जुन्नरच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचा, सांस्कृतिक वारशाचा आणि वर्तमानाचा सर्वांगाने वेध घेणाऱ्या प्रा. डॉ. लहू गायकवाड लिखित ‘असे घडले जुन्नर’ या महाग्रंथाच्या प्रकाशनानिमित्त इतिहासप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. स्थानिक इतिहासलेखनाचा वस्तुपाठ ठरू शकणाऱ्या या ग्रंथाला ज्येष्ठ इतिहासकार व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एमेरिटस प्राध्यापक डॉ. राजा दीक्षित यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून, त्यांनी या ग्रंथाला डॉ. गायकवाड यांची ‘मॅग्नम ओपस’ अर्थात सर्वात महत्त्वपूर्ण साहित्यकृती असे गौरवपूर्ण विशेषण बहाल केले आहे. प्रकाशनाच्या निमित्ताने डॉ. दीक्षित यांची प्रस्तावना….
इतिहासाची व्याप्ती महाप्रचंड आहे. स्थलकालाच्या अंगाने विचार करता इतिहास सर्वव्यापी असल्याचे जाणवते. इतिहास ही मूलतः मानवाची कथा असल्याने या पृथ्वीतलावर मानव अवतरला, तोपर्यंत तरी इतिहास अर्थपूर्णरित्या लक्षात घेता येतो. मानव ज्या पर्यावरणात अवतरला, त्या पर्यावरणाचा विचार करायचा झाल्यास मानवी अस्तित्वाची पार्श्वभूमी म्हणून का होईना, इतिहासाचा अभ्यास अधिकच मागे नेऊन भिडवावा लागतो. कालदृष्ट्या जशी ही व्याप्ती भव्य आहे, तशीच स्थलदृष्ट्यासुद्धा भव्य आहे. कारण इतिहासाचा अभ्यास केवळ महाराष्ट्राला वा भारताला नव्हे, तर जगाला आणि केवळ जगाला नव्हे, तर विश्वाला कवेत घेऊ पाहतो. कौटुंबिक इतिहासापासून (family history) व स्थानिक इतिहासापासून (local history) जागतिक इतिहासापर्यंत (world history) व वैश्विक इतिहासापर्यंत (global history) हा संचार चालू असतो. मानवी जीवनाच्या सर्व अंगांचा विचार त्यात येतो. ‘इतिहास म्हणजे गतकालीन राजकारण’ ही फ्रीमनची अठराव्या शतकातील व्याख्या केव्हाच मागे पडली आणि ‘इतिहास म्हणजे मानवी जीवनाची स्थलकालाच्या संदर्भातील सर्वांगीण कथा’ म्हणून ती स्थिरावली. जगातल्या कोणत्याही गोष्टी इतिहासात समाविष्ट होऊ शकतात आणि कोणत्याही गोष्टीचा इतिहास लिहिला जाऊ शकतो. कविवर्य कुसुमाग्रज त्यांच्या एका कवितेत जसं म्हणतात की, “प्रेम कुणावरही करावे,” तसं मी माझ्या विद्यार्थांना सांगत आलो की, “इतिहास कशाचाही लिहावा!”
या संदर्भात दोनच उदाहरणे देतो. मिशेल फुको (Michel Faucault) यांनी ‘History of Madness’ या ग्रंथात वेडाचा इतिहास मांडला. तसेच लाल रंगाच्या इतिहासावर एक ग्रंथ आणि एक ध्वनिचित्रफीत पाहिल्याचे मला आठवते. साधारणतः १९९०च्या दशकापासून तीव्र बनलेल्या जागतिकीकरणाच्या टप्प्यात एकाच वेळी वैश्विक आणि स्थानिक यांचा विचार करण्याची दृष्टी अधिक प्रमाणात विकसित झाली. त्यातून ‘ग्लोकल’ (glokal/ glocal) म्हणजे ग्लोबल व लोकल तथा वैश्विक व स्थानिक यांचा समन्वित विचार होऊ लागला. उदाहरणार्थ, जागतिक पातळीवरील व्यापार आणि स्थानिक पातळीवरील गरजा यांचा मेळ घालण्याची दृष्टी. १९८०च्या दशकात जपानमध्ये ‘ग्लोकल’ हा शब्द लोकप्रिय झाला. Think globally, act locally यासारख्या संकेताला उठाव मिळू लागला. रोलँड रॉबर्टसन या समाजशास्त्रज्ञाने १९९०च्या दशकात या संकल्पनेविषयी सविस्तर मांडणी केली व सामाजिक शास्त्रांमध्ये तिचा वापर रूढ झाला.
