ग्राम साहित्य पुरस्कारासाठी लक्ष्मण खोब्रागडे, प्रिती जगझाप , भारती तितरे, संजिव बोरकर यांची निवड
चंद्रपूर – राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती द्वारा देण्यात येणाऱ्या रा. ज. बोढेकर स्मृति ग्रामसाहित्य लेखन पुरस्कारासाठी कवी लक्ष्मण खोब्रागडे ( मुल ), कवयित्री प्रीती जगझाप (बल्लारपूर), कवी संजीव बोरकर ( गडचिरोली ), कवयित्री भारती तितरे ( चामोर्शी ) या चार व्यक्तींची निवड करण्यात आलेली आहे. चारही व्यक्तिंनी आजवर विविध ग्राम साहित्य संबंधित लेखन केले आहे. तसेच झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यात सहभाग आणि काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे.
नुकत्याच झालेल्या परिषदेच्या वार्षिक सभेत हा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील दरवर्षी नवोदित लेखक-कवींना सदर पुरस्कार देण्यात येत असतो. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह, सन्मानपत्र, मानवस्त्र आणि ग्रामगीता आहे. या पुरस्काराचे वितरण शाहु महाराज जयंती दिनी येत्या २६ जून रोजी सायंकाळी ४ वाजता चंद्रपूर येथे श्रमिक पत्रकार संघाच्या भवनात प्रदान करण्यात येणार आहे . तसेच या ठिकाणी ज्येष्ठ लेखक यवनाश्व गेडकर यांच्या स्मृती सुगंधाची गुंफण या कथासंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेल्या कवींचे राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सरचिटणीस अँड. राजेंद्र जेनेकर, विलास उगे, देवराव कोंडेकर, संजय वैद्य, प्राचार्य भाऊ पत्रे, नामदेव गेडकर, नारायण सहारे, डॉ. बानासुरे , यवनाश्व गेडकर आदींनी अभिनंदन केले आहे.
कवी लक्ष्मण खोब्रागडे यांनी आजवर विविध ग्राम साहित्य संबंधित लेखन केले आहे. तसेच झाडीबोली साहित्य मंडळाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवत जुनासुर्ला येथे २९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केले. त्यांचा झाडीबोलीत मोरगाड आणि लिपन हे ग्रामीण जीवनाचे वास्तव दर्शवणारे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. यश खेचून आणू दारी हा ललीतलेखसंग्रह प्रकाशित आहे.