जयंत पवार यांच्या लेखनाशी दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत
जयंत पवार संमेलनात संमेलनाध्यक्ष अभिनेते अनिल गवस यांचा स्पष्ट आरोप
संमेलनाला मुंबई, पुणे, गोवा रत्नागिरी, कोल्हापूर भागातून रसिकांची उपस्थिती
मालवण – जयंत पवार हे नाटककार आणि लेखक म्हणून समूहाचे लेखक होते. त्यांनी व्यक्तीपेक्षा समूहाचे हित बघितले. त्यांच्या ‘ अधांतर ‘ नाटकाने स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले.मात्र याच नाटकावर प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी निर्मिती केलेला लालबाग परळ… हा सिनेमा चांगला नाही. चित्रपटाची व्यावसायिक गणिते घालून या मूळ नाटकाच्या संहितेत बदल केला गेल्यामुळे तो उत्तम चित्रपट निघू शकला नाही. यामुळे जयंत यांच्या नाट्य लेखनाशी महेश मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत. मात्र महेश मांजरेकर यांनी मराठीतील अनेक मुलांना हिंदीत चित्रपटात काम दिलं याचा आपल्याला अभिमान आहे असे स्पष्ट प्रतिपादन जयंत पवार स्मृती संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सुप्रसिद्ध अभिनेते अनिल गवस यांनी केले.
सिंधुदुर्ग सुपुत्र विख्यात नाटककार, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कथाकार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार स्मृती संमेलन समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने मालवण येथील सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी, समाज साहित्य प्रतिष्ठानचे विश्वस्त विलास कोळपे यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलताना अभिनेते गवस यांनी महेश मांजरेकर हे फिल्मी आहेत, ते व्यवसाय बघतात त्यानुसार ते मूळ लेखनात बदल करतात त्यामुळे अधांतर नाटक आणि त्याचा सिनेमा यात फरक राहिला. नाटका एवढा सिनेमा चांगला झाला नाही असेही सांगितले.संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर यांनी पाब्लो नेरोदा यांची कविता वाचन करून संमेलनाचे उद्घाटन केले.
यावेळी मंचावर संमेलनातील व्याख्याते सुप्रसिद्ध समीक्षक डॉ दत्ता घोलप, समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय कांडर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर, संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री सध्या तांबे आदी उपस्थित होते तर यावेळी सभागृहात ज्येष्ठ अभिनेते खोपकर,अभिनेते नंदू सावंत, नामवंत समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, कादंबरीकार प्रवीण बांदेकर, समीक्षक संदीप दळवी, प्रा.गुंड, नाट्य निर्माते – दिग्दर्शक वामन पंडित, ज्येष्ठ रंगकर्मी विलास कोळपे, अनुष्टुभ प्रतिष्ठित मासिकाचे जयप्रकाश लब्दे, सामाजिक कार्यकर्त्या मंगल परुळेकर, बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक कवी अजय कांडर, अध्यक्ष मधुकर मातोंडकर, प्रमुख कार्यवाह सुरेश बिले इतर पदाधिकारी ॲड. विलास परब, प्रा. संजीवनी पाटील, ॲड. मेघना सावंत, प्रियदर्शनी पारकर, सफरअली इसफ, ॲड. भालचंद्र सुपेकर, हरिश्चंद्र भिसे, सत्यवान साटम आदी उपस्थित होते. संमेलनाला मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी होते या भागातून मोठ्या प्रमाणात रसिक उपस्थित होते.
अनिल गवस म्हणाले, जयंत यांचं लेखन जगल तरच अभिनय करता येतो. जयंत यांचे अंधांतर नंतरच सगळ्यात महत्वाचे नाटक म्हणजे काय डेंजर वारा सुटला. जयत यांना लोकाश्रय खूप मिळाला पण ते राजश्रेय पासून दूर राहिले. लेखक आणि अभिनेत्यानेही समाजाचा भाग व्हायला पाहिजे. जबाबदार नागरिक बनायला पाहिजे. नटाने आणि लेखकाने आपल्या भूमिकेशी ठाम असायला हवे. जयंत हे कायम आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. दुसऱ्याच्या ऐकण्यालाही महत्त्व दिले. त्यांनी स्वतःच्या लिहिण्याला महत्व दिले. जयंत हे सयमाचे महामेरू होते. जयंत यांची दोन नाटके अप्रकाशित आहेत. ही नाटके रंगमंचावर येण्यासाठी लोकवर्गणी काढली जावी आणि मोफत त्याचे प्रयोग केले जावेत. लक्ष्मीची खानावळ हे त्यांचे अप्रकाशित अप्रतिम नाटक आहे.जयंत यांचा परदेशी नाटकाचाही अभ्यास होता.
त्यांनी सगळ्यांच्या नजरेतून समीक्षक म्हणून नाटक बघितले. त्यांनी कधीही समीक्षक म्हणून नाटकाला झोडल नाही. त्यांच्या नाट्य समीक्षने नाटक चालण्याला बळ दिले. डेंजर वारा… नाटकाला किणी प्रकरणाचा संदर्भ असल्याने ते नाटक रंगमंचावर आणण्याचे कोणी धाडस केले नाही. दहशतीला का घाबरायचे. दाभोळकर, पानसरे गेले आपणही घाबरता नये. मृत्यूला घाबरून जगणे हे मरणाहून वाईट आहे. तुमच्या भूमिके समोर मानधन महत्वाच नाही. कलावंताने आपला आत्मा विकू नये. जयंत पवार स्मृती संमेलने महाराष्ट्रभर व्हावी.
अनिल गवस
जयंत पवार यांनी एकूण भारतीय साहित्यातील श्रेष्ठ दर्जाची कथा लिहिली आहे. मराठी कथेचा अवकाश विस्तारण्याचे काम त्यांनी केले. भूमिका घेणारा आणि लेखकपणाचं मूल्य जाणणारा समकाळातील महत्त्वाचा लेखक आहे. जयंत पवार स्मृती संमेलन हे त्यांच्या साहित्य विचारांचा जागर करणारे संमेलन आहे. अशी संमेलने संपूर्ण महाराष्ट्रात व्हायला हवीत.
डॉ. दत्ता घोलप
यावेळी अजय कांडर यांनी विचार व्यक्त केले. संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागातील कवी आपल्या कविता सादर केल्या. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा संजीवनी पाटील यांनी केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रियदर्शनी पारकर यांनी केले. मधुकर मातोंडकर यांनी प्रस्तावना केली. सुरेश बिले यांनी आभार मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.