Shivkalin Water Management: Shyam Anant Gaonkar's Konkani Translation Highlights Shivaji's Vision
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सर्वश्रुत आहे; मात्र त्यांच्या दूरदर्शी जलनितीची चर्चा तुलनेने कमी होते. आज पाण्याच्या गंभीर संकटाचा सामना करणाऱ्या समाजासाठी शिवकालीन जलव्यवस्थापनाची तत्त्वे नव्याने समजून घेणे ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रातील डॉ. लहू गायकवाड यांच्या शिवकालीन जलनिती या पुस्तिकेचा गोवा सरकारचे सहाय्यक माहिती अधिकारी श्याम अनंत गांवकर यांनी शिवकालीन उदकाचे व्यवस्थापन या नावाने केलेला कोकणी अनुवाद हा केवळ साहित्यिक उपक्रम नसून जलसाक्षरतेचा आणि शिवविचारांचा महत्त्वपूर्ण सेतू ठरला आहे. अनु देसाई, हळणे पेडणे, गोवा
गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्यात सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्याम अनंत गांवकर हे गोव्यातील अष्टपैलू, अभ्यासू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित आहेत.महाराष्ट्रातील अभ्यासू लेखक डॉ.लहू गायकवाड यांच्या शिवकालीन जलनिती या मूळ मराठी पुस्तिकेचा ‘शिवकालीन उदकाचे व्यवस्थापन’ या शीर्षकाखाली त्यांनी केलेला कोकणी अनुवाद हा गोवा आणि गोमंतकीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सांस्कृतिक व बौद्धिक ठेवा ठरावा, असे म्हणावे लागेल.
आज देशातील जलव्यवस्थापनाची परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, “पाण्यासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा” ही म्हण अक्षरशः वास्तव वाटू लागली आहे. मानवी जीवनात शुद्ध पिण्याचे पाणी नसेल, तर कितीही सुबत्ता, ऐश्वर्य, शक्ती, सामर्थ्य किंवा बुद्धिमत्ता असली तरी ती निरर्थक ठरते. कारण पाणी हेच जीवनाचा मूलाधार आहे.
विज्ञानाने आज अवकाशापर्यंत झेप घेतली आहे. ‘दुनिया मेरी मुठ्ठी में’ अशी परिस्थिती निर्माण झाली असली, तरी जीवनातील सर्वात मूलभूत गरज असलेल्या पाण्याच्या नियोजनाबाबत आपण अजूनही गंभीरपणे विचार करताना दिसत नाही. जलव्यवस्थापनात फिनलंडसारखा छोटासा देश आज जगात अव्वल मानला जातो. त्यामुळेच तो जगातील सर्वाधिक आनंदी आणि सुखी देशांपैकी एक ठरला आहे. त्याउलट भारत जलव्यवस्थापनाच्या बाबतीत अजूनही अपेक्षित स्थान प्राप्त करू शकलेला नाही. जलव्यस्थापनाबाबत भारत जगात तब्बल ५३ व्या क्रमांकावर आहे.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण दूरदर्शी, प्रज्ञावंत आणि लोककल्याणकारी राजा म्हणून गौरव करतो, त्या महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी जलव्यवस्थापनाचे जे आदर्श तत्त्वज्ञान प्रत्यक्ष कृतीतून जगासमोर ठेवले, ते आजही तितकेच प्रेरणादायी आहे.
इ.स. १६७० मध्ये भरतगडावर किल्ला उभारण्याचा विचार झाला. मात्र त्या ठिकाणी पाण्याची शाश्वत व्यवस्था होऊ शकणार नाही, हे लक्षात येताच महाराजांनी किल्ला बांधण्याचा निर्णय तत्काळ रद्द केला. यावरून किल्ल्याची सुरक्षा किंवा लष्करी सामर्थ्य यापेक्षाही जलसुरक्षेला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले होते, हे स्पष्ट होते. नंतर त्या परिसरात पाण्याचा झरा सापडल्याची माहिती फोंड सावंत यांनी दिल्यानंतर महाराजांनी पुन्हा किल्ला उभारण्याचा निर्णय घेतला. किल्ल्यावर वसाहत निर्माण होणार असल्याने दहा घरांमागे एक विहीर असावी, असे आदेश त्यांनी दिले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर महाराष्ट्राबाहेरील भागांतही त्यांनी जलनियोजनाचा आदर्श निर्माण केला.
