अवकाळीचे वातावरण अजूनही टिकूनच – माणिकराव खुळे
गेल्या दोन दिवसात खान्देश, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजांचा गडगडाट, गारा, वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असुन अवकाळीचे वातावरण महाराष्ट्रात अजूनही टिकूनच आहे.
सध्या मार्गस्थ होत असलेल्या पश्चिमी झंजावाताबरोबरच गुरुवारी (ता.२९ फेब्रुवारीला) पुन्हा एक पश्चिमी झंजावात मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर गुजरातमधील पोरबंदर जिल्ह्याच्या पश्चिम किनार पट्टी अरबी समुद्र ते राजस्थानच्या जोधपूर पर्यन्त पसरलेल्या समुद्रसपाटी पासून जवळपास १ किमी. उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीच्या आस ह्यांच्या एकत्रित परिणामतून संपूर्ण उत्तर भारतात, शनिवार ( दि.२ मार्चपर्यंत ) विशेषतः १ व २ मार्चला अधिक) जोरदार पाऊस व जबरदस्त बर्फबारी होण्याची शक्यता वाढली आहे.
वातावरणीय परिणामबरोबरच महाराष्ट्रातही, कर्नाटकतील चिकमंगलूर ते महाराष्ट्रातील सातारा रत्नागिरी पर्यन्त समुद्रसपाटी पासून जवळपास १ किमी. उंचीपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाच्या निर्वात पोकळीच्या जाडीत पसरलेल्या आसामुळे मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातही विजा, वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता अजुन ४ दिवस वाढली असुन ती शनिवार ( दि.२ मार्च ) पर्यन्त टिकून आहे.
