या माध्यमातून द्यायची खते आहेत. ‘सप्तरंग’ हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथसाठी आहे, ‘सप्तरंग ब्लॉसम’ हे एन्हांस फ्लॉरिंगसाठी आहे आणि ‘सप्तरंग फ्रूट किंग’ हे फ्रूट डेव्हलपमेंटसाठी आहे. तर याचे दोन किलोचे कन्व्हर्जन ५०, ७५ आणि १०० लिटर लिक्विड मॅन्युअरमध्ये होते. हे दोन दिवस ठेवायचे, पाण्यात आणि गूळ मिसळून आणि तिसऱ्या दिवसापासून हे सॉईल ड्रेंचिंग (soil drenching) किंवा स्प्रे फॉर्ममध्ये आपल्याला देता येतं.
आमची ही जी विठुराया गोशाळा आहे, तिथे दूध न देणाऱ्या गाईंचे संगोपन होतं. गावरानी आणि गवळाऊ. शेतकऱ्यांना कधीकधी चाऱ्याचा प्रॉब्लेम येतो, कधीकधी ते दूध नाही देत आणि काही अजून अडचणी असतात, तर त्यामुळे ह्या गाई आमच्याकडे येतात आणि ह्या गाईंचे आम्ही संगोपन करतो आणि यांच्याच खतापासून आणि गोमुत्रापासून हे आपले ५ तयार झालेले वेगळे वेगळे खत आहेत.
ही गोशाळा माझ्या आईने सुरू केलेली आहे. २०१२ पासून या गोशाळेचा सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम आमच्याकडे दोन गाई होत्या आणि दोन गाईंचे रूपांतर आज हळूहळू आमच्याकडे ८० गाई आहेत. ज्यांचा आम्ही संगोपन करतो आहे आणि त्यांच्या याच्यापासून खत आणि शेणखत आणि गोमुत्रापासूनच आपण ही खत बनवलेली आहेत.
श्रुतिका बागुल, नागपूर संपर्क क्रमांक – 96230 11699
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…