बार्शी – येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने दरवर्षी आषाढ महिन्यात पहिल्या रविवारी कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे औचित्य साधून कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहास मेघदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षीही हा सोहळा होणार असून यासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब घावटे यांनी केले आहे.
यावेळी माजी अध्यक्ष मुकुंदराज कुलकर्णी, दत्ता गोसावी, रामचंद्र इकारे, प्रा. रविराज फुरडे, उपाध्यक्ष सुमन चंद्रशेखर, कार्याध्यक्ष प्रकाश गव्हाणे, सचिव अर्चना पोळ, सदस्य शिवानंद चंद्रशेखर आदी मान्यवर उपस्थित होते.
गेली 35 वर्ष कवी कालिदास मंडळ साहित्याच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे या हेतूने मंडळाच्या वतीने दरवर्षी नवोदित कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहाला मेघदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षीही जानेवारी 25 ते डिसेंबर 25 या कालावधीत प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहास यावर्षीच्या कालिदास महोत्सवामध्ये मेघदूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
हे पुरस्कार पं. ना. कुलकर्णी यांचे स्मरणार्थ ज्येष्ठ साहित्यिक मुकुंदराज कुलकर्णी यांचे वतीने व मातोश्री श्रीमती जिजाबाई गव्हाणे यांचे स्मरणार्थ ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश गव्हाणे यांच्या वतीने देण्यात येणार आहेत. यावर्षीच्या मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन कवी कालिदास मंडळाने केले आहे. तरी काव्यसंग्रहाच्या तीन प्रती 20 जूनपर्यंत स्वतःचे छायाचित्र व अल्प परिचययासह पाठवाव्यात.
काव्यसंग्रह पाठविण्याचा पत्ता –
श्री. प्रकाश गव्हाणे, ईश्वरी अभ्यासिका, पाटील प्लॉट , शिवाजी नगर बार्शी.
ता. बार्शी जि. सोलापूर पिनकोड 413 411 मोबाईल नंबर 9763466830
