fliif Reader app download

📚 fliif Reader

मातृभाषेत वाचनाचा आनंद

कथा, कादंबऱ्या, लोकसाहित्य आणि प्रेरणादायी पुस्तके — तुमची खिशातली डिजिटल लायब्ररी आता मोबाईलवर.

👉 fliif Reader डाउनलोड करा
June 8, 2026
Home » खदानींच्या जलसाठ्यांना जलस्रोत म्हणून बघणे काळाची गरज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खदानींच्या जलसाठ्यांना जलस्रोत म्हणून बघणे काळाची गरज

अकोला जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत खनिज उत्खननानंतर निर्माण झालेल्या खदानी आज केवळ धोकादायक खड्डे राहिलेल्या नाहीत, तर त्या संभाव्य जलसंपत्तीचे महत्त्वपूर्ण स्रोत ठरू शकतात. वाढते तापमान, घटणारी भूजल पातळी आणि पाण्याची टंचाई या पार्श्वभूमीवर खदानींमध्ये साचलेल्या पाण्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. योग्य नियोजन, सुरक्षितता आणि संवर्धनाच्या उपाययोजनांद्वारे या जलसाठ्यांचे रूपांतर शाश्वत जलस्रोतांमध्ये करता येऊ शकते. त्यामुळे खदानींचे जलसाठे हे पर्यावरण संवर्धन, भूजल पुनर्भरण आणि ग्रामीण विकासासाठी प्रभावी साधन ठरू शकतात.

प्रा.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार,
माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ.

पाणी जीवन आहे. पाण्याचे महत्व सारे जाणत असूनही पाण्याच्या बाबतीत माणूस म्हणावा तसा काळजीने वागताना दिसत नाही. ‘तिसरे महायुद्ध झालेच तर ते पाण्यासाठी होईल’ अशी रास्त भिती तज्ज्ञ व्यक्त करतात. पाणी सोन्यापेक्षा मोलाचे आहे हे कळते पण वळत नाही. त्यामुळे जिथे जिथे व ज्या ज्या माध्यमातून पाणी उपलब्ध आहे, त्या उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त आणि योग्य वापर करण्यासाठी जलसंधारण आणि पाण्याचे नियोजन करणे ही काळाची गरज आहे.

अकोला जिल्ह्यातील खदानींमधून गौण खनिज काढल्यानंतर मोठ्या प्रमाणावर तयार झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले दिसते. यात पोहण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. पण यापलीकडे या जलसाठ्यांकडे बघणं आता गरजेचे आहे. हे विनामुल्य उपलब्ध झालेले जलसाठे आहेत.अकोला जिल्हा प्रामुख्याने कोरडवाहू जमीन आणि कडक उन्हाळ्याचा असल्याने येथे पाण्याचे नियोजन करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे अशा खदानींच्या जलसाठ्यांकडे जलस्रोत म्हणून बघणे ही काळाची गरज आहे.

खदानीमुळे निर्माण झालेल्या खड्ड्यांमध्ये (ज्याला ‘क्वॉरी लेक्स’ किंवा ‘माइन पिट लेक्स’ म्हणतात) पाणी साठवून त्याचा जलस्रोत म्हणून वापर करणे शक्य आहे आणि या प्रक्रियेला ‘माइन वॉटर हार्वेस्टिंग’ किंवा जलपुनर्भरण म्हटले जाते. खदानींचे खड्डे खूप खोल व कडेने धोकादायक ठरू शकतात. त्यात अपघाताने नाहक बळी जाण्याचे प्रकार पण होतात. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी सुरक्षेचे उपाय जसे कठडे लावणे आवश्यक आहे. खदानींच्या जलसाठ्यांमधील कचरा/गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविली जाऊ शकते. काढलेला गाळ शेतात वापरल्याने जमिनीची सुपीकता वाढवू शकतो.

खदानींच्या खड्ड्यात साठलेले पाणी जमिनीत मुरून आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळी वाढते. आजूबाजूच्या कोरड्या विहिरी जिवंत होतात किंवा नजीकच्या कूपनलिकेच्या (बोअरवेल) जलपातळीत वाढ होते. त्यामुळे उपलब्ध झालेल्या अतिरिक्त पाण्याचा फायदा सिंचन की औद्योगीकरणासाठी घ्यायचा हे तेथील आजूबाजूच्या परिसरावर अवलंबून आहे. खदानीत साचलेल्या पाण्याची गुणवत्ता तपासून ते पिण्यायोग्य आहे की शेतीच्या वापरण्यासाठी आहे, हे बघणे आवश्यक ठरते. त्यात मत्स्योद्योग होऊ शकतो का हे पण पाहणे महत्त्वाचे ठरते.

