नागपूर : विषमुक्त आणि रसायनमुक्त शेतीसाठी संशोधन,देशी गायींचे संवर्धन तसेच सेंद्रिय शेतीसाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याच्या कार्याची दखल घेत विठुराया गोशाळा फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रुतिका बागुल यांना ‘ऑरेंज सिटी आयकॉन अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला.२६ जुलै २०२६ रोजी नागपूर येथे झालेल्या विशेष समारंभात हा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.
“विषमुक्त शेतीसाठी संशोधनाचा ध्यास; श्रुतिका बागुल यांची प्रेरणादायी वाटचाल” या संकल्पनेवर आधारित हा सन्मान त्यांच्या संशोधननिष्ठ कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानला जात आहे.
महिमा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर यांच्या वतीने आयोजित “नारी शक्ती,समाज की प्रगती” या विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.संस्थेच्या संचालिका शीतल पाटील यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभेच्या सदस्या मायाताई एनावटे तसेच इन्फंट इंडिया संस्थेचे संचालक दत्ता भाऊ बरगजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत श्रुतिका बागुल यांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना श्रुतिका बागुल म्हणाल्या, “हा सन्मान केवळ माझा नसून विठुराया गोशाळा फाउंडेशन, सप्तरंगा रिसर्च अँड ऑर्गेनिक प्रा. लि.च्या संपूर्ण टीमचा, मार्गदर्शकांचा, शेतकरी बांधवांचा आणि आमच्या कार्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा आहे. या पुरस्कारामुळे विषमुक्त शेती, देशी गोवंश संवर्धन आणि सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
विठुराया गोशाळा फाउंडेशन आणि सप्तरंगा रिसर्च अँड ऑर्गेनिक प्रा.लि.यांच्या माध्यमातून विषमुक्त शेती,शाश्वत कृषी पद्धती,देशी गोवंश संवर्धन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त सेंद्रिय उत्पादने विकसित करण्याचे कार्य सुरू असून,संशोधन व नवकल्पनांच्या माध्यमातून निरोगी,पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीव्यवस्था उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
या पुरस्कारामुळे विषमुक्त शेतीसाठी सुरू असलेल्या संशोधनाला आणि सेंद्रिय शेती चळवळीला नवी ऊर्जा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
