सत्ता संघर्ष

हुकूमाचा एक्का नि भाऊचा धक्का…ऑपरेशन टायगरने उबाठाची झोप उडवली Ekanath Shinde Operation Tiger

सहा खासदारांच्या पक्षांतराचा धक्का अजूनही सावरता न आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांच्या निर्गमनाने आणखी मोठा हादरा बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'ने केवळ संख्याबळ वाढवले नाही, तर महाविकास आघाडीतील सर्वात मोठ्या राजकीय अस्वस्थतेचे केंद्रही मातोश्रीकडे वळवले आहे. खासदारांपासून आमदारांपर्यंत सुरू असलेली ही गळती थांबणार की आणखी वेग घेणार, हा आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा प्रश्न ठरत आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

उबाठा सेनेच्या लोकसभेतील सहा खासदारांनी मातोश्रीला जय महाराष्ट्र केला आणि थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहा खासदारांच्या पक्षांतराने कमालीचे अस्वस्थ झाले. फुटीर खासदारांच्या हिंगोली, परभणी, धाराशिव, शिर्डी, इशान्य मुंबई मतदारसंघात जाऊन त्यांनी सभा घेतल्या. फुटीरांची बेईमान व गद्दार म्हणून संभावना केली. त्याच वेळी मुंबईत सुरू झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उबाठा सेनेचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि त्यांनाही एकनाथ शिंदेंनी लाल गालिचा अंथरला. एवढेच नव्हे तर चोवीस तासात शिंदे यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी त्यांची उमेदवारी जाहीर केली आणि दुसऱ्याच दिवशी मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या उपसभापतीपदावर सचिन अहिर यांची बिनविरोध निवड झाली. जे जे होत आहे, ते बघत राहायचे एवढेच उबाठा सेनेच्या हाती उरले आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या आमदार – खासदारांना अडवता येत नाही आणि त्यांच्या विरोधात आदळ आपट करून काही साध्यही होत नाही.

सध्या उबाठा सेनेला साडेसातीने ग्रासले आहे. पक्षातील एकेक बिनिचे शिलेदार मतदारसंघाच्या विकासाचे कारण सांगून महायुतीत सामील होत आहेत. जे भाजपाला अपेक्षित आहे, तेच ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिंदे करीत आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना २०२२ मधे शिंदेंच्या नेतृत्वाखाली ठाकरे यांच्या पक्षातून दिवसाढवळ्या ४० आमदार बाहेर पडले. दहा अपक्षांसह पन्नास आमदारांनी बरोबर घेऊन शिंदेंनी ठाकरेंच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवला. तेव्हा सुरत, गुवाहटी, गोवा असा भन्नाट प्रवास झाला होता.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि भाजपाची सर्व ताकद शिंदेंच्या पाठिशी भक्कमपणे उभी होती. त्यावेळी पक्ष फोडला म्हणून शहा- फडणवीस व भाजपाकडे बोट दाखवले गेले. २०२६ मधे सहा खासदार फुटले व आमदार सचिन अहिर बाहेर पडले तेव्हा नायक व खलनायक हे दोन्हीही एकनाथ शिंदेच ठरले. सर्व रणनिती शिंदे यांची होती. ठाकरे सेनेतून बाहेर पडलेले खासदार किंवा सचिन अहिर हे कोणी भाजपामधे गेले नाहीत तर भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेत गेले. ठाकरे यांचा पक्ष फुटल्याने भाजपाला आनंद होणे स्वाभाविक आहेच पण शिवसेनचे संख्याबळ वाढले म्हणून शिंदेंचेही एनडीएमधे महत्व वाढत चालले आहे.

एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक जीवनात भाई म्हणून ओळखतात. आता त्यांच्या जोडीला भाऊ म्हणून ओळखले जाणारे सचिन अहिर पक्षात आले आहेत. भाई व भाऊ दोघांच्या पाठिशी कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. दोघांनाही मोठा जनाधार आहे. सचिनभाऊ शिंदेंच्या पक्षात आले म्हणून उबाठाला वरळीत त्रास होऊ शकतो. सचिन अहिर हे केवळ आमदार नाहीत. ते आदित्य ठाकरे यांच्या विश्वासातील होते. वरळी- शिवडी भागात सचिनभाऊंचा प्रभाव आहे. कामगार क्षेत्रात त्यांचे काम आहे. माजी आमदार व गुन्हेगारी क्षेत्रातील एकेकाळचे नामचिन अरूण गवळी यांचे ते भाचे आहेत. खासदारांच्या फुटीनंतर विधानसभेतील उबाठा सेनेचे आमदार फुटणार अशी चर्चा होती पण विधान परिषदेतील सचिन अहिर हे उडी मारतील, याची कोणाला कल्पना नव्हती. सचिन अहिर हे अगोदर शरद पवारांच्या अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसमधे होते. मुंबईचे अध्यक्ष होते. तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. राज्यमंत्रीही होते. गिरणी कामगारांच्या रा्ष्ट्रीय मिल मजदूर संघाचे ते प्रमुख होते.

