July 27, 2024
naam-mantra-meditation-for-spiritual-development-rajendra-ghorpade
Home » नामस्मरणानेच नराचे नारायणात नामांतर
विश्वाचे आर्त

नामस्मरणानेच नराचे नारायणात नामांतर

अवस्था बदलल्यानंतर त्यांचे नामांतर हे होतेच. विशेष पदवी प्राप्त केल्यानंतर नावापुढे त्या पदवीचा उल्लेख होतो ना ? डॉक्टरेट मिळाल्यानंतर डॉक्टर हे विशेषण नावापुढे जोडले जाते ना ? यासाठी या नर देहाचा नारायण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. नामामध्ये हे सामर्थ्य आहे. नामानेच हे नामांतर घडते. यासाठी सतत नामस्मरणात राहायला हवे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।
जेविं दूधचि जाहलिया दहीं । नामरूप जाय ।। १७० ।। ज्ञानेश्वरी अध्याय ८ वा

ओवीचा अर्थ – ते त्या साम्यावस्थेत सम (एकासारखे एक), विषम (एकाहून एक भिन्न) हे काही दिसत नाही. म्हणून त्या साम्यावस्थेस भुते असे म्हणता येत नाही. ते कसे तर ज्याप्रमाणे दुध हे दही झाल्यावर त्याचे दुध हे नाव व पातळपणाचे स्वरुपही जातात.

शून्य समही नाही, विषमही नाही. त्यामुळे त्याला भार नाही. सम अंक ऋण किंवा उणे असू शकतो. पण शून्य दोन्हीही नाही. स्थिर आहे. मध्य आहे. अशी ही शुन्यावस्था आहे. येथे विचार थांबलेले असतात. अस्थिरता, चलबिचलता नसते. कमी-जास्तपणा नसतो. उच-नीच भेद नसतो. ही अवस्था नेहमीपेक्षा वेगळी आहे. एकदा या अवस्थेला पोहोचल्यानंतर पुन्हा माघारी येणे नाही.

दूध नाशवंत आहे. ते एकदोन दिवस उत्तम प्रकारे राहू शकते. त्यानंतर मात्र ते उत्तम राहील का ? हे सांगता येत नाही. यासाठी ते वेगळ्याप्रकारात रूपांतरित करणे गरजेचे असते. दुधाचे विरजण लावून त्यापासून दही केले जाते. दुधाचे दही झाले. अवस्था बदलली. तसे त्याचे नावही बदलले. आता दह्याला कोणी दूध म्हणेल का ? उसाच्या रसापासून साखर तयार केल्यानंतर पुन्हा साखरेपासून ऊस तयार करता येत नाही. ही रासायनिक प्रक्रिया आहे. एखाद्या घटकाचे रूपांतर दुसऱ्या घटकांत झाल्यानंतर पुन्हा पहिल्या घटकांत त्यांचे रूपांतर करता येत नाही. त्यामुळे त्याचे नावही बदलते.

पहिलीची परीक्षा पास झाल्यानंतर दुसरीच्या वर्गात जाता येते. नापास झाला तर मात्र पहिलीच्या वर्गातच ठेवले जाते. पण एकदा दुसरी, तिसरी, चौथीत गेल्यानंतर पुन्हा कोणी पहिलीमध्ये बसवेल का ? तसे होत नाही. कारण त्या सर्व इयत्तांचा अभ्यास त्याने योग्य प्रकारे पूर्ण केलेला असतो. म्हणूनच पुढच्या इयत्तांत प्रवेश दिला जातो. तसेच अध्यात्माचे आहे. एक-एक इयत्ता पास व्हायचे असते. सद्गुरू परीक्षा घेत असतात. त्यातून पास होत राहायचे असते.

गुरूच प्रश्न करतात, गुरूच उत्तर देतात. हळूहळू साधकामध्ये ते विकास घडवत असतात. नराचा नारायण ते करतात. मग एकदा ब्रह्मत्वाला पोहोचलेल्या व्यक्तीला सर्वसामान्य कोणी म्हणेल का ? कारण त्या व्यक्तीची अवस्था बदललेली असते. त्याचा विकास झालेला असतो. तो त्या पदाला पोहाचलेला असतो. आता तेथून पुन्हा माघारी येता येत नाही. वाल्ह्याकोळीचा वाल्मीकी झाल्यानंतर आता त्यांना वाल्ह्याकोळी कोणी म्हणते का ? उलट त्यांना वाल्मीकी ऋषी म्हटले जाते. योग्य तो मान-सन्मान दिला जातो.

हे सर्व सद्गुरूंच्याकृपेने होते. दुधाचे विरजन लावावे लागते. तरच दही होईल. तसे सद्गुरुंचा मंत्र म्हणजे दुधात घातलेले विरजण आहे. याशिवाय दही होत नाही. यासाठी त्यांची कृपा होणे गरजेचे आहे. कृपेने अवस्थेत बदल होतो. ते भक्ताला त्यांच्या अवस्थेत आणतात. अवस्था बदलल्यानंतर त्यांचे नामांतर हे होतेच. विशेष पदवी प्राप्त केल्यानंतर नावापुढे त्या पदवीचा उल्लेख होतो ना ? डॉक्टरेट मिळाल्यानंतर डॉक्टर हे विशेषण नावापुढे जोडले जाते ना ? यासाठी या नर देहाचा नारायण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. नामामध्ये हे सामर्थ्य आहे. नामानेच हे नामांतर घडते. यासाठी सतत नामस्मरणात राहायला हवे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

ग्रामीण जीवनातील साद पडसादांचा लेखाजोखा मांडणारी कादंबरी – राशाटेक

पुस्तकांनी काय शिकवलं ?

आत्महत्येपेक्षा कधीही वीरमरण श्रेष्ठ

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading