मी तर म्हणतो परीक्षेसाठी फक्त मुलांना पाचरण केलं असतं तर कितीतरी चांगलं झालं असतं; मात्र आपल्या पाल्याला अगदी फुलासारखे झेलून धरणारे केविलवाणे आईबाप शाळेच्या गेटवर सोडून एकेक माघारी जात होते तेव्हा मला माझ्या परीक्षेचे दिवस आठवले…! असं तेव्हा नव्हतं म्हणूनच प्रगती झाली म्हणायची ! स्वतः हातपाय हलवायला त्याच परिस्थितीने शिकवलं आज मात्र आईबाप मुलांना अजिबात ते हलवू देत नाही म्हणूनच की काय या पिढीची खूप चिंता वाटते.
निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी , लासूर स्टेशन, छत्रपती संभाजीनगर
9423180393,8668779597.
मला आज पालकांची खूपच कीव आली. दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर म्हणून जो तो आपल्या पाल्याला जिथं पेपर असेल तिथं सोडायला येत होता. शाळेच्या समोरून दोन्ही बाजूंना गेलेला रस्ता आणि मधोमध शाळा अशी ती तिथली परिस्थिती होती. शाळेला मैदान आणि इमारत धरून जेवढी जागा होती त्यापेक्षा दुप्पट चौपट गाड्या पार्किंग केलेल्या मला तर आश्चर्याचा धक्काच बसला !
मुलांपेक्षा आईबापांना जास्त काळजी म्हणायची…. येणाऱ्या प्रत्येकाचीच आर्थिक परिस्थिती सुधारल्याचं ते एक ज्वलंत चित्र होतं. बऱ्याच जणांच्या तोंडी वाक्य होते,“आपल्याला नाही मिळालं निदान पण पोरांच्या नशिबाने आहे मग त्यांना कशाला कमी पडू द्यायचं….?” त्यांच्या मनात पडणारे प्रश्न अगदी बरोबर परंतु त्या पाल्यांच्या दृष्टीने मात्र घातक! अगदी चिमणी पाखरं सुद्धा त्यांच्या पिलांना एकदा हवेत उडायला लागेपर्यंतच जबाबदारी घेतात हा निसर्ग नियम इकडे पण लागू होतो परंतु आपण त्यातलं गमक ते लक्षात घेत नाही.आपल्या मुलाने असं व्हावं तसं व्हावं असं पालकांना वाटणं सहाजिक परंतु अवास्तव अपेक्षा नकोत. मुलाचा कल आणि आवड हे न बघता बऱ्याच ठिकाणी मुलांना प्रेशराईज केलं जातं आणि मग पालकांच्या मनाप्रमाणे घडलं नाही की काहीतरी विपरीत गोष्टी घडतात.
जुन्या काळात कधी पोरांचे पेपर सुरू झाले अन् संपले हे मुलांना थेट उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर त्यांच्या पालकांच्या लक्षात यायचं ! आज – काल सगळं मिनिटा मिनिटावर येऊन थांबलं आहे. मोबाईलमुळे घरातून शाळेत गेलेल्या मुलाला पालकांनी लाईव्ह लोकेशनचा सुद्धा पर्याय समोर ठेवलाय ! म्हणजे मागच्या पाच मिनिटांपूर्वी आपला मुलगा कुठं आणि सध्या तो कुठे पोहोचलाय ! हे मात्र अति झाल्यासारखं झालंय !“ खरं की नाही ?” वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आली असं म्हणायला हरकत नाही. त्यातल्या त्यात आज सकाळपासूनच माझ्या घरासमोरच्या शाळेत हा पार्किंगचा मोठा गोंधळ उडाला.
लाऊड स्पीकरवर सांगणारा कितीतरी ओरडून सांगत होता परंतु कोणालाच काही फरक पडेना ! शेवटी वाहतुकीचा संपूर्ण गच्चा झाला. नंतर येणाऱ्या पालकांना अन् परीक्षार्थींना एका किलोमीटर वरूनच पायंदळी यावं लागलं. मी तर म्हणतो परीक्षेसाठी फक्त मुलांना पाचरण केलं असतं तर कितीतरी चांगलं झालं असतं; मात्र आपल्या पाल्याला अगदी फुलासारखे झेलून धरणारे केविलवाणे आईबाप शाळेच्या गेटवर सोडून एकेक माघारी जात होते तेव्हा मला माझ्या परीक्षेचे दिवस आठवले…! असं तेव्हा नव्हतं म्हणूनच प्रगती झाली म्हणायची ! स्वतः हातपाय हलवायला त्याच परिस्थितीने शिकवलं आज मात्र आईबाप मुलांना अजिबात ते हलवू देत नाही म्हणूनच की काय या पिढीची खूप चिंता वाटते. नेळभटपणाचे प्रमाण प्रमाणापेक्षा वाढते की काय हे सुद्धा सांगता येत नाही! तसं जर होऊ द्यायचं नसेल तर मुलांना त्यांचे प्रयत्न त्यांच्या पद्धतीने करू द्यायला हवं….आपली अनावश्यक लुडबुड व्यर्थ आहे…! असं म्हटलं तरी काही वावगं नाही.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.

ब्लॅक, व्हाईट अन् ग्रे मध्ये मुख्यत्वे समाजचिंतनशील स्वरूपाचे लेखन