Poet Ajay Kandar Says Writers Must Speak Truth in an Age of Falsehood
श्रीरामपूर महाविद्यालयातर्फे ‘कवीचा वर्तमान हस्तक्षेप’ विषयावर व्याख्यान
कणकवली – अनिष्ट काम करणाऱ्या व्यवस्थेला खरं सुनावणं हेच कवी लेखकाचं काम आहे. गप्प बसणं म्हणजे अन्यायाला साथ देणे असते. कवीने खोटेपणाच्या काळात त्याच्या लेखनातून सत्य सांगणे हीच क्रांती असते.जे मुके आहेत, ज्यांना दिसत नाही, ज्याना ऐकू येत नाही त्यांचा आवाज होणे हाच कवीचा वर्तमान हस्तक्षेप असतो असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी ‘कवीचा वर्तमान हस्तक्षेप ‘ या व्याख्यानात केले.
स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन अहिल्यानगर श्रीरामपूरतर्फे कवी अजय कांडर यांचे या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले. रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या व्याख्यानात बोलताना कांडर यांनी समाजात कवीचा हस्तक्षेप म्हणजे लेखकाने सामाजिक प्रश्नांवर कशी भूमिका घ्यावी, एवढ्या पुरताच तो महत्त्वाचा नसतो तर कवीच लेखन आणि स्वतःच वर्तन या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात असेही आग्रहाने सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक प्रा. डॉ. भागवत शिंदे, अंजली म्हस्के, कावेरी कोते आदी उपस्थित होते.
कांडर म्हणाले, ‘वर्तमान’ म्हणजे आपण जगतो तो काळ – त्यातल्या घटना, संघर्ष, आनंद, वेदना. ‘हस्तक्षेप’ म्हणजे तटस्थ न राहणे. समोर अन्याय घडत असताना कॅमेरा बंद करून निघून न जाणे. कवी हा समाजाचा कॅमेरा नसतो, तो समाजाचा नाडी-ठोका असतो. म्हणून कवीचा वर्तमान हस्तक्षेप म्हणजे आजच्या काळात, आजच्या प्रश्नांवर, कवितेच्या माध्यमातून सक्रियपणे बोलणे. ज्ञानेश्वरांनी ‘चांगदेव पासष्टी’ लिहून अहंकारावर प्रहार केला, हा धार्मिक हस्तक्षेप होता. तुकारामांनी ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा’ म्हणत ज्ञानाची मक्तेदारी मोडली, हा सामाजिक हस्तक्षेप होता. कबीर ‘मस्जिद’ आणि ‘मंदिर’ दोन्ही नाकारून उभा राहिला, हा सांस्कृतिक हस्तक्षेप होता. स्वातंत्र्यलढ्यात कुसुमाग्रज ‘क्रांतीचा जयजयकार’ करत होते, तर आणीबाणीत धूमिल ‘मोचीराम’ लिहीत होते. म्हणजे कवी कधीच तटस्थ नव्हता. तो प्रत्येक काळात व्यवस्थेत हस्तक्षेपच करत होता.
पण आज हस्तक्षेपाची गरज अधिक तीव्र आहे. माणूसच माणसाला विसरतोय. बातम्या 24 तास येतात, पण सत्याचा आवाज क्षीण होतोय. गाझामधला बॉम्बस्फोट बातमी सांगते, पण तिथल्या आईच्या दुधात उतरलेली आग फक्त कविता सांगू शकते. शेतकरी आत्महत्या हा आकडा हजारोच्या पटीत आहे. पण सदानंद देशमुख यांच ‘बारोमास लेखन वाचल्यावर’ किंवा देवदासींचा प्रश्न आपल्याला प्रत्यक्ष माहित नसतो, पण तो लेखक राजन गवस यांच ‘ भंडारभोग ‘ लेखन वाचल्यावर लेखकाचा हस्तक्षेप काय असतो हे कळत. त्याचबरोबर नारायण सुर्वे यांची, नामदेव ढसाळ यांची समग्र कविता वाचल्यावर कविता लेखनातला हस्तक्षेप काय असतो हे आपल्याला कळत. कविता ही ज्यांना आवाज नाही त्यांचा आवाज आहे.”
जर वर्तमानात आग लागली असेल, तर कवीने कविता पेटवून ती विझवायची नसते. तर ती आग कुठे लागलीय, कोण लावतंय आणि कोण होरपळतंय हे नेमकेपणाने दाखवायचं असतं. हाच कवीचा खरा वर्तमान हस्तक्षेप असतो ! कवी पाश म्हणतो, “सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना” !! कवीने नवीन स्वप्न समाजाला दाखवायचे असते आणि ती स्वप्न बघणारा समाज फक्त स्वप्न बघूनच मरून जाऊ नये, यासाठीही कार्यरत राहायचं असतं. प्रत्यक्ष लेखनातून आणि प्रत्यक्ष कृतीतून हा सुद्धा एक कवीचा हस्तक्षेप असतो! प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. डॉ. भागवत शिंदे यांनी करून दिली. सूत्रसंचालन अंजली म्हस्के यांनी केले तर आभार कावेरी कोते यांनी मानले.
अवकाळी पाऊस, हवामान बदल, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेती अभूतपूर्व संकटात सापडली आहे.…
मुंबई कॉलिंग राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या कामकाजाचा हिशेब मागण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा…
वाचनकट्टा प्रगल्भ वाचक स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा उत्साहात गौरव छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज…
हजारो रुपयांचा नैवेद्य अर्पण करणारा भक्त आणि प्रेमाने एक तुळशीपत्र वाहणारा भक्त—भगवंताच्या दृष्टीने यांपैकी मोठा…
विशेष आर्थिक लेख रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने नुकताच देशातील आर्थिक सद्यस्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला.…
स्नेहलता मारुती पाटील सन्मानार्थ पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक फाऊंडेशन द्वारा आयोजित २रे स्त्रीवादी साहित्य संमेलन यामध्ये…