आपल्याकडे मुंबईसारख्या शहरात एखाद्या हॉटेलच्या नावातसुद्धा ‘ग्लोकल’ हा शब्द आढळून येतो. ज्ञानभाषा मानल्या जाणाऱ्या इंग्रजीमध्ये ‘ग्लोकल’सारखा नवा शब्दप्रयोग रूढ होतो, तेव्हा मराठीसारख्या अन्य भाषांमध्येही तो सामावून घेण्याची प्रक्रिया स्वाभाविकपणे घडते. त्यातून परिभाषेत भर पडते वा घालावी लागते. त्यामुळे या ‘ग्लोकल’ला मराठीत काय म्हणावे, असा प्रश्न स्वाभाविकपणे उद्भवलेला आहे. त्यासाठी ‘वैश्विक-स्थानिक’ किंवा ‘विश्व-स्थान-समन्वित’ असा जोडशब्द वापरता येऊ शकतो. तसा वापर योग्य आहे; पण काही संदर्भात त्याचे अधिक अर्थपूर्ण मराठीकरण करण्याच्या हेतूने मी ‘पिंड-ब्रह्मांड-विचार’ असा शब्दप्रयोग नाणावलेला (coin केलेला) आहे.
हे सर्व सांगण्याचे कारण असे की, जेव्हा ‘असे घडले जुन्नर’ स्थानिक इतिहासाच्या क्षेत्रात महाग्रंथ अवतरतो, तेव्हा त्याकडे कोणत्या दृष्टीने पाहावे याचा विचार केला नाही, तर त्या ग्रंथलेखनाचे पुरेसे चीज होणार नाही. जुन्नरच्या स्थानिक इतिहासाच्या अभ्यासात व्यापक अशी पिंड-ब्रह्मांड-दृष्टी मनात बाळगून आपण तो वाचला, तर आपले वाचन अधिक परिपूर्ण आणि फलदायी होईल, हे मी अधोरेखित करू इच्छितो.
तसेच सुरुवातीलाच मी हे देखील सांगू इच्छितो की, जिला इंग्रजीत (मुळात लॅटिनमध्ये) ‘Magnum Opus’ म्हणजे ‘सर्वात महत्त्वाची कामगिरी’ किंवा ‘साहित्यकृती’ असे म्हणतात, तसा प्रा. डॉ. लहू गायकवाड यांच्या बाबतीत हा ग्रंथ म्हणजे ‘मॅग्नम ओपस’ होय. माझ्या एका गुणी विद्यार्थ्याकडून अशी ग्रंथनिर्मिती झाल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो.
विद्यार्थी म्हणून व्यक्तिगत संदर्भात त्याचे जे उल्लेख मी या प्रस्तावनेत करणार आहे, ते एकेरी उल्लेख असणे स्वाभाविक आहे. किंबहुना तो आमच्यातला आपुलकीचा भाग आहे. एक अभ्यासक, प्राध्यापक आणि ग्रंथलेखक या संदर्भात त्याचे जे उल्लेख मी करेन, ते मात्र मुख्यतः ‘अहो-जाहो’च्या भाषेतील तथा बहुमानार्थी असतील. वाचकांनी कृपया ही स्वाभाविक सरमिसळ समजून घ्यावी, ही नम्र विनंती.
