April 16, 2024
Bandopant Bodekar Antar Mantar Charoli Book Publication
Home » बोढेकर यांच्या अंतर मंतर चारोळी संग्रहाचे प्रकाशन
काय चाललयं अवतीभवती

बोढेकर यांच्या अंतर मंतर चारोळी संग्रहाचे प्रकाशन

दानापूर (जि. अकोला) येथे आयोजित आठव्या मराठी बोली साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या अंतर- मंतर या चारोळी संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष आचार्य ना. गो. थुटे ( वरोरा), स्वागताध्यक्ष अनिल गावंडे, मराठी बोली साहित्य मंडळाचे संस्थापक डॉ. हरिश्चंद्र बोरकर, संमेलनाचे उद्घाटक राजेंद्र घोरपडे, मालवणी बोलीचे अभ्यासक डॉ. बाळकृष्ण लळीत (नगर), ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले (दानापूर), डॉ. रावसाहेब काळे (अकोला), झाडीपट्टीची बहिणाबाई अंजनाबाई खुणे , डॉ. अजय विखे, दैनिक अजिंक्य भारतचे पुरूषोत्तम आवारे , ज्येष्ठ सप्तखंजेरीवादक भाऊ थुटे आदी उपस्थित होते.

चारोळी संग्रहाबद्दल बोलताना आचार्य थुटे म्हणाले, बोढेकर यांनी चारोळी या काव्यविद्येचा अभ्यास करून त्यांनी स्विकारलेल्या विचारधानेनुसार चांगल्याचा प्रचार व वांगल्यासाठी नकार नोंदविला आहे. यामधून समाजमन सद् भावनेने समृद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. त्यांनी चारोळी या लोकप्रिय माध्यमातून लोकांच्या अंतरात संस्कारात्मक मंत्राची पेरणी केली आहे. ते मानवी जीवनावर विविध अंगांनी अभिव्यक्त झाले आहेत. मानवीय अंतरंगामध्ये अंतर पडू नये यासाठीच त्यांनी आपल्या चारोळ्यातून मंत्रबोध केलेला आहे. प्रत्येकांनी विकारांवर मात करून जग सुंदर करण्याचीच त्यांची अभिलाषा प्रकट झाली आहे. ते पेशाने शिक्षक असल्याने त्यांचे शिक्षकत्व या संग्रहात प्रतिबिंबीत झाले आहे. त्यांचा विशाल जीवनानुभव व त्यांना जाणवलेले वास्तव याची प्रचिती वाचकांना कळून येते असेही थुटे म्हणाले.

अंतर-मंतरमध्ये 192 चारोळ्या आहेत. या काव्यकलेतून कवीने आपल्या अनुभूतीतला अनेकांगी आशय व्यक्त केला आहे. संताचे बोधामृत, सज्जनता, देव-धर्म, अध्यात्म, ग्रामसंस्कृती, राजकारण, सुसंस्कार, वर्तनविकृती, निसर्ग, म्हातारपण, घरसंसार, व्यसने, वैज्ञानिकता, साहित्य भाषा, शिक्षण, ऐतिहासिक पौराणिक व्यक्तींचे दाखले व अन्य गोष्टींनी भरगच्च भरलेला हा चारोळीसंग्रह आहे.

ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे यापुर्वी झाडीकविता संग्रह, लेखसंग्रह, इंग्रजी अनुवादित ग्रंथ, झाडीपट्टी विषयक वैचारिक लेखन प्रसिद्ध आहे. विविध दैनिकात त्यांचे स्तंभलेखन, स्फुट लेखन प्रसिद्ध झाले आहे. जनप्रबोधनाच्या माध्यमातून ते व्यवसाय शिक्षण, ग्रामगीता विचार दर्शन, व्यसनमुक्तीपर कार्य ते करीत असतात.

Related posts

अभिमानाला धक्का न लागता करावं लागेल जोडण्याचं काम – अभय फिरोदिया

शुद्ध अंतःकरणाच्या चौरंगावर गुरुमंत्राचे पुजन

मानो या न मानो…

Leave a Comment