May 9, 2026
‘ब्युटी ऑफ लाईफ : द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर’ पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आशा नेगी यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचे प्रतीकात्मक चित्रण
Home » वेदनेशी वाद न घालणारा ‘आशा’ वाद…
मुक्त संवाद

वेदनेशी वाद न घालणारा ‘आशा’ वाद…

कॅन्सर हा केवळ शरीराचा आजार नसतो; तो मन, नाती, आशा आणि आत्मविश्वास यांचीही कठोर परीक्षा असतो. अशा जीवघेण्या संघर्षात अनेक जण खचून जातात, तर काही जण वेदनेच्या डोळ्यात डोळे घालून जगण्याचा नवा अर्थ शोधतात. लेखिका आशा नेगी यांचे ‘ब्युटी ऑफ लाईफ : द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर’ हे पुस्तक अशाच एका अदम्य स्त्रीच्या आत्मसंघर्षाची, सकारात्मकतेची आणि अंतर्मनाच्या अपार शक्तीची जिवंत गाथा आहे. वेदनेचा आक्रोश न करता, नियतीशी तक्रार न करता, शांत धैर्याने मृत्यूच्या सावटावर मात करणाऱ्या स्त्रीचा हा प्रवास प्रत्येक वाचकाला आत्मबळ, संयम आणि आशावादाचा नवा अर्थ शिकवतो.

प्रा. डॉ. वैभव ढमाळ, पुणे

मरणप्राय वेदनेने ओथंबलेला एखादा जीवनानुभव आपल्याला जीवनाचे फार मोठे तत्त्वज्ञान शिकवतो. ऐकलेले असंख्य अनुभव आणि वाचलेली अनेक पुस्तके बाजूला सारून हा जीवनानुभव सशक्तपणे एक नवे तत्त्वज्ञान शिकवतो. अनंत अनिश्चिततांनी भरलेले मानवी जीवन कधी कोणते संकट आपल्या पुढ्यात टाकेल, याचा अंदाज बांधणे अशक्य असते. नियतीने समोर दत्त म्हणून उभ्या केलेल्या प्रश्नाला डावलणे, हे तर त्याहून अशक्य ! आपण प्रत्येक जण याची अनुभूती कायम घेत असतो. हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे. नियतीच्या चक्रव्यूहाला भेदण्याची शक्ती प्रत्येकात असतेच असे नाही… तो चक्रव्यूह भेदून विजयी होण्याचे तंत्र प्रत्येकाला जमतेच असेही नाही. मग काही लोक नियतीच्या या फेऱ्यात भेलकांडत गलितगात्र होतात. लढण्याचे शस्त्र टाकून देतात आणि अगतिक होतात.

परंतु अशी कित्येक माणसं आहेत, जी प्रारब्धाच्या संकटांवर उलटी चालून जातात. स्वार होतात. सगळं बळ एकवटतात आणि ‘नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला उत्तर देतात’. अशा लढवय्या लोकांवर त्यांची जीवनकथा सांगण्याची जबाबदारी असते. आपण काय अनुभवले, तो लढा काय होता, त्यातून काय गवसले, हे सारे सांगायला हवे. अंधारमय प्रारब्धातील अनिश्चित वाटांवर अनुभवकथनांचे हे छोटे छोटे दिवे मागून येणाऱ्यांना निश्चितपणे प्रकाश दाखवतील. इतर वाटसरूंचे मनोबल वाढवतील आणि त्यांच्या जीवन संघर्षाला बळ देतील.

लेखिका आशा नेगी यांचे जीवन आनंदात, समाधानात व्यतीत होत असताना त्यांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान व्हावे, हा त्यांच्यावर एक फार मोठा आघात होता मुळात त्या स्वतंत्र विचारांच्या आणि बाण्याच्या आधुनिक स्त्री आहेत. कुटुंबवत्स गृहिणी आणि यशस्वी उद्योजिका अशा सगळ्या आघाड्या त्या आनंदा सांभाळतात. आवड म्हणून मॉडेलिंगचा छंद जोपासतात. उत्तम दर्जाचे आणि सौंदर्यासक्त जीवन जगणारी मुलगी, पत्नी ते आई अशा भूमिका पार पाडताना फुलांच्या पायघड्यांवरून चालताना अचानकपणे विंचवाचा दंश व्हावा तसा कॅन्सर त्यांच्या जीवनात आला. परंतु जिचा जन्मच गोठ्यात झाला होता आणि आईने खुरप्याने नाळ कापली होती, त्या आशा नेगींना जीवनसंघर्षांचे हे बाळकडू जन्मतःच मिळालेले होते.

