लोकाभिमुख प्रशासनाची जाणीव ठेवून कार्य करावे – चंद्रकांतदादा पाटील
पुणे : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) या देशातील प्रख्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची जडणघडण करणाऱ्या संस्थेमध्ये भारतीय नागरी सेवा तसेच भारतीय वनसेवा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम २६ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता.
सन २०२५ मधील भारतीय नागरी सेवा परीक्षेत संस्थेच्या २५ विद्यार्थ्यांनी, तर भारतीय वनसेवा परीक्षेत १४ विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांच्या नेतृत्वाखाली हे यश साकार झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना मंत्र्यांनी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदारीची जाणीव ठेवून समाजकल्याण व लोककल्याणाच्या उद्देशाने कार्य करावे, असे आवाहन केले. आपल्या कार्यातून लोकाभिमुख आणि लोकप्रिय अधिकारी म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात संस्थेच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आज प्रशासन क्षेत्रात प्रवेश करणारे विद्यार्थी भविष्यात देशाचे प्रशासन अधिक सक्षमपणे कार्यान्वित करत राष्ट्रनिर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी डॉ. शैलेन्द्र देवळाणकर, उच्च शिक्षण विभागाचे संचालक, डॉ. बोऱ्हाडे, सहसंचालक (पुणे), डॉ. राऊत, सहसंचालक (मुंबई) तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. पंचीकर यांनी केले.
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील जाणकार म्हणून ओळख असलेले डॉ. शैलेन्द्र देवळाणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. समाजकल्याण व लोककल्याणाचा दृष्टिकोन जोपासत आदर्श प्रशासन उभारण्यात विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असा संदेशही यावेळी देण्यात आला.
संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी पर्वात मिळालेले हे यश विशेष उल्लेखनीय मानले जात असून, एसआयएसीची कामगिरी प्रशासकीय प्रशिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