या खदानींच्या जलसाठ्यांच्या आजूबाजूला वृक्षलागवड करून येथील परिसर निसर्गरम्य करता येतो. वृक्ष लागवडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण कमी होईल व ऑक्सिजनची निर्मिती वाढते. तसेच त्यामुळे हवामान बदलाचे संकट रोखण्यास थोडीफार मदत होते, तापमान नियंत्रणात राहते. मातीची धूप थांबून पाणी मुरण्याचे प्रमाण पण वाढते आणि विविध वन्यजीवांना नैसर्गिक निवारा मिळतो. तसेच येथे एखाद्या सहलीच्या ठिकाणाची (पिकनिक स्पॉट) निर्मिती पण करता येऊ शकते. त्यामुळे खदानींच्या जलसाठ्यांचे रूपांतर जलस्रोतात करून त्यातील पाण्याचा शाश्वत वापर, संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणे अत्यावश्यक आवश्यक आहे.

खदानीतील पाण्याचे संवर्धन कसे करावे?

खदानींमध्ये साचलेले पाणी हे अनेकदा दुर्लक्षित राहते. मात्र योग्य नियोजन केल्यास हे जलसाठे भूजल पुनर्भरण, सिंचन, मत्स्यपालन आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त ठरू शकतात. त्यासाठी पुढील उपाययोजना महत्त्वाच्या आहेत :

  • गाळ व कचरा नियमित काढणे
    खदानीत साचलेला गाळ, प्लास्टिक व इतर कचरा काढल्यास पाणीसाठ्याची क्षमता वाढते.
    काढलेला गाळ शेतीसाठी वापरता येतो.
  • पाण्याची गुणवत्ता तपासणे
    पाणी शेती, पशुपालन किंवा इतर वापरासाठी योग्य आहे का याची नियमित चाचणी करावी.
    रासायनिक प्रदूषण आढळल्यास योग्य उपचार करावेत.
  • भूजल पुनर्भरण व्यवस्था निर्माण करणे
    रिचार्ज विहिरी, पाझर तलाव किंवा जलपुनर्भरण खड्डे तयार करून पाणी जमिनीत मुरवावे.
    यामुळे परिसरातील विहिरी आणि बोअरवेलची जलपातळी वाढण्यास मदत होते.
  • सुरक्षेची उपाययोजना करणे
    खदानीभोवती कुंपण, कठडे आणि इशारा फलक लावावेत.
    अपघात टाळण्यासाठी प्रवेशाचे नियमन करावे.
  • वृक्षलागवड करणे
    जलसाठ्याच्या परिसरात स्थानिक प्रजातींची झाडे लावावीत.
    त्यामुळे मृदा धूप कमी होते, पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते आणि जैवविविधतेला चालना मिळते.
  • पावसाचे अतिरिक्त पाणी वळविणे
    नाले व पाणलोट क्षेत्रातील पाणी खदानीत आणण्यासाठी नियोजन करावे.
    यामुळे जलसाठा अधिक काळ टिकून राहतो.
  • मत्स्यपालन आणि जैवविविधता संवर्धन
    पाण्याची गुणवत्ता योग्य असल्यास मत्स्यपालन करता येते.
    जलपक्षी व इतर जीवांसाठी अधिवास निर्माण होतो.
  • समुदायाचा सहभाग वाढवणे
    ग्रामपंचायत, शेतकरी आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून जलसाठ्यांचे संरक्षण करावे.
    जलस्रोतांच्या वापरासाठी स्थानिक नियम तयार करावेत.
  • पर्यटन व पर्यावरण शिक्षण
    सुरक्षिततेची काळजी घेऊन परिसराला निसर्ग पर्यटन किंवा पर्यावरण शिक्षण केंद्र म्हणून विकसित करता येते.
    यामुळे संवर्धनाबाबत जनजागृती होते.
  • दीर्घकालीन व्यवस्थापन आराखडा तयार करणे
    खदानीच्या जलसाठ्याचा वापर, देखभाल आणि संरक्षण यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करावा.
    स्थानिक प्रशासन, जलसंपदा विभाग आणि पर्यावरण तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घ्यावे.

खदानीतील पाणी हे वाया जाणारे पाणी नसून भविष्यातील महत्त्वाचे जलभांडार आहे. योग्य संवर्धन, पुनर्भरण आणि सुरक्षित व्यवस्थापनाद्वारे हे जलसाठे दुष्काळग्रस्त भागांसाठी वरदान ठरू शकतात.

Related posts

महाराष्ट्रात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषित

सध्याचे तापमान सरासरी इतकेच !

महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही. थंडीचीही लागू शकते चाहूल !

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!