May 5, 2026
Illustration of grandparents caring for grandchildren while parents balance work and family responsibilities showing collective family support
Home » प्रेमासाठी स्वातंत्र्याची छाटणी : ‘माझं’ आणि ‘आपलं’ यामधला मानवी संघर्ष
मुक्त संवाद

प्रेमासाठी स्वातंत्र्याची छाटणी : ‘माझं’ आणि ‘आपलं’ यामधला मानवी संघर्ष

प्रेम, समष्टी आणि व्यक्तीस्वातंत्र्याची छाटणी….
आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात व्यक्तीस्वातंत्र्य आणि समूहासाठीची बांधिलकी यांच्यातील संघर्ष अधिक ठळकपणे समोर येतो आहे. स्वतःचे आयुष्य, वेळ आणि स्वप्ने जपण्याचा हक्क प्रत्येक व्यक्तीला असतो; पण त्याच वेळी कुटुंब, नातेसंबंध आणि समाज या नात्यांची जबाबदारीही आपल्यावर असते. प्रेम, आपुलकी आणि परस्परावलंबित्व यांमधून अनेकदा व्यक्तीला स्वतःच्या स्वातंत्र्याची थोडी छाटणी करावी लागते—पण याच त्यागातून समाजाचे भावनिक आरोग्य आणि मानवी नात्यांचे सौंदर्य जपले जाते. आधुनिक व्यक्तिवाद आणि भारतीय समष्टीवादी संस्कृती यांच्या दरम्यानचा हा सूक्ष्म समतोलच या लेखात विचारपूर्वक उलगडला जातो. ✨🤝🌿

वसुंधरा काशीकर
मुक्त पत्रकार, निवेदक, लेखक व मुलाखतकार

जॉर्ज क्लुनीचा एक सिनेमा आहे, One fine day! त्यात तो सिंगल पॅरेंट असतो. त्याला एक मैत्रिण भेटते ती पण सिंगल मदर असते. क्लुनीला मुलगी असते आणि त्या मैत्रिणीला मुलगा. दोघेही घटस्फोटीत. समदु:खी. नोकरी करताना, पैसे कमवताना मुलं सांभाळणं दिव्यच. या समान समस्यांचा सामना करण्यामुळे दोघांचीही मैत्री होते. सिनेमात प्रसंग असा आहे की, क्लुनीच्या मैत्रिणीला अचानक एक मीटिंग येते. मग स्वाभाविकच आता शाळा सुटल्यावर मुलाला कुठे ठेवायचं प्रश्न..ती तीच्या आईला फोन करते. आईला म्हणते, आई मला अचानक काम आलंय..तू मुलाला घरी ठेवू शकशील का…आता इथे आपली भारतीय आजी असती तर म्हटलं असतं, “अगं त्यात काय एवढं मी येते तिकडे”….पण ती असते आंग्ल आजी. ती म्हणते, ‘अगं असं काय करतेस..मी सलुनमध्ये आहे..माझा हेअर कट आणि फेशियलची अपॉइंटमेंट आहे..मला नाही जमणार इतक्या वेळेवर…’

याच्या विरुद्ध दुसरा प्रसंग सांगते. माझ्या एका शिक्षकांचा मला एकदा फोन आला. ‘वसुंधरा, मी आणि बायको आता पुढचे सहा महिने पुण्यात असणार आहोत.’ सर मुळचे अमरावतीचे त्यामुळे मी स्वाभाविकपणे विचारलं, ‘अरे सर ! कसं काय पुणे…आणि ते ही सहा महिने…’सर म्हणाले, ‘अगं नातू पुण्यात इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला आहे. त्याची इथे पुण्यात आल्यावर तब्येत बिघडली, शिवाय होम सिकनेस. मग तो म्हणाला आजी-आजोबा तुम्ही माझ्यासाठी सहा महिने पुण्यात येता का…मला बरं वाटेल. तर अनायसे मुलाचा फ्लॅट होताच. मग आम्ही यायला निघालो. म्हटलं राहू तिघं जणं त्या फ्लॅटमध्ये तो इथे रुळेपर्यंत. शिवाय त्याला घरचं जेवण मिळेल. एकदा तो ६-८ महिन्यात रुळला की मग जाऊ आम्ही परत.”

मी विचारलं..”सर तुम्हाला करमेल का हो इथे पुण्यात..इथे तुमचं काहीच नाही..”सरांचं उत्तर..”हे बघ वसू..तुमचं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या भल्यासाठी तुम्हाला तुमच्या व्यक्तीगत स्वातंत्र्याची छाटणी करावी लागते…You have to curtail your personal liberty for your near and dear ones.”

हे वाक्य मला फार अंतर्मुख करुन गेलं…या वाक्याने मी विचार प्रवृत्त झाले.