कॅन्सरचा लढा अनुभवलेली असंख्य माणसे आपल्या सभोवती आहेत. त्यातील अनेकांनी आपले अनुभव पुस्तकांच्या रूपाने लिहून ठेवले आहेत. अशी पुस्तके सर्व वाचकांना एक अदृश अनुभवविश्व उलगडून दाखवतात. विशेषतः ज्यांना असा असाध्य आजार झाला आहे, त्यांना अशा पुस्तकांचा फार उपयोग होतो. ज्या वेदनेतून आपण जात आहोत, तो लढा समजून घेताना हा पुढच्यांचा सल्ला मागच्यांसाठी फार मोलाचा असतो. परंतु त्याचबरोबर इतर सर्वसामान्य वाचकांसाठीदेखील अशा अनुभवसमृद्ध पुस्तकांचे वाचन जाणिवांचा परीघ विस्तारणारे असते.

आशा नेगी यांचे ‘ब्युटी ऑफ लाईफ: द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर’ हे पुस्तक याच प्रकारातील आहे. मुनव्वर राणा यांचा एक शेर आहे,
वह दर्द दे जो रातों को सोने न दे हमें,
वह ज़ख्म दे जो सबको दिखाने के काम आए।
कॅन्सरचा आजार आणि उपचारादरम्यानच्या वेदना, अडचणी यांचा सामना करताना आशाजींनी एक जिवाभावाची सुहृद निवडली. त्या तिला रोज काय घडतंय, त्यांना काय वाटतंय, त्यांची परिस्थिती आणि मनःस्थिती कशी आहे, हे सारं सांगायच्या. ही मैत्रीण म्हणजे त्यांची डायरी. जी पुस्तकाच्या रूपाने आज आपल्यासमोर आली आहे. त्या आठ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी जी शारीरिक, भावनिक, मानसिक स्थित्यंतरे अनुभवली ती त्यांनी दररोज न कंटाळता नोंदवली आहेत. सर्वसाधारणपणे माणूस त्या काळात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या इतका खचलेला असतो, की तो कुणाशीही बोलण्याच्या मनःस्थितीत नसतो. अशा काळात स्वतःकडे पाहत, इतक्या सूक्ष्म तपशिलांसह नोंदी करणे ही गोष्टच अद्भुत आहे. त्या नोंदीमुळेच हे पुस्तक आकाराला येऊ शकले. त्यामुळे आशा नेगी यांचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.

हे अनुभवकथन त्यांच्या जीवनातील एका लहानशा परंतु अत्यंत वेदनादायी कालखंडाचा अध्याय मांडणारे आहे. डायरीच्या फॉर्ममधील हे पुस्तक नेहमीच्या अनुभवकथनांपेक्षा खूपच वेगळी अनुभूती देते. फेब्रुवारी २०२३ ते सप्टेंबर २०२३ हा ८ महिन्यांचा प्रवास जसा घडला तसा या पुस्तकात आपल्याला वाचता येतो. डायरीतला प्रत्येक दिवस कॅन्सरशी दिलेला लढा नव्याने दाखवतो. आशा नेगी मात्र दरदिवशी तितक्याच धैर्याने, एकांडेपणाने त्या वेदनांचा सामना करतात. मदतीला अनेक जण होते. नवरा, नातेवाईक, मित्र परंतु ती कोणती अंतःप्रेरणा होती, कोण जाणे? आशा नेगी यांनी हा लढा एकटीने लढायचे ठरवले. खरे तर वेदना ही वाटून घेण्याची गोष्टच नाही. ती ज्याची त्यालाच भोगावी लागते. खोल आत्म्यापर्यंत पोहोचणारी दुःखाची तीव्र कळ दुसऱ्याला सांगून अनुभवता येईल असे नसते. वेदनेला हा शापच आहे, ती वाटून घेता येत नाही. निदान नातेवाईक, मित्रांचे सहकार्य पण तेही न घेता आशा नेगी यांनी तो ८ महिन्यांचा सत्त्वपरीक्षा पाहणारा प्रवास केवळ स्वतःच्या मनोबलावर यशस्वीपणे पूर्ण केला. या संपूर्ण अनुभवकथनामध्ये कुठेही आक्रंदन नाही, नशिबाला शिव्या शाप नाहीत, कोणाला दोष नाही. जे नियतीने समोर मांडले त्याला तितक्याच सक्षमपणे आणि सकारात्मकतेने त्यांनी तोंड दिले. कॅन्सरला परतवून लावले आहे. आशा जिंकली, वेदना हरली !

