रब्बी पिकाच्या पेरणीनंतर आता आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. रब्बी मका अन् ज्वारीसाठीचा पीक सल्ला…
रब्बी मका
आंतरमशागत व तण नियंत्रण
👉🏽पीक उगवत असताना पक्षी कोवळे कोंब उचलतात. परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पेरणीनंतर सुरुवातीच्या दहा ते बारा दिवसांपर्यंत पिकाची पक्ष्यांपासून राखण करणे महत्वाचे आहे. तसेच पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात. म्हणून अशावेळी देखील पक्षी राखण गरजेची असते.
👉🏽मका उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनी एका चौफुल्यावर एकच जोमदार रोप ठेवून विरळणी करावी. गरज भासल्यास उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात.
👉🏽मक्याची रोपावस्था ज्यादा पाणी किंवा दलदलीच्या स्थितीस अत्यंत संवेदनशील आहे. म्हणून पेरणीनंतरच्या सुरुवातीच्या वीस दिवसांपर्यंतच्या काळात पिकात पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
👉🏽तणांच्या प्रादुर्भावानुसार पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात एक ते दोन खुरपण्या करून ताटांना आधारासाठी माती चढवावी. गरजेनुसार एक ते दोन कोळपण्या कराव्यात.
👉🏽वाढती मजुरी किंवा अन्य कारणाने कोळपणी करणे शक्य नसल्यास, पेरणीनंतर परंतु पीक उगवणीपूर्वी चांगल्या वाफशावर अट्रॅझीन (५० डब्ल्यूपी) १.५ ते ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर सम प्रमाणात फवारावे.
अन्यथा पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी हॅलोसल्फुरॉन मिथाईल (७५ डब्ल्यूपी) ०.२४ ग्रॅम किंवा पीक ३० ते ४० दिवसांचे असताना टेम्बोट्रायॉन (३४.४ एससी) ०.६ मि.लि. किंवा टोप्रामेझॉन (३३.६ एससी) ०.१५ मि.लि. प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
तणनाशक फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोझल वापरावे.
तणनाशकांचा वापर करण्यापूर्वी पीक पद्धती, तणांचा तसेच जमिनीचा प्रकार व हवामानानुसार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
रब्बी ज्वारी
पेरणीनंतरचे ओलावा व्यवस्थापन
👉🏽कोरडवाहू रब्बी ज्वारीस संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास पीक गर्भावस्थेत असताना पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांनी किंवा पीक पोटरीत असताना पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी पाणी द्यावे. दोन पाणी देणे शक्य असल्यास वरील दोन्ही नाजूक अवस्थेत ज्वारीला पाणी द्यावे.
👉🏽बागायती रब्बी ज्वारीस मध्यम जमिनीत पाणी देण्याच्या अवस्था
पीक गर्भावस्थेत असताना (पेरणीनंतर २८ ते ३०दिवसांनी),
पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी),
पीक फुलोऱ्यात असताना ( पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी),
कणसांत दाणे भरताना पेरणीनंतर ( ९० ते ९५ दिवसांनी)
मात्र, भारी जमिनीत बागायती ज्वारीस चौथ्या पाण्याची गरज भासत नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
