डॉ. माळी यांनी ‘सुवर्णगंध’ रुपी फुलवलेली ही एक सुंदर बाग आहे. काही व्यक्तिचित्रं ही कथारूप धारण करतात. काही व्यक्तिचित्रणे प्रत्यक्षाहूनही सुंदर झाली आहेत. डॉ. माळी यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि व्यक्तिमत्त्वाचा ठाव घेणाऱ्या लेखन शैलीमुळे हे शक्य झाले आहे. ही मर्मबंधातली ठेव सर्वांना उलगडून दाखविली आहे.
डॉ. प्रकाश दुकळे
मराठी साहित्यात व्यक्तिचित्रणाला एक महत्त्वाचे स्थान आहे. व्यक्तिचित्रणातील व्यक्तीविषयी लेखकाची माहिती व दृष्टिकोनांचे भावसंबंध यांच्या आधारावर वेगळे काही सांगता येते. त्या व्यक्तीबद्दलचे एक वेगळे मूल्यमापन सादर करणे हाही उद्देश असतो. याचे प्रत्यंतर म्हणजे प्राचार्य डॉ. जी. पी. माळी लिखित ‘सुवर्णगंध’ हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह वाचताना लक्षात येते.
‘सुवर्णगंध’ च्या पहिल्या भागात लोकोत्तर पुरुषांच्या व्यक्तिचित्रणावर भर दिला आहे. यामध्ये सावता माळी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा कर्मकांडाला विरोध, विषमतेचा तिरस्कार- समतेचा पुरस्कार आणि त्यांचे पुरोगामी विचार यावर प्रकाश टाकून सद्यस्थितीत दोन्ही व्यक्तिमत्वाच्या विचारांची प्रस्तुतता व्यक्त केली आहे.
पुरोगामी विचारांचे प्रेरणादायी नेतृत्व असणारे शेकापचे नेते भाई दाजीबा देसाई यांचा खडतर प्रवास प्रत्ययकारी शब्दांत रेखाटला आहे. त्यांची वैचारिकता, शिक्षण क्षेत्रातील योगदान, तत्त्वनिष्ठ राजकारणी, आदर्श संपादक अशा अनेक विविध पैलूंना स्पर्श करून दाजीबा देसाई यांचे कर्तृत्व सिद्ध केले आहे. तर डाव्या विचारांचे सच्चे समाजसेवक कोल्हापूर भूषण भाई केशवराव जगदाळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा मर्मग्राही परिचय करून दिला आहे. तसेच प्रा. एन. डी. पाटील यांचे शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक, कार्यकर्ता ते सहकार मंत्री, विधानपरिषद आणि विधानसभेतील त्यांची भाषणे, कर्मवीरांचे कृतिशील वारसदार, विविध पुरोगामी चळवळींचे आधारवड अशा विविध पैलूंचा परामर्श घेऊन एन. डी. पाटील यांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला आहे. ‘आर. आर. म्हणजे प्रहार’ अशी ख्याती असणारे खंबीर नेते आणि पट्टीचे वक्ते लोकनेते आर. आर. पाटील यांचा ध्येयवादी प्रवास कथन केला आहे.
तर दुसऱ्या भागामध्ये आपणास आदर्शवत असणाऱ्या आणि आपले सोबती असणाऱ्या व्यक्तींच्या जीवनावर व्यक्तिचित्रणे रेखाटली आहेत. प्राचार्य डॉ. माळी यांचा साहित्यिक रणजीत देसाई हा आस्थेचा आणि संशोधनाचा विषय आहे. रणजीत देसाई यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, तल्लख स्मरणशक्ती, आकर्षक सुरुवात, परिणामकारक शेवट, समर्पक शीर्षक, मांडणीतले कौशल्य आणि शब्दयोजनेतील सामर्थ्याच्या बळावर साहित्यातले ते ‘दादा’ ठरले. हा समग्र पट मांडून त्यांच्या कलाकृतींकडे समीक्षकांनी दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली आहे. तर डॉ. ल. रा. नसिराबादकर हे एक ध्येयवादी शिक्षक, सर्जनशील लेखक, चिकित्सक समीक्षक, साक्षेपी संशोधक, व्यासंगी संपादक, कर्तव्यदक्ष प्रशासक, प्रभावी वक्ते आणि विचारवंत म्हणून त्यांना प्रतिष्ठा व प्रसिद्धी कशी मिळाली. त्यामुळेच ते एक उपक्रमशील अध्यापक, सहृदय पालक कसे ठरतात. याची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. तसेच शिवाजी विद्यापीठाच्या माजी कुलसचिव डॉ. उषा इथापे यांच्या कुशल प्रशासकीय कारकिर्दीवर वेधक भाष्य केले आहे.