महाविद्यालीन व्याख्याता पदासाठीच्या निवड समितीवर तज्ज्ञ परीक्षक म्हणून मला अनेक ठिकाणी जावे लागत असे. अशाच एका मुलाखतीत मी उमेदवारांपैकी एकमेव लायक उमेदवार निवडला. संबंधित संस्थेला मात्र ती निवड मान्य नव्हती. यामध्ये त्यांचे स्थानिक संस्थात्मक राजकारण आणि हितसंबंध होते, हे माझ्या लक्षात आले. मी माझ्या मतावर ठाम राहिलो आणि या निवडीत कोणताही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झाल्यास थेट कुलगुरूंकडे तक्रार करेन, असा दमच मला संस्थाचालकांना द्यावा लागला ! मग ते नरमले. प्रत्यक्षात मात्र मी निवडलेला उमेदवार तेथे रुजू झाला नाही. अन्य एका जागीसुद्धा त्याची निवड झालेली असल्यामुळे तेथे तो रुजू झाल्याचे समजले. पुढे त्या मुलाची गाठ पडल्यावर मी त्याला विचारले की, “मी निवडलेल्या जागी तू रुजू का बरं झाला नाहीस?” त्यावर त्याने उत्तर दिले की, “सर, मला त्यांनी रुजू करून घेतले असते; पण काही ना काही कारणाने त्रास देऊन तेथे टिकू दिले नसते तर? त्यापेक्षा दुसऱ्या ज्या महाविद्यालयात माझी निवड झाली, तेथील वातावरण चांगले असल्यामुळे मी तेथे रुजू झालो. माझे काहीही नुकसान झाले नाही !” हे ऐकून मलाही हायसे वाटले. मुलाखतीत माझ्या प्रश्नांची उत्तरे देताना ग्रामीण भागातल्या आणि अगदी साधारण परिस्थितीतल्या त्या मुलाने जे अद्ययावत ज्ञान प्रकट केले, त्याचे मला फार कौतुक वाटले होते. पुढे मला हे समजले की, माझे अभ्यासू मित्र डॉ. चंद्रकांत अभंग यांचा तो कॉलेजमधील विद्यार्थी आहे. त्यामुळे मला विशेष आनंद झाला. त्या विद्यार्थ्यांचे नाव होते लहू कचरू गायकवाड. पुढे तो माझ्याकडे पीएच.डी. करण्यासाठी आला, तेव्हा मी इतरांप्रमाणे त्यालाही बजावले की, मी एरवी अगदी गांधीवादी, कळवळामायाळू माणूस आहे; पण संशोधन मार्गदर्शन म्हटले की दया, माया, क्षमा, शांती हे शब्द माझ्या शब्दकोशात नसतात. तुला कसून काम करावे लागेल, कठोर शिस्त पाळावी लागेल, बोलणी खावी लागतील, अक्षरशः घाम निघेल ! व्यावहारिक लाभांच्या मोहाने प्रबंध घाईघाईने सादर करून लवकर पदवी पदरात पाडून घ्यायची असेल, तर त्या बाबतीत निराशा होईल. हे सगळे गृहीत धरून माझ्या मार्गदर्शनाखाली काम करणार असशील, तर ठीक. नीट विचार करून मगच काय तो निर्णय घे.
पण मूळ निर्णय कायम ठेवून लहूने सुमारे आठ-नऊ वर्षे आयुष्यातील एक कठोर तपश्चर्या पार पाडली. त्याच्या जाहीर तोंडी परीक्षेतही त्याची कसून परीक्षा घेतली जाईल, हे मी पाहिले. या साऱ्यांचे योग्य ते लाभ पुढे त्याला सतत मिळत गेले. किंबहुना प्रस्तुत ग्रंथ हेसुद्धा त्याचे एक फलित म्हणता येईल. प्रस्तुत प्रस्तावना लिहिण्याआधी त्याच्या ग्रंथाची कच्ची प्रत वाचतानासुद्धा मी त्याला ज्या किरकोळ चुका दाखवल्या व दुरुस्त्या सुचवल्या, त्यानुसार त्याने तत्परतेने आवश्यक ते बदल केले.
