पुणे येथे प्राचार्य डॉ. किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कारांचे वितरण
पुणे – मराठी समीक्षेमध्ये बालसाहित्याची समीक्षा ही नेहमीच उपेक्षित राहिलेली असून आजही ती तुरळक स्वरूपात दिसून येते, असे प्रतिपादन ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे येथे प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. बालसाहित्याकडे पाहण्याचा वाचकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी बाल वाङ्मयाची समीक्षा सातत्याने होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी वाचकांना समीक्षासाक्षर करण्याची गरज आहे; असेही ते पुढे म्हणाले.
भारतातील बालसाहित्यामध्ये बंगाली, मल्याळम या भाषांमध्ये होणारे लेखन अधिक समृद्ध आहे. मराठीत बालकविता लिहिली गेली मात्र बालकादंबरी लिहिली गेली नाही. ती लिहिली जावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना असताना डॉ. आर. एस. माळी यांनी प्राचार्य डॉ. किसनराव पाटील यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कौटुंबिक पैलू उलगडून दाखविले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. आपले अनुभव व्यक्त करत असताना त्यांनी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना शुभेच्छा तर दिल्या. हा पुरस्कार म्हणजे आपल्या साहित्यावर पडलेली मान्यतेची मोहर आहे, इथून पुढे आपला साहित्यिक प्रवास अधिक सुखकर आणि अधिक दर्जेदार होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह डॉ. वि. दा. पिंगळे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पुरस्कारप्राप्त लेखकांना शुभेच्छा दिल्या आणि प्राचार्य डॉ. किसनराव पाटील यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेसाठी दिलेले योगदान विशद केले. जळगाव जिल्हा तसेच विविध तालुक्यांमध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विविध शाखा सुरू करून त्या विस्तारण्यात त्यांचे योगदान अनमोल होते असे प्रतिपादन यावेळी केले.
व्यासपीठावर प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेचे समन्वयक प्रा. डॉ. वासुदेव वले आणि डॉ. अशोक कौतिक कोळी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेचे डॉ. अशोक कौतिक कोळी यांनी केले. तर परीक्षक म्हणून मनोगत आणि भूमिका डॉ. योगेश महाले यांनी मांडली.
यावेळी प्राचार्य डॉक्टर किसनराव पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार डॉ. सुरेश सावंत (नांदेड) यांच्या ‘बालसाहित्यातील नवे काही’ आणि डॉ. अनंता सूर (यवतमाळ) यांच्या ‘साहित्य, समाज आणि विचारधारा’ या समीक्षाग्रंथाला देण्यात आला. तर खानदेशस्तरीय पुरस्कार डॉ. प्रकाश सपकाळे (जळगाव) यांचा ‘समीक्षाविवेक’ आणि डॉ. नरेंद्र बापूजी खैरनार यांचा ‘मंचीय कवितेचा स्वरूपशोध’ या ग्रंथाला देण्यात आला. सन्मानचिन्ह, रोख रक्कम, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी महाराष्ट्रातील भाषातज्ञ डॉ. माधव राजगुरू, ज्येष्ठ निवेदिका डॉ. प्रतिमा जगताप, डॉ. सोपान बोराटे, संजय ऐलावाड आणि साहित्यरसिक तसेच किसनराव पाटील यांचे आप्तेष्ट व कुटुंबीय उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. संदीप माळी तर आभारप्रदर्शन मयूर पाटील यांनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.