कोणतेही वाचन करताना त्याचा अर्थ समजत नसेल तर त्या वाचनाचा फायदा हा शुन्यच असतो. अभ्यासाला बसून कधी अभ्यास होत नसतो. अभ्यास करताना आपले लक्ष त्या अभ्यासात असायला हवे. तरच त्या अभ्यासातून योग्य यश प्राप्त होईल. अभ्यास करताना मन इतरत्र भरकटत असेल तर मनाला नियंत्रित करण्यासाठीचा अभ्यास हा करायला हवा. त्यामागचे शास्त्र समजून घ्यायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
कर्म होतचि असे तेव्हांही । परी तें होणे नव्हे पाही ।
तो अन्यायो गा अन्यायीं । हेतु जाणावा ।। ३७६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – तेंव्हा देखील कर्म होतेंच, परंतु तें कर्मांचे ( योग्य ) होणे नव्हे. पहा, तो अन्याय मार्ग आहे व तो अन्याय कर्मालाच हेतु आहे, असे समजावे.
पालथ्या घड्यावर पाणी घालून काय फायदा आहे का ? तो घडा कधी भरणार आहे का ? कोणतेही कर्म करताना हा विचार करायला नको का ? कर्मासाठी आवश्यक शास्त्रोक्त कृती करायला नको का ? घडा भरायचा आहे, मग घडा भरण्यासाठी तो कसा ठेवायला हवा याचे शास्त्र जाणून घ्यायला नको का ? घडा व्यवस्थित ठेवला तरच तो भरला जाईल. अन्यथा तो कधीही भरणार नाही. केलेले सर्व श्रम वायाही जाणार आहेत. म्हणजे जे कर्म करायचे आहे. ते योग्यप्रकारे होण्यासाठी त्याचे शास्त्र जाणून घ्यायला हवे. अन्यथा त्या कर्माचा कोणताही लाभ होत नाही.
ज्ञानेश्वरीचे पारायण करताना लक्ष ज्ञानेश्वरीत नसेल तर त्या वाचनाचा काही फायदा आहे का ? वाचायला बसल्यानंतर लक्ष हे ज्ञानेश्वरीतच असायला हवे. त्या ओव्या समजत नसतील तर त्याचे अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. तरच त्या वाचनाचा फायदा आहे. कोणतीही कृती करताना त्यासाठी होणारे श्रम हे वाया जाणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. योग्य प्रकारे वाचन केल्यास त्याचा लाभ निश्चितच होतो. समजत नाही म्हणून ते सोडूनही देऊ नये. वाचत राहावे. वाचता वाचता त्यातील अर्थ बोध व्हायला लागतात. बोध होण्यासाठी आवश्यक कर्म हे करायला हवे. त्यासाठी मनाची तयारी ही करायला हवी. अन्यथा हजारो पारायणे करूनही काहीच फायदा नाही. हे लक्षात घ्यायला हवे. एखाद्या ओवीचा बोध जरी झाला तरी ते पारायण सफल झाले असे समजावे. बोधासाठी, अनुभुतीसाठी ज्ञानेश्वरी पारायण हे करायलाच हवे. ओवीचा अर्थ प्रथम समजणार नाही पण ती समजून घेण्याची इच्छा मनात उत्पन्न व्हायला हवी तरच त्या वाचनाचा फायदा होईल.
कोणतेही वाचन करताना त्याचा अर्थ समजत नसेल तर त्या वाचनाचा फायदा हा शुन्यच असतो. अभ्यासाला बसून कधी अभ्यास होत नसतो. अभ्यास करताना आपले लक्ष त्या अभ्यासात असायला हवे. तरच त्या अभ्यासातून योग्य यश प्राप्त होईल. अभ्यास करताना मन इतरत्र भरकटत असेल तर मनाला नियंत्रित करण्यासाठीचा अभ्यास हा करायला हवा. त्यामागचे शास्त्र समजून घ्यायला हवे. मन इतरत्र भटकते म्हणजेच आपणाला त्या अभ्यासाची गोडी नाही. ही गोडी निर्माण व्हावी यासाठी प्रथम त्याचे शास्त्र समजून घ्यायला हवे. अभ्यास करताना त्या मागचे असणारे शास्त्र समजून घ्यायला हवे. त्याचे फायदे विचारात घेऊन अभ्यास हा करायला हवा. अभ्यास करण्याचीही हातोटी आहे. त्यानुसार अभ्यास केल्यास परिक्षेत यश निश्चितच प्राप्त होते. यासाठी ही हातोटी समजून घेऊन कर्म करायला हवे.
साधना करताना, मंत्रोच्चार करताना ते शास्त्रोक्त पद्धतीनेच करायला हवेत. आवाज हा बेंबीच्या देठापासून यायला हवा असे म्हटले जाते त्यामागील शास्त्र हे समजून घ्यायला हवे. मंत्रोच्चाराचे फायदे करून घेण्यासाठी हे सर्व करायलाच हवे. अन्यथा हजारो माळा जप करूनही सर्व व्यर्थ आहे हे लक्षात घ्यायला हवे. एकमाळ मनापासून केली तरी त्याचा फायदा होतो. पण ती शास्त्राला धरून करायला हवी. साधनाही शास्त्राला धरून करायला हवी. कोणतेही कर्म करताना त्यामागचे शास्त्र प्रथम जाणून घ्यायला हवे व मगच ते कर्म करायला हवे. तसे केल्यास योग्य फळ मिळेल. अन्यथा केलेले सर्व श्रम हे वाया जाणार आहेत हे नित्य स्मरणात ठेवायला हवे.
