काय चाललयं अवतीभवती

खोटेपणाच्या काळात कवीने सत्यच सांगायला हवे – अजय कांडर Poet Ajay Kandar Speech

श्रीरामपूर महाविद्यालयातर्फे ‘कवीचा वर्तमान हस्तक्षेप’ विषयावर व्याख्यान

कणकवली – अनिष्ट काम करणाऱ्या व्यवस्थेला खरं सुनावणं हेच कवी लेखकाचं काम आहे. गप्प बसणं म्हणजे अन्यायाला साथ देणे असते. कवीने खोटेपणाच्या काळात त्याच्या लेखनातून सत्य सांगणे हीच क्रांती असते.जे मुके आहेत, ज्यांना दिसत नाही, ज्याना ऐकू येत नाही त्यांचा आवाज होणे हाच कवीचा वर्तमान हस्तक्षेप असतो असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी ‘कवीचा वर्तमान हस्तक्षेप ‘ या व्याख्यानात केले.

स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन अहिल्यानगर श्रीरामपूरतर्फे कवी अजय कांडर यांचे या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या व्याख्यानात बोलताना कांडर यांनी समाजात कवीचा हस्तक्षेप म्हणजे लेखकाने सामाजिक प्रश्नांवर कशी भूमिका घ्यावी, एवढ्या पुरताच तो महत्त्वाचा नसतो तर कवीच लेखन आणि स्वतःच वर्तन या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात असेही आग्रहाने सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. भागवत शिंदे, अंजली म्हस्के, कावेरी कोते आदी उपस्थित होते.

कांडर म्हणाले, ‘वर्तमान’ म्हणजे आपण जगतो तो काळ – त्यातल्या घटना, संघर्ष, आनंद, वेदना. ‘हस्तक्षेप’ म्हणजे तटस्थ न राहणे. समोर अन्याय घडत असताना कॅमेरा बंद करून निघून न जाणे. कवी हा समाजाचा कॅमेरा नसतो, तो समाजाचा नाडी-ठोका असतो. म्हणून कवीचा वर्तमान हस्तक्षेप म्हणजे आजच्या काळात, आजच्या प्रश्नांवर, कवितेच्या माध्यमातून सक्रियपणे बोलणे. ज्ञानेश्वरांनी ‘चांगदेव पासष्टी’ लिहून अहंकारावर प्रहार केला, हा धार्मिक हस्तक्षेप होता. तुकारामांनी ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा’ म्हणत ज्ञानाची मक्तेदारी मोडली, हा सामाजिक हस्तक्षेप होता. कबीर ‘मस्जिद’ आणि ‘मंदिर’ दोन्ही नाकारून उभा राहिला, हा सांस्कृतिक हस्तक्षेप होता. स्वातंत्र्यलढ्यात कुसुमाग्रज ‘क्रांतीचा जयजयकार’ करत होते, तर आणीबाणीत धूमिल ‘मोचीराम’ लिहीत होते. म्हणजे कवी कधीच तटस्थ नव्हता. तो प्रत्येक काळात व्यवस्थेत हस्तक्षेपच करत होता.

पण आज हस्तक्षेपाची गरज अधिक तीव्र आहे. माणूसच माणसाला विसरतोय. बातम्या 24 तास येतात, पण सत्याचा आवाज क्षीण होतोय. गाझामधला बॉम्बस्फोट बातमी सांगते, पण तिथल्या आईच्या दुधात उतरलेली आग फक्त कविता सांगू शकते. शेतकरी आत्महत्या हा आकडा हजारोच्या पटीत आहे. पण सदानंद देशमुख यांच ‘बारोमास लेखन वाचल्यावर’ किंवा देवदासींचा प्रश्न आपल्याला प्रत्यक्ष माहित नसतो, पण तो लेखक राजन गवस यांच ‘ भंडारभोग ‘ लेखन वाचल्यावर लेखकाचा हस्तक्षेप काय असतो हे कळत. त्याचबरोबर नारायण सुर्वे यांची, नामदेव ढसाळ यांची समग्र कविता वाचल्यावर कविता लेखनातला हस्तक्षेप काय असतो हे आपल्याला कळत. कविता ही ज्यांना आवाज नाही त्यांचा आवाज आहे.”

जर वर्तमानात आग लागली असेल, तर कवीने कविता पेटवून ती विझवायची नसते. तर ती आग कुठे लागलीय, कोण लावतंय आणि कोण होरपळतंय हे नेमकेपणाने दाखवायचं असतं. हाच कवीचा खरा वर्तमान हस्तक्षेप असतो ! कवी पाश म्हणतो, “सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना” !! कवीने नवीन स्वप्न समाजाला दाखवायचे असते आणि ती स्वप्न बघणारा समाज फक्त स्वप्न बघूनच मरून जाऊ नये, यासाठीही कार्यरत राहायचं असतं. प्रत्यक्ष लेखनातून आणि प्रत्यक्ष कृतीतून हा सुद्धा एक कवीचा हस्तक्षेप असतो! प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. भागवत शिंदे यांनी करून दिली. सूत्रसंचालन अंजली म्हस्के यांनी केले तर आभार कावेरी कोते यांनी मानले.

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी

Recent Posts

फिदेलसोबत १०० वर्षे : अमेरिकन दादागिरीसमोर न झुकलेल्या क्रांतिकारकाची कहाणी

फिदेल कास्त्रो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय किसान सभेकडून अभिवादन नवी दिल्ली :क्यूबाच्या क्रांतीचे कमांडर-इन-चीफ, जननेते…

27 minutes ago

कोल्हापूरच्या युवा दिग्दर्शकाच्या ‘अनघा’ला जम्मू फिल्म फेस्टिव्हलची पसंती

https://youtu.be/xcTeVoV7ItY कोल्हापूर येथील युवा चित्रकार व दिग्दर्शक स्वप्निल बळवंत पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या “अनघा” या…

10 hours ago

शेतकऱ्याचं जगणं, मरणं आणि मरणानंतरची परवड सांगणारं नाटक : ‘कर्जबळी’

शेतकऱ्याच्या कष्टाला निसर्गाची साथ मिळत नाही, कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका होत नाही आणि अखेर आत्महत्येचा…

11 hours ago

महात्मा फुले विचार आणि कार्य या विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा Mahatma Phule Thoughts and Work Poem Competition

राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गतर्फे आयोजनस्पर्धेसाठी कविता पाठविण्याची अंतिम तारीख :…

1 day ago

जीडीपी वाढतोय, मग आनंद कुठे हरवतोय ? Happiness GDP And Human-Development

आनंदाची 'जीडीपी' आणि आपण ! दरवर्षी मार्च महिन्यात 'जागतिक आनंद अहवाल' जाहीर होतो,काही देश अव्वल…

1 day ago