Manusakichi Antyayatra Book Review | Pradeep Badde’s Powerful Reflection on Humanity
समाजातील वाढती असंवेदनशीलता,तुटत चाललेली नाती,हरवत जाणारे गावपण आणि माणुसकीच्या पुनर्जन्माची आशा यांचा प्रभावी वेध घेणारा कवी प्रदीप बडदे यांचा 'माणुसकीची अंत्ययात्रा' हा पहिलाच काव्यसंग्रह आशयाच्या परिपक्वतेमुळे विशेष लक्ष वेधून घेतो. गझल, मुक्तछंद, गीत आणि अभंग या विविध काव्यप्रकारांतून व्यक्त झालेली त्यांची सामाजिक जाणीव, भाषेवरील पकड आणि संवेदनशील अभिव्यक्ती हा संग्रह केवळ वाचनीय न राहता चिंतनाला प्रवृत्त करणारा साहित्यदस्तऐवज ठरवते. जयेश मोरे (शिशिर) यांनी केलेले या संग्रहाचे चिकित्सक परीक्षण त्यातील काव्यगुण, प्रतिमासंपन्नता आणि मानवी मूल्यांवरील भाष्य प्रभावीपणे उलगडून दाखवते. – जयेश मोरे (शिशिर) बदलापूर, जिल्हा- ठाणे
अस्वस्थ वर्तमानाचा खरा चेहरा – ‘माणुसकीची अंत्ययात्रा’
कविता ही केवळ शब्दांची रचना नसते; ती काळाचे स्पंदन टिपणारी, समाजाच्या जखमांवर बोट ठेवणारी आणि माणुसकीचा शोध घेणारी अभिव्यक्ती असते. प्रदीप बडदे यांचा ‘माणुसकीची अंत्ययात्रा’ हा पहिलाच काव्यसंग्रह वाचताना याच अनुभवाची प्रचिती वारंवार येते. या संग्रहात कवीने वर्तमानातील सामाजिक विसंगती, माणसाच्या संवेदनांचा होत असलेला ऱ्हास, नातेसंबंधांतील ताणतणाव, गावपण हरवत चाललेली जीवनशैली आणि आशेची धूसर पण जिवंत ज्योत यांचे अत्यंत प्रामाणिक चित्रण केले आहे. प्रत्यक्ष आयुष्यात जाणिवांच्या अनुभवातून भेटणारा प्रदीप बडदे आणि त्यांच्या कवितांमधून भेटणारा एक सालस कवी यांच्यातील साम्य म्हणजे संवेदनशीलता; मात्र कवितेत ती अधिक प्रगल्भ, अधिक व्यापक आणि सामाजिक भान जपणारी समृद्ध व्यक्तीरेखा दिसते. हा संग्रह वैयक्तिक भावविश्वापुरता मर्यादित राहत नाही; तो समाजातील बदलत्या वास्तवाचा दस्तऐवज बनतो.
(पृष्ठ क्र. २४)
‘मंद होते सांज तेंव्हा’ या गझलेतील—
“नास्तिकांना आस्तिकांचा भार वाटू लागला
संपल्या आशा निराशा अस्मिता जळल्यावरी…
“हरवली माणुसकी तर बंधने लादू नको
द्वेष होवो दूर सारा प्राक्तने मळल्यावरी…”
या ओळी आजच्या समाजमनातील तुटलेपणावर नेमके भाष्य करतात. द्वेष, संशय आणि विभाजनाच्या वातावरणात माणुसकीची पुनर्स्थापना करण्याची कवीची आर्त हाक येथे स्पष्ट ऐकू येते. उपदेशात्मक न वाटता विचार प्रवृत्त करणारी ही अभिव्यक्ती विशेष लक्षात राहते.
(पृष्ठ क्र. २५)
‘क्षितीजाचा उंबरठा’ या कवितेत क्षितिजासारख्या अमर्याद वाटणाऱ्या संकल्पनेलाही वास्तवाची मर्यादा असते, हा आशय प्रभावी प्रतिमांमधून व्यक्त होतो. प्रतीकात्मकतेचा वापर ही या कवितेची जमेची बाजू आहे.
“क्षितिजाचा उंबरठा जेव्हा
नभांगणी मी घेवून फिरतो
चंचल मंजुळ पहाटवारा
हिरव्या रानी मनात भरतो..”
(पृष्ठ क्र. २८)
‘क्षण एक संयमाचा’ या रचनेतील—
“संसार तो म्हणावा साभार जीवनाचा
भात्यात ठेवलेला क्षण एक संयमाचा..”
ही ओळ विशेष उठून दिसते. एका ओळीत जीवनतत्त्व सांगण्याची ताकद कवीच्या भाषिक नेमकेपणाची साक्ष देते.
(पृष्ठ क्र. ५९)
‘नातीगोती’ या कवितेतील—
“या जगण्याचे अशा सुखाचे काय करावे?
कधी कधी तर दुःखाचेही पाय धरावे.”
या ओळी संपूर्ण संग्रहातील सर्वाधिक प्रभावी वाटतात. सुख-दुःख या परस्परविरोधी वाटणाऱ्या अनुभवांचे तात्त्विक आणि जीवनाभिमुख आकलन येथे दिसते. दुःखालाही स्विकारण्याची तयारीच माणसाला अधिक समृद्ध बनवते, हा आशय अत्यंत सहजपणे व्यक्त झाला आहे.
