मुंबई : लेखक डॉ. मिलिंद न. जोशी यांच्या चार नव्या पुस्तकांचा अनौपचारिक प्रकाशन सोहळा विलेपार्ले येथे उत्साहात पार पडला. साहित्यिक अशोक बेंडखळे यांच्या हस्ते पुस्तकांचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार अशोक पानवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी सहित प्रकाशन प्रकाशित ‘भ्रमंती साठीनंतरची’ (भाग १ व २ – प्रवासवर्णन), ‘आनंद संचित’ (काव्यसंग्रह) आणि ‘हलकं फुलकं तरीही बोलकं’ (विनोदी लेखसंग्रह) या चार पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना अशोक बेंडखळे यांनी डॉ. जोशी यांच्या लेखनातील सूक्ष्म निरीक्षणशक्ती, अनुभवसंपन्नता आणि वाचकाशी सहज नाते जोडणाऱ्या शैलीचे विशेष कौतुक केले. अशोक पानवलकर यांनी विविध साहित्यप्रकारांमध्ये डॉ. जोशी यांनी सातत्याने केलेल्या लेखनाचा गौरव करत त्यांच्या साहित्यनिर्मितीतील वैविध्य अधोरेखित केले.
पुस्तकांचे प्रस्तावनाकार रामदास कामत आणि प्रसाद कुळकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘भ्रमंती साठीनंतरची’ या प्रवासवर्णनातील अनुभवसमृद्धता, ‘आनंद संचित’ मधील संवेदनशील काव्यविश्व आणि ‘हलकं फुलकं तरीही बोलकं’ या लेखसंग्रहातील सहज, मिश्कील व आशयगर्भ लेखनशैलीचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. मिलिंद न. जोशी यांनी आपल्या लेखनामागील प्रेरणा आणि साहित्यप्रवासाविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय आणि आभारप्रदर्शन ही तिहेरी जबाबदारी सौ. मानसी जोशी यांनी समर्थपणे पार पाडली.
काय आहे या चार पुस्तकात
भ्रमंती साठीनंतरची भाग1, सूत्र: प्राचीन स्थळ दर्शन. कुठेही जा, परंतु हे पर्यटन केवळ विविध ठिकाणे 'बघणे' इथपर्यंतच मर्यादित असता कामा नये. त्या ठिकाणाचा अभ्यास करणे, त्याचा इतिहास समजून घेणे, त्याचा वर्तमानाशी अर्थ लावणे आणि आपल्याकडील समृद्ध वारशाचा अभिमान बाळगणे ही प्रक्रिया झाली, तरच त्या पर्यटनाला अर्थ आहे. असा समृद्ध वारसा महाराष्ट्रात व देशातही भरपूर आहे. या अनुषंगाने डॉ. मिलिंद जोशी यांचे हे पुस्तक पथदर्शी ठरेल यात शंका नाही. लेखकाने वयाच्या साठीनंतर केलेली भ्रमंती यात शब्दबद्ध केली असली आणि म्हणून पुस्तकाचे नाव 'भ्रमंती साठीनंतरची' असे असले तरी डोळसपणे भटकणाऱ्या कोणत्याही वयोगटातील पर्यटकाला हे पुस्तक उत्तम मार्गदर्शक ठरेल हे उघड आहे.
भ्रमंती…भाग 2,सूत्र: अर्वाचीन व….दर्शन. जर मुद्रित साहित्यातील माहिती आणि लेखनशैली वेधक आणि वेचक असेल तर वाचक मंडळी या सर्व माध्यमांकडे परत येतात. डॉ. मिलिंद जोशी यांचे 'भ्रमंती साठीनंतरची' (भाग दोन) हे पुस्तक असेच परत मुद्रित साहित्याकडे जाण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करते. भ्रमंतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी 'अर्वाचीन व समकालीन स्थलदर्शन' असे सूत्र ठेवले आहे. त्यामुळे कोकणाबरोबरच इतर काही ठिकाणांवरचे लेखही त्यात आले आहेत. मराठी भाषेत पर्यटनावर पुस्तके भरपूर आहेत. परंतु डॉक्टर मिलिंद जोशी यांची तपशीलात्मक आणि खुसखुशीत लेखनशैली फार कमी वेळा अनुभवता येते.
हलकं फुलकं तरीही बोलकं (18 विनोदी लेख). निरीक्षण करणं हा एक भाग झाला, ते अचूक तंतोतंत करणं ही त्याच्या पुढची पायरी, ती निरीक्षणं शब्दांत रेखाटणं हा एक भाग आणि ती इतक्या जिवंतपणे रेखाटणं ही पुढची पायरी. हे सगळं अतिशय खुसखुशीतपणे मांडणं सोपं नाही. हे सगळे लेख वाचताना लेखकाची भाषा कुठेही जडजंबाळ होत नाही तर कधी उत्स्फूर्त, कधी खुद्कन तर कधी खुसखुसु हसवत हे ललितबंध आपल्याला खूप आनंद देऊन जातात.
आनंद संचित, (कविता संग्रह) या संग्रहात एकूण ३० कविता आहेत. सर्वच कविता वाचनीय आहेत. प्रत्येक कवितेत विषयाचे वैविध्य हे सुद्धा या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे. डॉ. मिलिंद जोशी यांचा हा पहिला काव्यसंग्रह निश्चितच वाचकांच्या; खास करून कविता प्रेमींच्या पसंतीस उतरेल याची खात्री वाटते. त्यांच्या ह्या क्षेत्रातील पुढील वाटचालीला माझ्या खूप खूप मनापासून शुभेच्छा.
