May 3, 2026
IC 814 hijack drama book by arvind gokhale
Home » आय. सी. ८१४ विमान अपहरणाचे नाट्य
गप्पा-टप्पा

आय. सी. ८१४ विमान अपहरणाचे नाट्य

जमिर या हिंदी चित्रपटातला शेवट हा माझ्या कादंबरीच्या शेवटाशी जुळणारा आहे. म्हणूनच शेवट आताच सांगत नाही. तुम्ही पण कोणाला हा शेवट सांगू नका आणि प्रारंभ चुकवू नका. पाकिस्तानच्या अभ्यासामुळेच केवळ मला ही कादंबरी जमली

अरविंद व्यं. गोखले

वास्तविक मला आय. सी. ८१४ या माझ्या कल्पास्तवाची ही ई आवृत्ती निघेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यासाठी मला पहिल्यांदा नेटफ्लिक्सचे आभार मानायला हवेत. आता हेच पाहा ना, आय. सी. ८१४ ही कादंबरी इंडियन एअरलाइन्सच्या विमानाच्या अपहरणाच्या नाट्यावर अक्षरश: दोन-तीन आठवड्यात लिहून मी पूर्ण केली.

२४ डिसेंबर १९९९ रोजी सुरु झालेले हे अपहरणाचे नाट्य ३१ डिसेंबर १९९९ च्या उत्तररात्री म्हणजे २००० च्या पहाटे संपले. आय. सी. ८१४ विमानाचं अपहरण झालं, तेव्हा ‘एन्टेबी’सारखी कारवाई केली जाईल, असं अनेकांना वाटत होतं. गुप्तचरांच्या आघाडीवर तशी तयारी होती, पण माशी कुठे शिंकली ? अमृतसरच्या राजा सांसी विमानतळावर कमांडोजचं पथक पोहोचलं, पण दरम्यान ‘इंडियन एअरलाइन्सच्या विमानानं लाहोरच्या दिशेनं उड्डाण केलं होतं. त्या कारवाईत विघ्न आणणारे कोण होते ? तो खोटा फोन कोणाचा होता ? या आणि अशा बऱ्याच खळबळजनक माहितीवर आधारित काल्पनिक आणि वास्तव यांचा हा सुरेख ‘कल्पास्तव’. यात मांडला आहे. ते जसे घडले तसे या कादंबरीत म्हणजेच या कल्पास्तवात दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे. फक्त शेवट हा समस्त भारतीयांना जसा व्हावा असे मनातून वाटत होते तसा घडवलेला आहे. नेटफ्लिक्सने त्यावर काही भागांची मालिका काढली आणि त्यातल्या भोला, शंकर आदि पात्रांबाबत चर्चा सुरु झाली. ती खरी आहेत की ती अवास्तव आहेत, असे विचारले जाऊ लागले.

चॅनेलवरही त्याची चर्चा रंगली. मी माझ्या कादंबरीची आठवण ठेवून एक कहाणी माझ्या फेसबुक किनाऱ्यावर टाकली. ती वाचून काहीजणांनी माझी मुलाखत त्यांच्या त्यांच्या चॅनेलवर घेतली. त्याबरोबर अनेकांनी ही कादंबरी आपण मागे वाचली, पण आता आठवत नसल्याचे सांगितले. अनेकांना ती पुन्हा वाचाविशी वाटली, माझ्या या कादंबरीची उजळणी कराविशी वाटली, यातच या कादंबरीची तथा या कल्पास्तवाची किमया म्हणायला हवी. त्यातच माझे स्नेही निनाद प्रधान यांनी त्याबद्दलचा आग्रह धरला म्हणूनच केवळ ती पूर्ण करता आली.

जमिर या हिंदी चित्रपटातला शेवट हा माझ्या कादंबरीच्या शेवटाशी जुळणारा आहे. म्हणूनच शेवट आताच सांगत नाही. तुम्ही पण कोणाला हा शेवट सांगू नका आणि प्रारंभ चुकवू नका. पाकिस्तानच्या अभ्यासामुळेच केवळ मला ही कादंबरी जमली आणि अल्पावधीत ती पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केली. तब्बल चोवीस वर्षांपूर्वीची ती कहाणी जशीच्या तशी पुन्हा एकदा वाचकांसमोर वेगळ्या स्वरूपात येत आहे. आपण तिचा आनंद घ्याल ही खात्री आहे.

सध्या नेटफ्लिक्सवर आणि चर्चेत असलेला चित्रपट आय सी ८१४ हा कोणाच्या कथाकल्पनेवर आधारित आहे ते माहिती नाही, पण ही कादंबरी सर्वप्रथम मी लिहिली. घटना घडते तेव्हा या कादंबरीचा म्हणजेच कल्पास्तवाचा नायक म्हणजे एका वृत्तपत्राचा संपादक आहे आणि कादंबरी फुलवण्यासाठी त्या संपादकाचा मुलगा आणि सून हे त्या विमानात आहेत असे वर्णन त्यात आहे. बाकी ज्यांची चर्चा आहे ती पात्रे काझी ऊर्फ बर्गर, इब्राहिम अतहर म्हणजे चीफ, शाहिद अख्तर सईद म्हणजे डॉक्टर, मिस्त्री झहूर इब्राहिम म्हणजे भोला आणि शकीर ऊर्फ गोपाळ वर्मन म्हणजे शंकर ही पात्रे मूळ घटनेनुसारच आहेत. मी स्वत: त्या घटनेच्या वेळी केसरीचा संपादक असल्याने ती घटना अनुभवत होतो. घटना घडली तो दिवस २५ डिसेंबर १९९९ आणि संपली तो दिवस १ जानेवारी २००० आणि कादंबरी प्रकाशित झाली तो दिवस २० एप्रिल २०००. कादंबरीचे मुखपृष्ठ माझे सहकारी सुरेंद्र पाटसकर यांचे तर प्रकाशक आहेत पद्मगंधा प्रकाशन पुणे. माझे मित्र अरूण जाखडे यांच्या प्रयत्नातून ते साकारले.

पुस्तकाचे नाव – आय. सी. ८१४
लेखकअरविंद गोखले
प्रकाशक – मराठीसृष्टी
किंमत – १०० रुपये सवलत किंमत – ७५ रुपये
पुस्तकाच्या खरेदीसाठी करा लिंकवर क्लिक –
https://marathibooks.com/books/ic814-by-arvind-gokhale/

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

अजुन ३ दिवस ढगाळलेलेच

संपूर्ण महाराष्ट्रात वीजासह जोरदार पावसाची शक्यता

अवयवदानातून २०२२ मध्ये १५ हजाराहून अधिक जणांचे पुण्यकर्म

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!