अनाथ म्हणून जन्माला आलेले पण सनाथ नि सार्थकपणे जीवन जगलेले लेखक, संशोधक, संपादक, अनुवादक, समाजसेवक, वक्ते आणि विचारवंत म्हणून ओळखले जाणारे प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा यथोचित गौरव केला आहे.
याबरोबरच प्रतिकूल परिस्थितीतून प्राचार्य पदापर्यंत पोहोचणारे, मैत्रीची बाग सतत फुलत ठेवणारे प्राचार्य डॉ. भालेराव, एक मित्र, सहकारी आणि मार्गदर्शक अशा तिन्हीही भूमिका वटवणारे डॉ. रवींद्र ठाकूर, बहुआयामी सहकारी प्रा.विश्वास तडसरे, मराठीच्या प्राध्यापिका प्राचार्य डॉ. सुलक्षणा दिलीप कुलकर्णी आणि डॉ. अनुराधा प्रमोद कुलकर्णी या दर्जेदार दांपत्यांबरोबर असणारा स्नेहभाव, चिरंतन स्मृतीत राहणाऱ्या डॉ. जयश्री अय्यंगार आणि श्री गीताप्रभू, दिलदार व मनमिळावू शिवबाळ माळी, प्राचार्य डॉ. एकनाथ ढोणे, जातिवंत शेतकरी आणि समाजशील व्यक्तिमत्त्व सिताराम चौगुले, सेवा दलाचे कार्यकर्ते भरत रसाळे अशा कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वांना न्याय देण्याचे प्रामाणिक काम प्राचार्य डॉ. माळी यांनी अत्यंत तरल व भावस्पर्शी शब्दांत केले आहे.
डॉ. माळी यांनी ‘सुवर्णगंध’ रुपी फुलवलेली ही एक सुंदर बाग आहे. काही व्यक्तिचित्रं ही कथारूप धारण करतात. काही व्यक्तिचित्रणे प्रत्यक्षाहूनही सुंदर झाली आहेत. डॉ. माळी यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि व्यक्तिमत्त्वाचा ठाव घेणाऱ्या लेखन शैलीमुळे हे शक्य झाले आहे. ही मर्मबंधातली ठेव सर्वांना उलगडून दाखविली आहे.
डॅा. माळी यांची गुणग्राहकता अशी साक्षेपी आहे की त्यांना सगळे लोक चांगलेच आहेत असे वाटते. त्यांनी निवडलेली व्यक्तिमत्त्वे तर तशी आहेतच. पण इतरेजनांनाही त्यांनी कधी दुखावले नाही. आपल्या सभोवतालच्या आणि इतरही सर्वांकडून चांगले तेच घेणे हा सरांचा स्वभावविशेष आहे.
या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. व्ही. एन. शिंदे म्हणतात त्याप्रमाणे , डॉ. माळी यांचे बहुतांश ग्रंथ हे व्यक्तिचित्रांचे आहेत. ही व्यक्तीचित्रे सहवासात आलेल्या व्यक्तींची आणि त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींची आहेत. ‘सुवर्णगंध’ त्याच मालिकेतील व्यक्तिचित्रांचे पुस्तक वाचकांना आनंद आणि प्रेरणा देणारे ठरेल यात शंका नाही.
पुस्तकाचे नाव – सुवर्णगंध
लेखक – डॉ. जी. पी. माळी
प्रकाशक – अक्षर दालन, कोल्हापूर
मूल्य : ३००
पृष्ठे : २०६

पत्रामागची गोष्ट : सांगे एक छंदिष्ट !