१ फेब्रुवारी २०२३ पासून ही डायरी आपल्याला वृत्तांत सांगायला सुरुवात करते. आजाराचा संशय ते तपासण्या आणि मग कॅन्सरचे निश्चित निदान होणे, हा २० फेब्रुवारी २०२३ पर्यंतचा प्रवास म्हणजे एका शांत सुंदर प्रवासाचे अचानक एखाद्या लढ्यात रूपांतरित होण्याची गोष्ट आहे. ही तर केवळ सुरुवात होती मुख्य लढाई आणखी मोठी होती. त्यानंतर हा प्रवास ८ महिने चालला. सुरुवातीच्या या टप्प्यात हे सर्व लिहिताना आशा नेगी कमालीच्या गडबडलेल्या तरीही समजूतदार भासतात. कसल्या तरी अघटिताची चाहूल लागताक्षणी, परंतु गोंधळून न जाता सावधपणे संकटाकडे पाहणे व डोळे मिटून न घेता समस्येचा शोध घेणे किती गरजेचे आहे, हे पुस्तक वाचल्यावर आपल्यालाही जाणवेल.

त्या लिहितात, “कधीकधी काही गोष्टी स्वीकारण्यासाठी तुमचे मनदेखील तयार नसते. या सगळ्या गोष्टी सांगून मला घरातलं वातावरण बिघडवायचं नव्हतं. आत्ताची वेळ ही शांतचित्ताने विचार करून निर्णय घेण्याची आहे. म्हणून सध्या तरी ‘एकला चलो रे’ असा मी विचार केला.” कॅन्सर झाल्याचे ऐकून कुटुंबातील सर्वच सदस्य दुःखी होतील त्यापेक्षा काही काळ हा आजार आपल्यापर्यंतच ठेवावा, असा विचार त्यांनी केला. संकटाची चाहूल किती सावधपणे घ्यावी, कुटुंबाचा व प्रियजनांचा विचार आधी करावा, अशी समंजस शिकवण आशा नेगी यातून देतात. त्या सांगतात, “जोपर्यंत आपण डॉक्टरांना भेटत नाहीये तोपर्यंत आपण काहीच विचार करायचा नाही आणि जमेल तेवढे शांत राहायचे. कारण बऱ्याच गोष्टींना आपण स्वतःहून आमंत्रण देणे हा मनाचा गुणधर्म असतो आणि अगदी कठीण परिस्थितीत त्यावर मात करण्यासाठी विचारांची दिशा बदलणे आवश्यक असते.”

मनातील भीती आणि गोंधळ केवळ स्वतःलाच नव्हे तर संपूर्ण परिवाराला देखील दुःखाच्या गर्तेत ढकलून देऊ शकतो. आपल्याला झालेला आजार समजू घेऊन, त्याचा समंजस स्वीकार करून उपचारांना सामोरे जाण्याचा आशा नेगी यांचा धीरोदात्त स्वभाव या सर्व प्रसंगात प्रकर्षाने जाणवतो. यानंतरचा उपचारांच्या विविध पर्यायांचा शोध, आयुर्वेद की सर्जरी, की आणखी काही, हे सारे अतिशय गंभीरपणे त्यांनी हाताळले. विविध पर्यायांचा विचार केल्यावर घेतलेला सर्जरीचा निर्णय आणि मग उपचारांचा जीवघेणा प्रवास, हे सारे लेखिका आशा नेगी यांनी अत्यंत संयतपणे आणि कमालीच्या धैर्याने मांडले आहे. या सर्व प्रक्रियेदरम्यान त्यांना कित्येकदा मानसिक ताण, शारीरिक वेदना, एकटेपणा, हतबलता यांचा अनुभव आला. सतत मुलींचा व हळव्या नवऱ्याचा विचार करणे आणि या आजाराचा दाह त्यांच्यापर्यंत पोचू नये म्हणून झालेली घालमेल, असे अनेक प्रसंग त्यांनी प्रामाणिकपणे नोंदवले आहेत. मात्र या सर्व प्रसंगादरम्यानचा त्यांच्या संकटाकडे सावधपणे पाहण्याचा व अंतर्मनातील आशावाद हरवू न देण्याचा लढवय्या दृष्टिकोन प्रत्येक वाचकाला बळ देणारा आहे. समस्या आहेत म्हणजे उत्तरही असणारच आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत शांतपणे विचार केला तर मार्ग निघतोच, असे त्यांचे विचार अंतर्मनाच्या अगाध आणि अफाट शक्तीचे दर्शन घडवणारे आहेत.

