कोल्हापूर – दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने कवितासंग्रहासाठी डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ राज्यस्तरीय काव्यपुरस्कार देण्यात येणार आहे. २०२५ या वर्षात प्रसिद्ध झालेले काव्यसंग्रह त्यासाठी पात्र ठरतील, तरी यासाठी काव्यसंग्रह पाठवावेत असे आवाहन, दमसाच्या वतीने करण्यात आले आहे.
नव्या पिढीतील ख्यातनाम कवी आणि कादंबरीकार डॉ. धम्मपाल रत्नाकर यांच्या स्मृत्यर्थ रत्नाकर काव्य पुरस्कार देण्यात येतो. यापूर्वी सुरेश सावंत, अजय कांडर, श्रीकांत देशमुख, श्रीधर नांदेडकर, कल्पना दुधाळ, सारिका उबाळे, पी. विठ्ठल, अरुण इंगवले, संजीवनी तडेगावकर, सुचिता खल्लाळ, पद्मरेखा धनकर, दीपक बोरगावे, कविता मुरूमकर, हबीब भंडारे, गोविंद काजरेकर, राजेंद्र दास, केशव सखाराम देशमुख, कीर्ती पाटसकर, संजय कृष्णाजी पाटील, सुनिता झाडे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
दहा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. यासाठी ०१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ या वर्षात प्रसिद्ध झालेल्या काव्यसंग्रहाच्या दोन प्रती ०५ मार्च २०२६पर्यंत कार्यवाह, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, ए वॉर्ड, ६ स्मृती अपार्टमेंट, बाबूजमाल रस्ता, सरस्वती टॉकीज जवळ, कोल्हापूर – ४१६०१२ या पत्त्यावर पाठवाव्यात.
