मानवी जीवनप्रवासात पुस्तके ही जीवनप्रवास समृद्ध करतात. सर्जनशीलतेचा महामार्ग पुस्तकांच्या पानापानांतूनच जातो. युवालेखक व कवी आशिष निनगुरकर यांच्या “अग्निदिव्य” या चरित्रात्मक मराठी पुस्तकाची दखल कॅनडा येथील ‘द रिडर्स क्लब’ या संस्थेने घेतली असून त्यांना या पुस्तकाच्या लेखनाबद्दल विशेष कार्यक्रमात दिग्गज लेखकांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. सोशल मीडियाच्या काळात अलीकडे वाचन होत नाही असे सातत्याने बोलले जाते, मात्र ‘अग्निदिव्य’ या मराठी चरित्र पुस्तकाची परदेशात घेण्यात आलेली दखल अभिमानाची व कौतुकाची बाब आहे.
कॅनेडातील ‘द ग्रेट रिडर्स क्लब’च्या वतीने दरवर्षी विविध उपक्रम राबवले जातात. लोकांमध्ये वाचनाची सवय वाढवणे आणि जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे त्यांच्या चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे.एका मुलाची आंतरिक वेदना, एका महिलेचा आभाळाएवढा संघर्ष व समाजमन असे तीन टप्पे लेखक आशिष निनगुरकर यांच्या ‘अग्निदिव्य’ या चरित्रात्मक पुस्तकात उत्तमरीत्या मांडले आहेत. एका संकटग्रस्त कुटुंबातील स्त्रीला संशयकल्लोळातून कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं, हे सांगणारी ही वास्तव कथा.
लागोपाठच्या संकटांनी तिच्या आयुष्याची परवड झाली. त्यातही ती खंबीरपणे उभी राहिली. संकटांशी दोन हात केले. आपल्या मुलासाठी संघर्ष केला. अनंत अडचणींवर मात केली. मुलाला अर्थार्जनासाठी सक्षम केलं. त्याच्या पायावर उभं केलं. एका आईचं कर्तव्य पार पाडलं. कुठलाही दोष नसताना, गैरसमजाच्या अग्निदिव्यातून जात तिनं एक महत्त्वाचा टप्पा गाठला. यात आपलं अस्तित्व, ओळख मात्र ती पार विसरून गेली. तिच्या कष्ट-त्याग-समर्पणाचीच ही गाथा म्हणजे अग्निदिव्याची.
‘अग्निदिव्य’ या पुस्तकाला प्रकाशक घनश्याम पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे.या पुस्तकाचा व लेखकाचा सन्मान तसेच मुलाखतीचा कार्यक्रम टोरंटो शहरात होणार आहे.नात्यांची ओळख सांगणारे हे आशयघन पुस्तक काळजाचा ठाव घेणारे आहे.चपराक प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती असलेल्या “अग्निदिव्य” या चरित्रात्मकाचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
याअगोदर आशिष यांचे ‘स्ट्रगलर, हरवलेल्या नात्यांचं गावं, न भेटलेली तू,कुलूपबंद,स्ट्रगलर,चित्रकर्मी व उजेडाच्या वाटा’ अशी काही पुस्तके प्रकाशित झाली असून ते लघुपट, माहितीपट व चित्रपटांसाठी लेखन करतात. सध्या ते मुंबईत डाक विभागात नोकरीस असून साहित्य व कला क्षेत्रात कार्यरत आहेत.वाचनाने आपली भाषा, विचार समृद्ध होत जातात. विचारांची ही श्रीमंती तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मराठीतील अटकेपार झेंडा लावणाऱ्या ग्रामीण भागातील या युवा लेखकाचे व त्यांनी लिहिलेल्या या दर्जेदार पुस्तकाचे आपण कौतुक करूया. रमाबाई यांचा जीवनपट वाचून आपल्या जीवनातील असंख्य अडचणी आपल्याला नगण्य वाटतील व स्त्रीचा आदर करणे गरजेचे आहे हे देखील मनोमन पटते. वाचनाने विचार आणि वाचा यात प्रगल्भता येते. म्हणून वाचाल तर वाचाल आणि समृद्धपणे जगाल.त्यामुळे मराठी साहित्यातील या लेखकाच्या पुस्तकाची परदेशात घेण्यात आलेली दखल कौतुकास्पद आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.