April 20, 2024
the-conflict-between-the-mind-and-the-intellect-article-by-sunetra-joshi
Home » मन अन् बुद्धीचे भांडण..
मुक्त संवाद

मन अन् बुद्धीचे भांडण..

माणसाला माणुस म्हणुनच जाणा त्याला शेंदूर फासुन देव करु नका व नंतर लाथाडू देखिल नका. प्रत्येक चुकीची शिक्षा ही असतेच आणि मिळतेच. आपण नाही केली तरी माना वा न माना वरती एक अज्ञात शक्ती आहे तिचा फटका बसतोच या ना त्या रुपात. फक्त तो फटका ज्याचा त्यालाच कळतो.

सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी.

मन आणि बुद्धी याचे भांडण अगदी पुरातन काळापासून चालु आहेच आणि जगाच्या अंतापर्यंत चालुच राहील. आपण नेहमी अशी वाक्ये वाचतो की अमुक एक गोष्ट बुध्दीच्या कसोटीवर खरी वाटते पण मनाला पटत नाही. किंवा कधी कधी काही गोष्टी मनाला पटतात पण बुध्दीच्या कसोटीवर खऱ्या वाटत नाही.

आपण जसे कि श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक बारीक सीमारेषा आहे ती समजणे फार गरजेचे असते तसेच मन आणि बुद्धी यांचे पण असावे. पण आपण भारतीय एका चमत्कारात दगडाला देव मानतो आणि एखाद्या गोष्टीचा बाऊ करून त्या दगडाला लगेच दोष देतो. दोष दगडाचा नाही आणि देवाचाही. असलाच तर आपल्या विचारसरणीचा आहे.

अधुन मधुन पेपरमधे किंवा टिव्ही चॅनेलवर आपण हमखास अनुभव येईल अमुक खडा वापरा. हमखास बरे वाटेल. अमुक औषध घ्या अशा जाहिराती असतात. त्या जाहिराती चालतात म्हणजे लोकही ते घेऊन बघत असणारच ना. भावनेला हात घालण्याचे कसब ज्या जाहिरातीत असत ते उत्पादन चालतच हे मिडीया चांगलच जाणते.

तसेच डॉक्टरचेही. एखाद्याला एखाद्या डाॅक्टरांचा औषधाने गुण आला की तो दुसर्‍या पेशंटला सांगतो. त्यांच्या हाताला गुण आहे हं. मग काय चुकुन एखाद्या पेशंटचे निदान चुकले तर मग त्याची काही खैर नाही. आता तुम्ही म्हणाल गुण असतो म्हणजे काय? तर त्याचा वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास चांगला असतो आणि निदान बरोबर असते. त्यावर पुस्तकात असलेली औषधे तो देतो. पण प्रत्येकाची तब्येत वेगळी असते. कुणाला ते चटकन लागु पडत तर कुणाला त्याची अ‍ॅलर्जी असु शकते. पण म्हणुन त्याच निदान किंवा औषध चुकले अस आपण म्हणु शकत नाही. आणि तोही तुमच्या आमच्या सारखा माणुसच आहे हे विसरून चालणार नाही. खरे तर कुठल्याही डाॅक्टरला आपला पेशंट दगावलेला आवडत नाही. कारण त्याच्या रेप्युटेशनवर परीणाम होतो ना. पण…

माझ्या माहितीत एक डाॅक्टर होते. आज ते हयात नाहीत पण त्याच्या हाताला खरच गुण होता. अगदी साध पाणी कधीतरी देवाला सांगुन द्यायचे अन् पेशंट बरा व्हायचा. अर्थात जोडीला ते औषध द्यायचेच. तसेच देवाचा अंगारा लावणे चुक नाही पण सोबत औषध देखिल हवेच. कितीतरी सिनेमात पण आपण बघतो पेशंट सिरीयस असतो आणि डाॅक्टर म्हणतात आता आपल्या हातात काही नाही तुम्ही ईश्वराची प्रार्थना करा तोच काही चमत्कार करू शकेल.

तसच कधीतरी मुद्दे मालासकट कुणी सापडतो पण म्हणून तो चोर असेलच असे नाही. कुणी त्याला मुद्दाम सुद्धा अडकवले असु शकतेच. आपणही म्हणतो तो चोरी करू शकतो असे वाटत नाही हो. कारण आपल्या बुद्धीला ते पटल तरी मनाला पटत नसते.

विषय खुप मोठा आणि गहन आहे. मन नावाचा अवयव या शरीरात नाहीच असे असुनही त्या मनाच्या कौलावरच जग चालत. आपण कुठलाही निर्णय घेताना आपल्या मनाचा कौल घेतोच. नाही माझ मन म्हणतय अस नको करु किंवा अस कर.

आपल्या आजुबाजुला अशा अनेक गोष्टी घडत असतात. सकारात्मक विचार पण काय आहे.? हेच की माझ काम होणारच अस जेव्हा आपण मनात आणतो तेव्हा बुद्धी पण ते काम कसे होईल याची उपाययोजना आखते अन ते काम होतच. पण आपण आधीच म्हटले की जमणार नाही तर बुद्धी देखिल त्याच्या उपाययोजनांचा विचार करत नाही व ते काम होण्याचा प्रश्नच उरत नाही. ही गोष्ट प्रत्येक क्षेत्रात लागु होते. एखादा इंजिनिअर जेव्हा एखादा पुल बनवतो काही वर्षांनी तो पडला तर आपण त्या इंजिनिअर ने पैसे खाऊन रद्दी काम केल अस खुश्शाल म्हणुन मोकळे होतो. पण तो पुल पडण्यात त्याचा काय फायदा असतो? उलट वर्षोनुवर्षे चांगला राहीला तर त्याचच नाव चांगले राहणार असते.

आपली मानसिकता अशी झाली तीच आधी बदलायला हवी. अगदी राजकारणी लोकांच उदाहरण घेतले तरी पण सगळ्या योजना चांगल्याच असतात पण राबवणारे आपल्यातलेच अधिकारी असतात. त्यांनी काम नीट केले नाही तर मंत्री किंवा पंतप्रधान तरी काय करणार? आता कुणी म्हणतील पण बघण्याची नैतिक जबाबदारी तर त्यांची आहे ना? पण ते ही शेवटी माणुसच आहेत तुमच्या आमच्या सारखे. कधीतरी चुकणारच. कधीतरी अनावधानाने एखादी गोष्ट नाही लक्षात येणार. मुद्दाम चुकीचे काम करून ते कशाला आपले अधिकारपद पणाला लावतील?

त्यामुळे माणसाला माणुस म्हणुनच जाणा त्याला शेंदूर फासुन देव करु नका व नंतर लाथाडू देखिल नका. प्रत्येक चुकीची शिक्षा ही असतेच आणि मिळतेच. आपण नाही केली तरी माना वा न माना वरती एक अज्ञात शक्ती आहे तिचा फटका बसतोच या ना त्या रुपात. फक्त तो फटका ज्याचा त्यालाच कळतो. ते तुमच्या शरीरात नसलेल्या मनाला जाणवतच एवढे मात्र खरे. त्यामुळे हे मन आणि बुद्धीचे भांडण असेच चालु राहणार.

Related posts

अर्थव्यवस्थेच्याबरोबरच कोट्याधिशांच्या संख्येत लक्षणीय वाढ

गुढीपाडव्यापर्यंत ढगाळ वातावरण

बारामतीमधील देशी गोवंश सुधारणा प्रकल्प हा एक ऐतिहासिक अन् क्रांतिकारी प्रयोग

Leave a Comment