वरळी मतदारसंघाचे आमदार म्हणून आदित्य ठाकरे हे विधानसभेत प्रतिनिधीत्व करतात. उद्धव ठाकरे यांच्या महाआघाडी सरकारमधे आदित्य क’बिनेटमंत्री होते. वरळी हा मतदारसंघ शिवसेनेचे दत्ताजी नलावडे व सुनिल शिंदे यांनी जोपासला. सुनिल शिंदे दोन वेळा तेथून आमदार झाले. ते वरळीत शिवसेनेचे १८ वर्षे शाखाप्रमुख होते. ५ वर्षे नगरसेवक होते. सचिन अहिर यांचा पराभव करून विधानसभेवर आमदार झाले. सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत आले. आदित्य यांना सुरक्षित मतदारसंघ मिळावा म्हणून पक्षाने सुनिल शिंदे व सचिन अहिर या दोघांनाही विधान परिषेदवर आमदार म्हणून पाठवले. वरळी या एकाच मतदारसंघात एकाच वेळी आदित्य ठाकरे, सचिन अहिर व सुनिल शिंदे असे तीन आमदार आहेत. आदित्य ठाकरे २०१९ व २०२४ असे दोन वेळा वरळीतून निवडूनआले. सचिन अहिर यांचे ऑपरेशन टायगर एकनाथ शिंदे यांनी पार पाडले. पण त्यांनी जेव्हा उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा शिंदे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

ईशान्य मुंबईतून निवडून आलेले खासदार संजय दिना पाटील हे सचिव अहिर यांचे निकटचे मित्र. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसमधून ठाकरेंच्या शिवसेनेत आले. संजय पाटील हे खासदार झाले तर सचिन हे आमदार झाले. सहा खासदारांच्यासोबत संजय दिना पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत गेले. त्या पाठोपाठ सचिन अहिर शिवसेनेत दाखल झाले. त्यांना ठाकरेंकडून शिंदेंकडे आणण्यात संजय दिना पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली.

सचिन अहिर ठाकरे सेना सोडून गेले, त्याचा फटका आदित्य ठाकरेंना आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो. कालपर्यंत आमच्या पाया पडणारे आज दुसऱ्याच्या मांडीला मांडी लावून बसलेत, अशी कडवट प्रतिक्रिया आदित्य यांनी दिली.

खासदार संजय राऊत यांनी सचिनभाऊंना पक्षाने काय काय दिले याचा पाढाच वाचला. संताप व्यक्त करताना ते म्हणाले, ठाकरे कुटुंबाने व शिवसैनिकांनी त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले. त्यांनाच अंधारात ठेऊन ते झोपेत असताना त्यांच्या डोक्यात दगड टाकून हा माणूस निघून गेला… जो माणूस त्यांचे राजकीय गुरू शरद पवार यांचा होऊ शकला नाही, तो आमचा कसा होणार ?

सचिन अहिर २०१९ मधे ठाकरे सेनेत आल्यानंतर पक्षाने त्यांना २०२० मधे उपनेतेपद दिेले. २०२२ मधे विधान परिषदेवर आमदार केले. भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस दिले. बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्षपद दिले. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी दिली. आदित्य ठाकरे तर त्यांना नियमित भेटत होते, मग असे काय झाले की त्यांनी अचानक एकनाथ शिंदेंच्या तंबूत प्रवेश केला ? त्याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. ते म्हणतात – प्रत्येक जण आपले भविष्य पाहतो.

पक्षाचे नेतृत्व आत्मविश्वास देणे बंद करते, तेव्हा लोक जिथे भविष्य सुरक्षित आहे तिथे जातात. आम्ही अडिच वर्षे विरोधात असताना आम्हाला एक रूपया सुध्दा निधी मिळाला नाही, पण आमचा एकही आमदार फुटला नाही.

माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, ऑपरेशन टायगर नव्हे तर ऑपरेशन देवेंद्र आहे, असे कोणी म्हटले तरी एकनाथ शिंदेंचे महत्व कमी होणार नाही. जो नेता ५० आमदार बरोबर घेऊन बाहेर पडतो, त्याची ताकद काय असेल हे उद्धव ठाकरेंना कळले नाही का ? सत्तेसाठी काही पण ही त्यांचीच शिकवणूक आहे…

सचिन अहिर यांनी मात्र वरळी मतदारसंघ ही कोणाची इस्टेट नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपण पक्ष सोडलेला नाही. मी शिवसेना पक्षाचा आमदार म्हणून निवडून आले. मी धनुष्य बाण हे अधिकृत चिन्ह असलेल्या पक्षातूनच मी उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकनाथ शिंदे जी जबाबदारी देतील ती मी ताकदीने पार पाडीन…

एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना राजकारणातले मास्टर ब्लास्टर असे संबोधले आहे. सचिन यांच्यापाठोपाठ लवकरच क्रिकेटची टीम शिवसेनेत येईल असे भाकीत आमदार बच्चू कडू यांनी वर्तवले आहे. ऑपरेशन टायगर चालूच आहे…

टीम इये मराठीचिये नगरी

Share
Published by
टीम इये मराठीचिये नगरी
Tags: Ajit PawarAssembly ElectionsBJPBreaking Newscurrent affairsDeputy ChairmanDevendra FadnaviseditorialEknath ShindeElection StrategygovernanceIndia politicsIndian politicsIye Marathichiye NagariLeadership CrisisLegislative CouncilMaharashtra AssemblyMaharashtra GovernmentMaharashtra legislatureMaharashtra NewsMaharashtra politicsMaharashtra UpdatesMahayutiMarathi editorialMarathi politicsMLAsMPsMumbai NewsMumbai PoliticsNCPnews analysisOperation TigerOperation Tiger Maharashtraparty defectionparty switchingPolitical Analysispolitical commentarypolitical crisispolitical debatepolitical developmentspolitical newspolitical strategyPoliticsSachin AhirSanjay Dina PatilShiv SenaShiv Sena Splitstate politicsUBT SenaUddhav ThackerayWorliआजच्या बातम्याआदित्य ठाकरेआमदारइये मराठीचिये नगरीउद्धव ठाकरेउद्धव सेनाउपसभापतीएकनाथ शिंदेऑपरेशन टायगरऑपरेशन टायगर महाराष्ट्रखासदारजनाधारठाकरे सेनादेवेंद्र फडणवीसनिवडणूकनिवडणूक रणनीतीनेतृत्व संकटपक्षफोडपक्षांतरबच्चू कडूभाजपमराठी लेखमहायुतीमहाराष्ट्र न्यूजमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्र राजकारणमहाराष्ट्र विधानसभामुंबईमुंबई राजकारणराजकीय घडामोडीराजकीय टिप्पणीराजकीय डावपेचराजकीय लेखराजकीय विश्लेषणराजकीय संघर्षराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभावरळीविधान परिषदविधानभवनविश्लेषणशिंदे सेनाशिवडीशिवसेनासचिन अहिरसंजय दिना पाटीलसंजय राऊतसत्तासंपादकीयसरकार

Recent Posts

प्रेमाने केलेले प्रत्येक कर्तव्य हीच खरी पूजा True Worship

मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक…

2 hours ago

तुळजापूर येथील जागर साहित्य पुरस्कारासाठी साहित्यकृती पाठविण्याचे आवाहन Call for Jagar Literary Award In Tuljapur

तुळजापूर : मराठवाडा साहित्य परिषद, शाखा तुळजापूर यांच्या वतीने 'जागर साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आला…

1 day ago

तेंगबोचेची खडतर अन् रम्य वाट.. The difficult and beautiful path to Tengboche

स्वप्नापलिकडची एव्हरेस्ट वारी भाग - ६ एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या प्रवासातील तेंगबोचेकडे जाणारा टप्पा म्हणजे हिमालयाच्या…

1 day ago

ओअँसिसचा हिरवा श्वास अन् सहाराच्या वादळाचा काळा कहर The green breath of the oasis

सहारा म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते अंतहीन वाळूचं साम्राज्य. पण याच वाळवंटाच्या मध्यभागी हिरवाईने…

2 days ago

क्षणाचाही विलंब नको : ज्ञानेश्वरीतील संन्यासयुक्तीचा सहज, सोपा आणि जीवनाला दिशा देणारा संदेश A message that gives direction to life

"योग्य वेळ" येण्याची वाट पाहत आयुष्य पुढे ढकलणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी जागृतीचा…

2 days ago

माझं भारतीयत्व : तिरंग्याचे रंग My Indiannessः Urmila Chakurkar

तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे…

4 days ago