किल्ल्यांच्या बांधकामासाठी जागेची अचूक निवड,उपलब्ध दगडांचा योग्य उपयोग, दगड काढल्यानंतर तयार झालेल्या खाणींमध्ये पावसाचे पाणी साठवून वर्षभरासाठी जलसाठा निर्माण करणे, तसेच प्रत्येक गडावर पाण्याची कमतरता भासू नये यासाठी केलेले नियोजन हे त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहे.
या पुस्तिकेत शिवाजी महाराजांनी जलव्यवस्थापनासंदर्भात दिलेल्या विविध सूचनांचा अत्यंत अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे. अवघ्या पन्नास पानांच्या या पुस्तिकेतील प्रत्येक शब्द आणि प्रत्येक परिच्छेद वाचकाला महाराजांच्या दुर्लक्षित राहिलेल्या जलदृष्टीची नव्याने ओळख करून देतो. त्यांचा पराक्रम जितका दैदिप्यमान होता, तितकीच त्यांची जलनितीही दूरदर्शी आणि लोककल्याणकारी होती, याची प्रखर जाणीव ही पुस्तिका करून देते.
आज गोव्यातील अनेक गावांमध्ये वर्षभर पाणीटंचाईच्या बातम्या सातत्याने समोर येतात.शंभर टक्के साक्षरतेचा दावा करणाऱ्या या राज्यातही जीवनावश्यक पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गावागावांत छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्याची चांगली परंपरा आहे आणि ती निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र त्याचबरोबर महाराजांच्या जलव्यवस्थापनाच्या विचारांचा प्रसार होणेही तितकेच आवश्यक आहे.
ही पुस्तिका प्रत्येक गावात, प्रत्येक घरात आणि विशेषतः प्रत्येक शाळेत पोहोचली पाहिजे. कारण याच शाळांतून उद्याचा जबाबदार नागरिक घडणार आहे. पाण्याचे महत्त्व, जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाचे संस्कार बालपणापासूनच रुजणे ही काळाची गरज आहे.
जगभरातील पर्यावरणतज्ज्ञ आणि संरक्षण अभ्यासक वारंवार इशारा देत आहेत की, भविष्यातील मोठे संघर्ष हे सोने, सत्ता किंवा संपत्तीसाठी नव्हे, तर पाण्यासाठी होतील. जागतिक स्तरावर वाढत असलेले जलसंकट गोव्यालाही अपवाद नाही. त्यामुळे जलसंवर्धन आणि जलनियोजनाचा संदेश देणारी ही पुस्तिका आज अधिकच महत्त्वाची ठरते.
श्याम अनंत गांवकर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक हा कोकणी अनुवाद साकारला आहे.शिवकालीन जलनितीशी संबंधित दुर्मीळ आणि समर्पक छायाचित्रांचाही त्यांनी पुस्तिकेत समावेश केला आहे. त्यामुळे ही पुस्तिका केवळ अनुवाद न राहता जलसंस्कृतीचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज बनली आहे. गोव्यातील प्रत्येक नागरिकाने आणि विशेषतः नव्या पिढीने ती अवश्य वाचावी, अशीच अपेक्षा आहे.
पुस्तिका : शिवकालीन जलनिती (मराठी)
लेखक : डॉ. लहू गायकवाड
अनुवाद : शिवकालीन जलनिती (शिवकालीन उदकाचे व्यवस्थापन) (कोंकणी)
अनुवादक : श्याम अनंत गांवकर
जागतिक पातळीवरील मंदीचे सावट व देशांतर्गत आव्हाने या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था एका महत्त्वाच्या वळणावर उभी…
आषाढी एकादशीपर्यन्त पावसाचे सातत्य कायम आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती…
नीट पेपरफुटीने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले असतानाच शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या…
भारताच्या चिंतेचा कॅनव्हास ‘इप्सॉस’ (Ipsos) या आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व्हेक्षण संस्थेने जून २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या…
पारंपरिक तंत्रज्ञानाकडून स्वायत्त सहकाऱ्याकडे होणारी वाटचाल आणि वृत्तगृहातील (Newsroom) आमूलाग्र बदल कृत्रिम बुद्धिमत्तेची पुढची उत्क्रांती…
राजाच्या आज्ञेची अक्षरे उमटलेला साधा चामड्याचा तुकडा संपूर्ण राज्यात अमूल्य ठरतो; कारण त्याचे मूल्य चामड्यात…