पीएच.डी. करण्याच्या काळात साधनशोधापासून संशोधकीय अर्थनिष्पत्तीपर्यंत आणि वाक्यरचनेपासून तळटिपा देण्याच्या काटेकोर पद्धतीपर्यंत प्रत्येक बाबतीत त्याचे प्रशिक्षण चालू होते. त्याचबरोबरच लेखन व भाषणासाठी मुद्यांची तर्कशुद्ध मांडणी करून एक छोटासा बौद्धिक नकाशा (Cognitive Map) तयार करण्याची शिस्त माझ्याकडून ज्या थोड्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केली, त्यामध्येही लहूचा समावेश होतो.
प्रत्येक व्यक्तीकडे बुद्धी असतेच. व्यक्तिगणिक ती कमी-जास्त असू शकते. पण प्रत्येक व्यक्तीकडून होणारा तिचा वापरसुद्धा कमी-जास्त असतो. त्यामुळे उपजत बुद्धीला कष्टांची जोड देणारे अधिक यशस्वी होतात. लहूचे यश या प्रकारचे आहे. या निर्व्यसनी माणसाला जबरदस्त व्यसन आहे ते पुस्तकांचे ! त्याचे व्यक्तिगत ग्रंथालय जेवढे समृद्ध आहे, तेवढे फारच थोड्या लोकांचे असेल. “आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने” या संत तुकोबांच्या उक्तीचे साक्षात दर्शन लहूच्या स्वकष्टार्जित घरात होते. त्याचे हे वैभव मनाला सुखावून टाकते.
मी पहिल्यांदा त्याचा ग्रंथसंग्रह पाहिला, तेव्हा एका गोष्टीचे विशेष आश्चर्य वाटले. तेथील एक स्वतंत्र कप्पा मी लिहिलेल्या आणि मी त्याला भेट दिलेल्या पुस्तकांचा होता. मी जे जे देत गेलो, ते किती सत्पात्री होते, याचा प्रत्यय मला आला. या सर्व विवेचनातील ‘मी’ विसरून जा ! येथे तो महत्त्वाचा नाही; लहू महत्त्वाचा आहे, त्याचा ग्रंथ महत्त्वाचा आहे. म्हणून यानंतरच्या विवेचनात लहूचा बहुमानार्थी उल्लेख करतो.
प्रा. लहू गायकवाड यांच्या ग्रंथाच्या अनुक्रमणिकेचा विस्तार करून सांगणे मला अभिप्रेत नाही. कारण तसे करण्याने वाचकांचा रस कमी होऊ शकतो. पण या ग्रंथातून लेखकाचे जे गुणवैशिष्ट्ये प्रकट होतात, ग्रंथाची जी वैशिष्ट्ये जाणवतात, त्याविषयी लिहायला हवे.
कृतज्ञता हा सध्या दुर्मीळ होत चाललेला गुण आहे. पण डॉ. लहू यांच्या ठायी माझ्या ठायीची दोनच उदाहरणे देता येतील. “शिवगाथा जीवनगाथा” हा ग्रंथ (जानेवारी २०२१) त्यांनी मला अर्पण केला होता. तसेच जुन्नरवरील प्रस्तुत ग्रंथ त्यांनी विशेष ऋणानुबंध जपणारे जुन्नरचे स्मृतिशेष आमदार लक्ष्मणशेठ ढोबळे यांना अर्पण केला आहे. एखाद्या प्रकल्पाचा भाग म्हणून घेतलेला अभ्यास तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरसुद्धा चिकाटीने करत राहणे, हा डॉ. लहू यांचा आणखी एक गुण . स्वाभाविकपणे पीएचडी पदवीवर ( २०१२ ) गाथा शिवनेरीची व जुन्नर परिसराची या महाराष्ट्र शासनाच्या २०१५ साली प्रसिद्ध झालेल्या २४ मिनिटांच्या लघुपटाची संहिता लिहिल्यानंतर आणि ‘शिवतीर्थाची जीवनगाथा’ (२०१७, २०२१), ‘जुन्नर तालुका पट्ट्याचा नगरीकरण’ (सहलेखक डॉ. श्रीकांत पेंढरकर) (२०१८), ‘नाणेघाट’ (२०२१), ‘शिवजन्मभूमीची आव्हाने’ (२०२३) अशा चार पुस्तकांच्या प्रकाशनानंतर सामान्यतः या मानाने मोठे पुस्तक येणे अपेक्षित होते. त्या दृष्टीने डॉ. लहू गायकवाड यांनी प्रस्तुत ग्रंथ केले आहे. या ग्रंथात इतिहास आणि वर्तमान यांचे जे एकत्रित भान डॉ. लहू गायकवाड यांनी दाखवले आहे, ते उल्लेखनीय आहे.