या पुस्तकाचे प्रत्येक पान वेदनांचा, वैद्यकीय उपचार प्रक्रिया, दैनंदिन जीवनातील समस्या आणि लेखिकेच्या मानसिक उलघालीचे कित्येक अध्याय उलगडते. तरीही या पुस्तकाचे वाचन तुम्हाला दुःखी करत नाही अथवा मनात भीतीही निर्माण करत नाही. याउलट या डायरीवजा पुस्तकाचे वाचन मनामध्ये प्रचंड आशावाद निर्माण करते. समस्या असणारच, तुम्ही शांत-चित्त राहिलात आणि लढायचे ठरवले तर उत्तर सापडणारच, असा सकारात्मक धडा मिळतो. अंतर्मनाची शक्ती एकवटली तर कोणत्याही संकटावर स्वार होता येते. अज्ञाताला सामोरे जाताना आपल्या स्वतःच्या क्षमतांची ओळख असायला हवी. अशा कठीण वाटेवर सकारात्मकता आणि समजूतदारपणा आपला तोल सांभाळते. कारण जीवघेण्या संकटात तुम्ही दुःखाच्या दरीकडे कोसळता की आशावादाच्या बाजूने उभे राहता, यावरच लढाईचा निकाल अवलंबून असतो. हेच या लढ्याचे व पुस्तकाचे सार आहे.

हे सारे केवळ प्रास्ताविकात वाचून आपल्याला पुरेसे शाश्वत बळ मिळेल, असे मला वाटत नाही. कारण तत्त्वज्ञान आणि जीवनानुभव यातला मूळ फरक हाच असतो. केवळ तत्त्वज्ञानाने परिपूर्ण अशा काही ओळींचे वाचन आपल्याला तेवढ्यापुरते भारावलेपण देईल, परंतु ‘ब्युटी ऑफ लाईफः द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर’ या पुस्तकाचे सजग आणि सखोल वाचन हे मात्र तुम्हाला अंतर्बाह्य बदलवून टाकणारा अनुभव देईल, हे नक्की. हे पुस्तक केवळ कॅन्सरग्रस्तांसाठी नक्कीच नाही. ही एका लढ्याची गाथा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाचा लढा जीवनातील विविध समस्यांसोबत सुरूच असतो. कोणीच निवांत, समस्यारहित नाही. हे पुस्तक वाचकांना आत्मबळाची जाणीव करून देईल. कोणत्याही समस्येकडे पाहण्याचा समंजस दृष्टिकोन देईल. संकट समयी आत्मभान जागृत करेल. संकटाचे भीतियुक्त मनाने, सावध विचारांनी हसून स्वागत कसे करावे, हे सांगेल. जीवनाच्या लढाईत एवढा उपयुक्त गनिमी कावा आपल्याला शिकायलाच हवा. प्रत्येकाला स्वतःची लढाई लढावीच लागते. अशा वेळी आपल्या अंतर्मनातील सुप्त बळाला आर्त साद घालून लढाईसाठी सज्ज होण्यासाठी, अशी पुस्तके निश्चितपणे मदत करतात.

कॅन्सर- आजार उपचार या विषयांवरील अनेक पुस्तके मराठी, इंग्रजीसह विविध भाषांमध्ये उपलब्ध आहेत. तरीही कॅन्सरच्या लढ्याबाबतचे डायरीच्या फॉर्ममधील व एवढे सशक्त अनुभवकथन विशेष लक्षणीय आहे.

आज अनेक आजारांनी आधुनिक मानवी जीवन ग्रासले आहे. मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर इतर विविध आजार यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे, यावर बरेच काही अवलंबून असते. लहानांच्या आरोग्य समस्या, प्रौढांचे व स्त्रियांचे आजार, वृद्धांचे न चुकणारे आजार यांनी आपण सर्व जण व्यापलो आहोत. अशा वेळी वैद्यकीय सुविधांबरोबरच या आरोग्य समस्यांचा एक समंजस स्वीकार आपण शिकायला हवा. त्यासाठी अशी पुस्तके मार्गदर्शक ठरतील. आजार कसा हाताळायचा, त्यायोग्य स्वतःचे कुटुंब व स्वतःचा आनंद कसा संतुलित ठेवता येईल, हे शिकणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी समुपदेशन करणारे हे पुस्तक आहे. व्यामिश्र जीवनात आनंद व दुःख, सुख आणि वेदना हातात हात घालून येणारच. आनंद हवाच पण वेदनेशिवाय जीवन अर्थहीन आहे. वेदना संपली तर संघर्ष संपेल. संघर्षहीन जीवन काय कामाचे? यालाच म्हणतात ब्युटी ऑफ लाईफ! ती अनुभवण्यासाठी वाचकांनी हे पुस्तक जरूर वाचावे.

पुस्तकाचे नाव – ब्युटी ऑफ लाईफ द डायरी ऑफ अ कॅन्सर सर्व्हायवर
लेखिका – आशा नेगी
प्रकाशक – न्यु इरा पब्लिकेशन, पुणे 8798202020
किंमत – ३५० रुपये

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

मुलं गेली अवकाशात’ : गोष्टींचा गुच्छ!

अस्वस्थ मनांचा हुंकार-हंबर

भाषिक व्यवहारातील स्त्रीचे दुय्यमत्व

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!