माझी आई-मावशी कित्येकदा माझ्या मुलीला सांभाळायला अमरावतीहून पुण्याला आली आहे. शेतकरी संघटनेचे दिवंगत नेते शरद जोशींनी आठवण सांगितली होती, त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या बाळंतपणाच्यावेळी अमेरिकेत जायचं होतं. जोशींच्या पत्नी तर कधीच वारल्या होत्या. मग त्यांनी आपल्या वहिनींना म्हणजे मोठ्या भावाच्या पत्नीला विनंती केली त्या मग पुतणीच्या बाळंतपणासाठी अमेरिकेत गेल्या.

आता याच्या उलट दुसरा विचार असाही मांडला जाऊ शकतो किंवा मी मांडतांना बघितला आहे की, आम्ही आयुष्यभर काम केलं, खस्ता खाल्या आणि मुलांना मोठं केलं..आता उरलेलं आयुष्य काय नातवंडं सांभाळण्यात घालवायचं का..मुलांनी मुलांचं बघावं..बाई ठेवावी किंवा पाळणाघरात ठेवावं मुलांना…

व्यक्ती की समष्टी हा निरंतर चालणारा संघर्ष आहे. वाद आहे. समुहासाठी व्यक्तीचा बळी दयावा का..इथपासून ते मग अल्पसंख्यकांचे हक्क इथपर्यंत…ते Over himself, over his own body and mind individual is sovereign..पर्यंत..

मला यातून सुवर्णमध्य साधणं महत्वाचं वाटतं…प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपण समाजाकडून असंख्य गोष्टींसाठी मदत घेत असतो…हा interdependence किंवा परस्परावलंबित्व मला फार देखणं वाटतं. आजी-आजोबांनी नातवंडांना सांभाळावं, लक्ष दयावं…आजी-आजोबाच काय शेजारी- मित्र मैत्रिणीसुद्धा उपयोगी पडू शकतात..

माझ्या एका प्रोजेक्ट निमित्तानं मी ८ दिवस बाहेरगावी गेले होते. मुलीला ताप आला तर मैत्रिणीकडे मुलगी गेली. मैत्रिण रात्रभर जागली..दुसऱ्या दिवशी दवाखान्यात नेलं, औषधं आणले..व्यक्तीवाद असता तर मैत्रिण म्हटली असती माझा काय संबंध…तुझा प्रोजेक्ट, तुझी मुलगी तू बघ…काही व्यवस्था कर…

पण हा समष्टीवाद मला भारताचं, भारतीय संस्कृतीचं सौंदर्य वाटतं. कुटुंबातून मिळणारा मानसिक आधार, प्रेम हे व्यक्तीचं पर्यायानं समाजाचं मानसिक-भावनिक स्वास्थ्य टिकवून ठेवतं. या समष्टीची व्याप्ती वाढते तेव्हा मग शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, सावरकर, कर्मवीर भाऊराव पाटील, धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळक, भगतसिंग, चाफेकर बंधू, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला सारखे शतकातून जन्माला येणारे लोक आपल्याला दिसतात…

राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी ६ वर्ष मंडालेच्या तुरूंगात राहणारे टिळक असो वा १३ वर्ष अंदमानात राहणारे सावरकर…व्यापक हितासाठी त्यांनी व्यक्तीगत सुखाची तिलांजली दिली…दक्षिण आफ्रिकेचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला २७ वर्ष तुरूंगात होते. दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्य लढयासाठी त्यांना हा तुरुंगवास झाला होता. ते जेव्हा तुरूंगात गेले तेव्हा त्यांची मुलगी काही महिन्यांची होती आणि तुरूंगातून बाहेर आले तेव्हा त्यांना नात झाली होती. आता एखादा सर्वसामान्य माणूस असता तर म्हटलं असतं माझा संसार बरा, बायको-मुलगी बरी..काय करायचं आहे स्वातंत्र्य मिळो न मिळो…चुलीत घाला ते स्वातंत्र्य…परत व्यापक मानव हित आणि मूल्यांसाठी व्यक्तीगत सुखाला तिलांजली…

ही व्यापकता अंतिमत: भारतीय संस्कृतीतल्या जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत पर्यंत जाऊन पोहोचू शकते…आद्य शंकराचार्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर

न मे मृत्यू शंका न मे जाती भेदः,
पिता नैव मे नैव माता न जन्मः
न बंधूर्न मित्रं, गुरूर्नैव शिष्यं,
चिदानंद रुपः शिवोऽहम् शिवोऽहम्

किंवा वसुधैव कुटुंबकम् पर्यंत ही भावना पोहोचू शकते…

आपण कुटुंब आणि अवतीभवतीचे लोक इथपर्यंत जरी आपल्या समष्टीचा परीघ वाढवू शकलो तरीही खूप आहे….

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

ब्युटी ऑफ लाईफ सकारात्मक ऊर्जेचा स्त्रोत

नाच रे मोरा आंब्याच्या वनात..!

औटघटकेची युगांतरंमध्ये अस्तित्वशोधाची नित्य नवी रूपे

2 comments

bokep indo March 20, 2026 at 10:04 AM

So simple, yet so impactful. Well written!

Reply
bokep gratis March 20, 2026 at 12:03 PM

You made some excellent points here. Well done!

Reply

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!