सातवाहन, अभिर, सिंद, शिलाहार, यादव, बहमनी, मोगल, मराठे, ब्रिटिश आणि स्वतंत्र भारताचे व महाराष्ट्र राज्याचे या सर्वांची जुन्नरच्या इतिहासासंदर्भात ग्रंथात दखल प्रस्तुत ग्रंथात घेतलेली आढळते. तसेच जुन्नरच्या आधुनिक जडणघडणीत बुट्टेपाटील, डेरे, साबळे, बेनके, काळे इत्यादी घराण्यांनी व कुटुंबांनी जे योगदान दिले आहे, त्याची दखल घेतलेली आढळते.
जुन्नरच्या इतिहासाच्या अनुषंगाने महात्मा जोतिबा आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले या फुले दाम्पत्याची जी दखल घेतली आहे, ती मला महत्त्वाची वाटते. जुन्नरचा इतिहास आणि वर्तमानातील एक व्यावहारिक व व्यावसायिक अंग असल्याचे भानही या ग्रंथात विविध ठिकाणी प्रकर्षाने प्रकट होते. बहमनी, मोगल आणि मराठे यांच्या काळात जुन्नर हे कागदनिर्मितीचे केंद्र असल्याची आणि कागझी या कारागिरांच्या वर्गाची खास दखल घेतलेली दखल आढळते.
शासकीय पातळीवर शिवनेरी किल्ला हे शिवजन्मस्थान, ‘राष्ट्रीय स्मारक’ आणि ‘संरक्षित वास्तू’ म्हणून घोषित करण्याचा निर्णय आणि त्याबाबतच्या अधिकृत शासकीय यंत्रणेच्या प्रयत्नांची दखल डॉ. लहू गायकवाड यांनी घेतलेली आहे. इतिहास आणि पर्यटनाच्या माध्यमातून किल्ल्यांचे जे योग्य ते ‘मार्केटिंग’ राजस्थान राज्याने केलेले आहे, ते उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून आपली शासकीय यंत्रणा आणि समाज यांनी एकत्रित पावले टाकण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केली आहे.
शिवनेरीसारख्या किल्ल्यांची जतन आणि संवर्धन हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याचे ते ठामपणे सांगतात. गडावर प्लास्टिक, कचरा व अन्य गोष्टींचे संकट कसे वाढत आहे, याची जाणीव ते व्यक्त करतात. भारतात भूजल विनाशाची समस्या ओढवत चाललेली असून, जनजागृती निर्मावी हा संत ज्ञानेश्वरांचा उपदेश, यादवकालीन ऐतिहासिक बारव स्थापत्य व त्यावर डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी केलेले सखोल संशोधन, रामचंद्र अमात्य यांच्या आज्ञापत्रासारख्या साधन ग्रंथातून दिसून येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जलनीती व त्यांचे गडकोटांवरील जलव्यवस्थापन, जुन्नरमध्ये शाहाजहानचे वास्तव्य असलेला आणि सध्या सुजित मेहेर यांच्या मालकीच्या स्मारकातील अर्धवर्तुळाकृती खापरी नळ. भूगर्भातील जलासंबंधीचे डॉ. पंडित विद्यासागर यांच्या ‘ओवी गाऊ विज्ञानाची’ ग्रंथातील दाखले अशा साऱ्या चर्चेतून डॉ. गायकवाड यांनी केलेली ऐतिहासिक मांडणी वर्तमानातील किती उद्बोधक आहे !