(पृष्ठ क्र. ६५)
‘सही’
“हिरव्या कागदावर
ओल्या ढळढळीत जखमांनी
लिहिलं जातंय मातीचं हिरवेपण;
हल्ली माती मुळापासून ओली आर्द्रता धरत नाही
गावंपण हरवून जातंय.. शहरांच्या व्याख्या बदलतायत..
दिवस ढळत जातात अन् रात्री पिळून निघतात;”
ही मुक्तछंदातील कविता लालफितीच्या प्रशासकीय संस्कृतीवर केलेले प्रभावी भाष्य आहे. नोकरशाहीतील औपचारिकता, संवेदनाहीनता आणि सामान्य माणसाच्या असहायतेचे चित्रण कवीने कोणताही आक्रस्ताळेपणा न करता अत्यंत संयतपणे केले आहे.
(पृष्ठ क्र. ६९)
‘शापितांचा गाव’ या अभंगात आधुनिकतेच्या प्रवाहात हरवलेल्या गावपणाची वेदना मांडलेली दिसते. बदलत्या सामाजिक वास्तवात परंपरा, आपुलकी आणि माणुसकीची होत चाललेली घसरण यातून अधोरेखित होते. तर ‘शुक्रतारा’ या कवितेतील “मोगऱ्याला काळजीने बहर येतो” ही प्रतिमा कवीच्या कल्पनाशक्तीचे आणि काव्यभाषेवरील प्रभुत्वाचे द्योतक आहे.
(पृष्ठ क्र. ९२)
‘चंद्र माधवीचा’ ही कविता वाचताना ग्रेस यांच्या काव्यशैलीची आठवण येते. गूढता, प्रतिमासंपन्नता आणि सूचक अभिव्यक्ती यांचा सुंदर मिलाफ येथे दिसतो. ‘निशेचे दान’ ही कविताही त्याच संवेदनशील भावविश्वाची विस्तारलेली अनुभूती देते.
संपूर्ण संग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे आशयातील वैविध्य आणि अभिव्यक्तीतील प्रामाणिकपणा. गझल, मुक्तछंद आणि गीत अशा विविध काव्यप्रकारांतून कवीने स्वतःची स्वतंत्र अभिव्यक्ती घडवली आहे. कुठे सामाजिक वास्तवाचा कठोर स्पर्श आहे, तर कुठे निसर्ग, प्रेम, नाती आणि मानवी मूल्यांची कोमल जाणीव आहे. त्यामुळे हा संग्रह केवळ वाचनीय राहत नाही, तर विचार करायला भाग पाडणारा ठरतो.
पहिलाच काव्यसंग्रह असूनही कवी प्रदीप बडदे यांनी परिपक्व आशय, संवेदनशील अभिव्यक्ती आणि भाषेवरील पकड यांमुळे स्वतःची स्वतंत्र काव्यओळख निर्माण केली आहे. ‘माणुसकीची अंत्ययात्रा’ हे शीर्षक जरी अस्वस्थ करणारे असले, तरी संग्रहातील कविता माणुसकीचा अंत नव्हे, तर तिच्या पुनर्जन्माची आशा जागवतात. हीच या संग्रहाची खरी ताकद आहे. कवीच्या प्रतिभेची साक्ष देणारी ही कविता अधिक चिकित्सक ठरतेय. ती केवळ काव्यसंग्रहाच्या आशय, प्रतिमा, भाषाशैली, प्रतिकात्मकता आणि सामाजिक जाण यांचे योग्य मूल्यांकन करते. प्रदीप बडदे यांचे मनःपूर्वक अभिनंदन. त्यांच्या लेखणीतून भविष्यातही अशाच आशयसमृद्ध, चिंतनशील आणि वाचकांच्या मनाला भिडणाऱ्या साहित्यकृती जन्माला येत राहोत, हीच सदिच्छा.
काव्यसंग्रह : माणुसकीची अंत्ययात्रा
कवी : प्रदीप बडदे, नवी मुंबई
प्रकाशक ः ललित पब्लिकेशन
पाठराखण : ऐश्वर्य पाटेकर
मुखपृष्ठ/ रेखाटन : सरदार जाधव
पृष्ठे : १०२ (जॅकेटफोल्ड) किंमत ः 200 रुपये
मो. : ९५९४०२७९९५ – (घरपोच उपलब्ध)
अगा आवघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असे ठेविलें ।तें पावोनि सुख संचलें ।…
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) पूर्व परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला असला,…
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने राजकीय वादाला तात्पुरता विराम मिळाला असेल;…
ही ओवी भक्ती आणि अद्वैत यांचा सुंदर संगम घडवते. काही जण म्हणतात भक्तीमध्ये द्वैत आहे…
घर, प्लॉट किंवा शेतीची जमीन खरेदी-विक्री करताना बहुतांश लोक केवळ बाजारभाव किंवा सरकारी रेडी रेकनरवर…
नीट प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणानंतर देशभर उभे राहिलेले आंदोलन अखेर सरकारने प्रमुख मागण्या मान्य केल्यानंतर संपले.…