कूरः लेखकाची सांस्कृतिक सत्ता ही कोणत्याही प्रकारच्या राजकीय सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी केले.
कोनवडे येथील मातोश्री रेखा दिनकर गुरव राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर, मौनी विद्यापीठ गारगोटीचे प्रा. डॉ. युवराज देवाळे, सुप्रसिद्ध कवी प्रा. डॉ. चंद्रशेखर कांबळे (राधानगरी), प्रकाशक दादासाहेब जगदाळे (इचलकरंजी) हे प्रमुख उपस्थित होते. हा कार्यक्रम राजर्षी शाहू करिअर प्रबोधनीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
डॉ. शिंदे म्हणाले, मातोश्री रेखा दिनकर गुरव साहित्य पुरस्कारांमुळे महाराष्ट्रातील सशक्त व बळकट शब्दांचा गौरव झाला आहे. चांगले साहित्यिक व साहित्यकृतींचा सन्मान होतोय याचा मनोमन आनंद होत आहे. यावेळी साहित्यिक रविंद्र गुरव यांनी साहित्य पुरस्कारांचा आढावा घेतला.
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. इंद्रजित भालेराव (परभणी) यांना शाल, सन्मानचिन्ह व रोख १० हजार रुपये असा मानाचा साहित्यव्रती पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय विविध साहित्यप्रकारांतील उत्कृष्ट साहित्यकृतींसाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. ते असे,
‘पीळ’ या कादंबरीसाठी दिवाकर कृष्ण आचार्य (अकोला) यांना उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार,
‘चित्रक’ या काव्यसंग्रहासाठी श्रीकांत ढेरंगे (पुणे) यांना उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार,
‘काठावरच्या चेहऱ्यांच्या कथा’ या कथासंग्रहासाठी सूरज चौगले (सांगली) यांना उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार,
तर ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ या कवितासंग्रहासाठी प्रतिभा खैरनार (नाशिक) यांना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सर्वाना डॉ. रणधीर शिंदे यांचे हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, सन्मानचिन्ह व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी प्रा. इंद्रजित भालेराव, श्रीकांत ढरंगे, दिवाकर आचार्य यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव, रेखा गुरव, साहित्यिक मारुती मांगोरे, विश्वास पाटील, दत्तात्रय कांबळे, प्रकाश शिंदे, टी. डी. पाटील, विलास पाटील, टी. एल. शिंदे, बी. एस. पाटील, शिवाजी पाटील, ज. रा. पाटील, शिवाजी लोकरे, कपील पाटील, रघुनाथ मोरे यांच्यासह साहित्य क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कवी संजय खोचारे यांनी तर आभार सचिन पाटील यांनी मानले.