मी आतापर्यंत केलेल्या विवेचनातून ‘असे घडले जुन्नर’ या प्रा. डॉ. लहू गायकवाड यांच्या महाग्रंथाचे महत्त्व वाचकांच्या ध्यानात येऊ शकेल. स्थानिक इतिहास लेखनाचा हा एक वस्तुपाठच आहे. मला याची खात्री आहे की, वाचकांना हा ग्रंथ ज्ञान व आनंद देईल आणि वाचक उत्स्फूर्तपणे त्याचे स्वागत करतील.
प्रा. डॉ. राजा दीक्षित
प्राध्यापक (Emeritus Professor), इतिहास
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
माजी अध्यक्ष आणि प्रमुख संपादक,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
ई-मेल : smrajdixit@gmail.com
मो. ९७६७८८९५५४
जुन्नरच्या इतिहासाला आणि वर्तमानाला एक व्यावहारिक व व्यावसायिक अंग असल्याचे भानही या ग्रंथात विविध ठिकाणी प्रकटले आहे. बहमनी, मोगल आणि मराठे यांच्या काळात जुन्नर हे कागदनिर्मितीचे केंद्र असल्याची आणि 'कागझी' या कारागीरांच्या वर्गाची खास दखल घेतलेली आढळते. शासकीय पातळीवर शिवनेरी किल्ला हे शिवजन्मस्थान 'राष्ट्रीय स्मारक' आणि 'संरक्षित वास्तू' म्हणून जाहीर करण्याचा निर्णय आणि त्याबाबतचा अधिकृत शासननिर्णय यांची पद्धतशीर दखल डॉ. लहू गायकवाड यांनी घेतलेली आहे. इतिहास आणि पर्यटनाच्या माध्यमातून किल्ल्यांचे जे योग्य ते 'मार्केटिंग' राजस्थान राज्याने केलेले आहे, ते उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून आपली शासकीय यंत्रणा आणि समाज यांनी एकत्रित पावले टाकण्याची आवश्यकता त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शिवनेरीसारख्या किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव ते करून देतात, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. गडांवर प्लॅस्टिक, काच, कचरा या गोष्टी टाकू नयेत, याची जाणीव ते व्यक्त करतात. भारतात भूजल विनाशाची समस्या ओढवत चाललीय. 'जलाशये निर्मावी' हा संत ज्ञानेश्वरांचा उपदेश, यादवकालीन ऐतिहासिक बारव स्थापत्य व त्यावर डॉ. अरुणचंद्र पाठक यांनी केलेले सखोल संशोधन, रामचंद्रपंत अमात्य यांच्या 'आज्ञापत्रा' सारख्या साधन-ग्रंथातून दिसून येणारी छत्रपती शिवाजी महाराजांची जलनीती व त्यांचे गडकोटांवरील जलव्यवस्थापन, जुन्नरमध्ये शाहजहानचे वास्तव्य असलेल्या आणि सध्या सुजित मेहेर यांच्या मालकीच्या इमारतीतील अर्धवर्तुळाकृती खापरी नळ, भूगर्भातील जलासंबंधीचे डॉ. पंडित विद्यासागर यांच्या 'ओवी गाऊ विज्ञानाची' या ग्रंथातील दाखले अशा साऱ्या चर्चेतून डॉ. गायकवाड यांनी केलेली ऐतिहासिक मांडणी वर्तमानासाठीही किती उद्बोधक आहे !
प्रा. डॉ. राजा दीक्षित
पुस्तकाचे नाव – असे घडले जुन्नर
लेखक – लहू गायकवाड
प्रकाशक – सनय प्रकाशन मोबाईल 9860429134
किंमत – 1500 रुपये
