September 8, 2024
Dayasagar Banne Samkalin sahityaswad book publication in sangli
Home » समकालीन साहित्यास्वादमध्ये आस्वादक समीक्षेच्या पलीकडे जाणारे लेखन – डॉ. रणधीर शिंदे
काय चाललयं अवतीभवती

समकालीन साहित्यास्वादमध्ये आस्वादक समीक्षेच्या पलीकडे जाणारे लेखन – डॉ. रणधीर शिंदे

समकालाचे आणि मराठी साहित्याच्या स्वभावाचे प्रातिनिधीक दर्शन देणारे व परिघावरच्या साहित्यिकांना केंद्रस्थानी आणण्याचे काम दयासागर बन्ने यांनी समकालीन साहित्यास्वाद या ग्रंथातून केले असून आस्वादक समीक्षेच्या पलीकडे जाणारे हे या पुस्तकातील लेखन आहे. साहित्यकृतीचा काळाशी परिसराची समाजाशी संबंध काय आहे हे दाखवणारे अधिक समृद्ध समीक्षेकडे जाण्याची आस्वादक भूमिका घेणारे हे पुस्तक महत्त्वाचे आहे. चौकटीच्या मर्यादांचे उल्लंघन करून लेखकांची भूमिका या लेखनकक्षेत आणली आहे. कोरोनासारख्या अस्वस्थ काळात हे केलेले समीक्षेचे लेखन त्यांनी प्रथम समाजमाध्यमावर आणून तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले, असे मत शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख व समीक्षक डॉ. रणधीर शिंदे यांनी व्यक्त केले.

दयासागर बन्ने यांच्या समकालीन साहित्यास्वाद या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वैजनाथ महाजन होते. ते म्हणाले, समकालीन कवितेतील व साहित्यातील योग्य लेखनाची दखल या पुस्तकाने घेतली आहे. चांगलं लिहू इच्छिणाऱ्यांनी इतरांचे वाचले पाहिजे.

वेळीच दखल घेतल्याने लेखकाला हत्तीचे बळ येते. या अर्थाने हे आस्वादक लेखन तळमळीतून आलेले प्रारूप आहे .साहित्याचा आस्वाद घेण्याची प्रवृत्ती समकालीन साहित्यास्वाद या पुस्तकाने निर्माण होईल.

प्रा. वैजनाथ महाजन

प्रारंभी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील यांनी व मान्यवरांनी समकालीन साहित्यास्वाद या पुस्तकाचे प्रकाशन केले. स्वागत कवी अभिजीत पाटील यांनी केले. शब्दसाहित्य विचारमंच व प्रतिभासंगम प्रतिष्ठान यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावेळी बोलताना समीक्षक प्रा.अविनाश सप्रे म्हणाले की, परिसराची व्याप्ती वाढवून महाराष्ट्रातील साहित्यिकांची दखल यापुढे दयासागर बन्ने यांनी घ्यावी. तर डॉ विष्णू वासमकर यांनी या पुस्तकातील साहित्यिकांच्या साहित्य विश्वाचा मागोवा घेतला.

समकालीन साहित्यास्वाद यांनी या पुस्तकातील समीक्षा आस्वादक असली तरी सैद्धांतिक विवेचनही या पुस्तकात आलेले आहे, ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे.

डॉ. विष्णू वासमकर

शिक्षण सभापती आशा पाटील यांनी साहित्यिकांच्यामुळे समाजमन बदलते. भौतिक सुखापलीकडे पाहण्याची कुवत साहित्य देत असते हे या पुस्तकाने दाखवून दिल्याचे मत मांडले. सूत्रसंचालन मनीषा पाटील व नामदेव भोसले यांनी केले.

कार्यक्रमास सुनीता बोर्डे, नामदेव माळी, दि. बा. पाटील, महादेव माने, अनिलकुमार पाटील, गौतमीपुत्र कांबळे, डॉ नितीन नाईक, भीमराव धुळूबुळू , सचिन वसंत पाटील, अर्चना मुळे, स्नेहल गौंडाजे, डॉ. जयश्री पाटील, संतोष काळे, महेश कराडकर, वैभव चौगुले, सुवर्णा पवार, कुलदीप देवकुळे, मुबारक उमराणी, भीमराव कांबळे, वसंत खोत, सुहास पंडित, अरुण बनपुरीकर, प्रतिभा जगदाळे, बाबुराव बन्ने, राहूल कुलकर्णी, आप्पासाहेब पाटील, वंदना हुळबत्ते आदी साहित्यिक उपस्थित होते. आभार गौतम कांबळे यांनी मानले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

तुझ्यामुळेच दरवळला आसमंत….

बा.. निसर्गा….

कोरफड (ओळख औषधी वनस्पतीची)

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading