May 15, 2026
उंचखडक येथे विमल आणि उत्तम मुळे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ‘आधारवड’ गौरवग्रंथाचे प्रकाशन करताना मान्यवर
Home » ‘आधारवड’ गौरवग्रंथातून उलगडला संस्कारांचा सुवर्णप्रवास
काय चाललयं अवतीभवती

‘आधारवड’ गौरवग्रंथातून उलगडला संस्कारांचा सुवर्णप्रवास

पुणे ः “आई वडिलांचे अभीष्टचिंतन करताना गौरवग्रंथ रूपातून त्यांच्या आठवणी संग्रहित करण्याचा एक नवा आदर्श या भावंडांनी घालून दिला,” असे प्रशंसोद्गार जिल्हा परिषद सदस्या स्मिताताई कणसे यांनी काढले.

पुणे जिल्ह्यातील उंचखडकसारख्या एका अत्यंत ग्रामीण भागात विमल मुळे यांच्या अमृतमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रत्येकाला आयुष्यभर पुरणारी संस्काराची शिदोरी देणाऱ्या वंदनीय विमलताई आणि उत्तम मुळे या उभयतांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणारे ‘आधारवड’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सर्व चुलत, मावस, आत्ये-मामे भावंडांनी, हितचिंतकांनी आपापल्या आठवणींचे एक संकलन या ग्रंथात केले असून प्रमुख संपादन बाळू उत्तम मुळे, डॉ. लता भरत पाडेकर आणि प्रा. संगीता गुलाबराव सरोदे या त्यांच्या तिन्ही अपत्यांनी केले आहे. विश्वकर्मा पब्लिकेशन्स पुणे यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला. अरुण डौले यांनी काढलेले छायाचित्र मुखपृष्ठावर आहे तर पाठराखण संदीप तापकीर यांनी केली आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अहिल्यानगर येथील कीर्तनकार केशवमहाराज जगदाळे यांचे सकळ तीर्थाचिये धुरे । जिये का माता पितरे । तया सेवेशी कीर शरीरे । लोण की जे ॥’ ज्ञानेश्वरीच्या १७व्या अध्यायामधील या ओवीवर सुश्राव्य प्रवचन झाले. त्यांनी मातापित्यांच्या सेवेबद्दलची भावना व्यक्त केली. संस्काराचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतिशील शेतकरी तात्याभाऊ भागु यादव होते; तर प्रमुख अतिथी स्मिताताई कणसे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे संपादक आणि इतिहास संशोधक संदीप तापकीर, स्तंभलेखक व शिवनेरीची श्रीमंतीचे लेखक संजय नलावडे, उत्तम बबन मुळे, शारदा डुंबरे, राज्य पुरस्कार प्राप्त माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण बाचल, बाळासाहेब कानडे, जामखेड येथील उपक्रमशील शिक्षक मनोहर इनामदार, वारकरी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष गंगारामबाबा डुंबरे, गणेश दूध डेअरी संघाचे अध्यक्ष सुभाष पाटील यांच्या हस्ते ‘आधारवड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

याप्रसंगी ‘माणसा-माणसांत सदैव देवत्त्व पहायला शिकविणाऱ्या आई म्हणजे विमलताई’ असे तापकीर यांनी आपल्या मनोगतात सांगताना अनेकांना गहिवरून आले. कळंब येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक बाळासाहेब कानडे म्हणाले, “प्राप्त परिस्थितीत मुलांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या आधुनिक सावित्री म्हणजे विमलताई मुळे.” तर “मुळे परिवाराचा शैक्षणिक, पारमार्थिक आणि सामाजिक वसा हा वाखाणण्यासारखा आहे,” असे मनोहर इनामदार यांनी आवर्जून सांगितले.

हा सोहळा पाहून बाळकृष्ण बाचल म्हणाले, “मुलांवरील संस्काराचे पहिले विद्यापीठ हे घर असते आणि त्या घरात आई-वडील, आजी-आजोबांसारखे कुलगुरू असतील तर त्या विद्यापीठातील मुलं नेहमीच इतरांपेक्षा चार पावलं पुढे राहतात.”

आपल्या घराला ‘हरिपाठ’ हे नामाभिधान देणाऱ्या या कुटुंबाकडे एक आदर्श कुटुंब म्हणूनच समाज पाहत आहे, असे सांगून संजय नलावडे यांनी त्यांचे अध्यात्मिक क्षेत्रातील योगदान स्पष्ट केले. विमल मुळे यांची बालमैत्रीण शारदा डुंबरे यांनीही त्या दोघींतील बालपणीच्या काही घटना सांगितल्याने हलाखीतून झालेला संघर्ष ऐकताना उपस्थितांचे अंत:करण भरून येत होते.

अनंतराव गटकळ, मनोहर इनामदार, प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते पंकज कणसे, उंचखडक येथील माजी सरपंच सुरेश कणसे, अंजनी डुंबरे, सुभाष बोऱ्हाडे इत्यादींची समयोचित भाषणे झाली. तात्याभाऊ यादव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मुळे दांपत्याच्या कार्याचा, त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला आणि परस्परांतील मैत्रीचा सुंदर अध्याय उलगडून दाखविला. या हृद्य सोहळ्यासाठी राजुरी येथील जनता विकास मंडळाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गटकळ, प्राथमिक शिक्षिका मंदाकिनी घंगाळे, सतीश बांगर, कृष्णा कोले, सारंग म्हात्रे, येरवडा येथील विद्यानिकेतनच्या माजी मुख्याध्यापिका कल्पना चव्हाण, प्रशांत वाघमारे, सतीश मोरे, मनीषा सरोदे त्याचप्रमाणे सगेसोयरे, स्नेही आणि उंचखडकचे समस्त ग्रामस्थ शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे – ‘कुळी कन्या पुत्र असावे सात्विक । तयाचा हरिक वाटे देवा ॥’ या न्यायाने मुलांनी घडवून आणलेला हा अभीष्टचिंतनाचा सोहळा अविस्मरणीय होता. प्रास्ताविक डॉ. लता पाडेकर यांनी तर सूत्रसंचालन प्रा. संगीता सरोदे यांनी केले. मांजरवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष रमेश मुळे यांनी आभार मानले.

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी

Related posts

समीक्षारत्न साहित्य पुरस्कार जाहीर

कोरकू बोलीसाठी उन्नती संस्थेचा उपक्रम

अवकाळीचे वातावरण निवळणार 

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406