April 25, 2024
reason-behind-land-slice-incidece-article-by-v-n-shinde
Home » दरडी का कोसळतात?
काय चाललयं अवतीभवती

दरडी का कोसळतात?

२०२२ साल ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञाना’चे वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवणे होय. रस्ते आणि लोहमार्ग बनवताना निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचावी म्हणून अवजड यंत्राऐवजी जास्त मनुष्यबळ वापरायला हवे.

डॉ. डॉ. व्ही. एन. शिंदे,
उपकुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

मागील काही वर्षांपासून दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. यावर्षीही पावसाळा सुरू झाला आणि दरडी कोसळण्याच्या बातम्या यायला लागल्या. लाल मातीच्या सह्याद्रीच्या डोंगररांगात, कोकणात हे प्रमाण जास्त आहे. दरड कोसळली की महामार्ग, रेल्वे वाहतूक थांबते. वाहने जाताना दरड कोसळून जिवीतहानी, संपत्तीचे नुकसान होते. माणसाची काही काळासाठी का होईना, त्या मार्गावरील गती थांबते. त्यामुळे दरड कोसळली की माध्यमे मोठ्या बातम्या प्रसिद्ध करतात. भविष्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढच होण्याची शक्यता आहे. म्हणूनच दरड का कोसळते? हे समजून घेणे आवश्यक आहे.

दरड म्हणजे डोंगराची तिव्र कडा. असे नैसर्गिक तिव्र कडे फारच कमी असतात आणि आहेत त्या कठीण दगडांच्या. डोंगर फोडून लोहमार्ग किंवा रस्ता बनवताना, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दरडी तयार होतात. किमान एका बाजूला दरड राहते. डोंगरातून रस्ते बनवताना बहुतांश दरडी तयार झाल्या आहेत. दरडी नैसर्गिक आणि कृत्रीम कारणांनी कोसळतात. भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी जमीन खचते म्हणजेच भूस्खलन होते. अशा भूस्खलनावेळी दरड नैसर्गिकरित्या कोसळते. अशा घटना अपवादात्मक आहेत. मोठ्या प्रमाणात मातीचा ढीग किंवा खडक फुटून कडा कोसळतो, त्यास दरड कोसळणे म्हणतात. नैसर्गिकरित्या कठीण पाषाणात असणाऱ्या भेगा किंवा फटी असतात. उन, वारा पाऊस यांचा परिणाम होऊन खडकाचे तुकडे होतात. या भेगा वाढून त्यामध्ये पाणी साठले की दगडाचे किंवा भूभागाचे वजन वाढते आणि तो खडक उताराच्या बाजून घसरतो. ही नैसर्गिक दरड कोसळण्याची प्रक्रिया असते.

सध्या दरड कोसळल्याच्या येणाऱ्या बातम्या या कृत्रीम कारणांनी दरड कोसळल्याच्या आहेत. काही वर्षांपूर्वी माळीण गाव पूर्ण गाडले गेले होते. ती घटना सुरुवातीला नैसर्गिक मानली जात होती. मात्र ती घटनासुद्धा कृत्रीम कारणाने घडली होती. माणसाचा निसर्गातील अवाजवी हस्तक्षेप आणि विकासाच्या चूकीच्या पद्धतीमुळे या घटना घडतात. निसर्गात आढळणाऱ्या सर्व पदार्थांना एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य करणारी बले असतात. एकाच प्रकारच्या रेणूंना किंवा अणूंना संसजी (cohesive) बले बांधून ठेवतात. पाणी आपणास द्रव रूपात मिळते कारण पाण्याच्या रेणूंमध्ये संसजी बल असते. सोन्याचे दागीने बनवता येतात कारण त्याच्या अणूंमध्ये संसजी बल पाण्यापेक्षा जास्त असते. दोन भिन्न प्रकारच्या रेणूंमध्ये असंसजी (Adhesive) बल असते. या बलांमूळे पाण्याचे रेणू पात्राला चिकटून राहतात. असंसजी बलामूळे दगड आणि माती एकत्र राहतात. संसजी किंवा असंसजी बल जितके जास्त असेल तितका तो पदार्थ कठीण बनतो. मातीमध्ये असणाऱ्या कणांमध्ये संसजी बल कमी असल्याने मातीचे कण सहज वेगळे होऊ शकतात. दगडाच्या कणातील बल मातीपेक्षा जास्त असल्याने दगड कठीण असतो. दगड आणि माती यांनी बनलेल्या दरडी कोसळण्याची शक्यता जास्त असते. कठीण खडकांच्या दरडी कोसळण्याची शक्यता कमी असते.

माती आणि दगडातील संसजी आणि असंसजी बले जास्त नसले तरी अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी स्थीर पडलेले असते. त्यावर उगवलेले गवत मातीला आणि झाडांची मूळे दगड, मातीला घट्ट पकडून ठेवतात. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या उतारावरून पावसाचे पाणी वाहून जाते. त्यामध्ये मातीचा अंश फार कमी असतो. मात्र मानवाने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली. शेतीसाठी डोंगर माथ्यावरील झाडे तोडली. गवताचे आवरण नष्ट केले. डोंगरमाथ्यावरील बांधामुळे माथ्यावर पाणी साठू लागले. हे पाणी डोंगरावर असणाऱ्या भेगांमध्ये मुरते. या पाण्यामुळे माती सुटी होते कारण माती आणि पाण्याच्या रेणूमध्ये असंसजी बल दगड आणि मातीतील बलापेक्षा जास्त असते. दगडाला पकडून ठेवणारी माती सुटी झाली की दगड गुरुत्कार्षण बलामुळे चिखलात रूतायला सुरुवात होते आणि दगड माती सगळे काही गुरुत्वीय बलांमुळे खाली घसरत येते आणि दरड कोसळते.

रस्ते बनवताना, लोहमार्ग तयार करताना कमीत कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी जास्त ताकतीची यंत्रे वापरण्यात येतात. या यंत्रांच्या बसणाऱ्या धक्क्यामुळे दरड तयार होताना, दरडीमध्ये असणाऱ्या दगड आणि मातीमध्ये भेगा पडतात. या भेगांमधून पाणी मुरते आणि पावसाळ्यात दरडी कोसळतात. जेथे दगड आणि मातीच्या दरडी असतात, तेथे काँक्रीट आवरण घालून धोका कमी करणे आवश्यक बनते. २०२२ साल ‘शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञाना’चे वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. शाश्वत विकास म्हणजे निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवणे होय. रस्ते आणि लोहमार्ग बनवताना निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचावी म्हणून अवजड यंत्राऐवजी जास्त मनुष्यबळ वापरायला हवे.

Related posts

गाडगेबाबांच्या जीवनकार्याचे यथार्थ विवेचन

अर्ध सैनिक दलातील संधी…

ट्रॅडिशनल हर्बल ड्रग्ज पुस्तकातून आदिवासी वैदुंच्या ज्ञानाचे संवर्धन

Leave a Comment