पुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ…
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी
श्री अथर्व प्रकाशन, १५७, साळोखेनगर, कोल्हापूर ४१६००७. मोबाईल – ९०११०८७४०६
कोरोनाने जगण्यांचे संदर्भ बदलून टाकले. परिवर्तनाची दिशा बदलली. आर्थिक गणित सोडवताना माणसांची घुसमट झाली. माणूस माणसातही आला आणि माणूस माणसांपासून दूरही गेला. याचे संचीत माडणारी ही कोविड १९ कविता आहे.
प्रा. रामदास केदार
उदगीर
डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे व डॉ. म. ई. तंगावार यांनी कोरोनाच्या महामारीतही वेगवगळा दखलपात्र उपक्रम राबवून तरुणांना लिहतं व बोलतं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच काळात महाविद्यालयीन स्तरावर संपूर्ण महाराष्ट्रातील तरूण तरुणींसाठी ‘कोरोना काळातील घडामोडी’ या विषयावर काव्यलेखन स्पर्धा घेतली. त्यातील ५८ निवडक कवितांचा हा संपादनरुपात ‘कोविड १९’हा कवितासंग्रह प्रकाशित केला. हा खरा कोरोना काळातील तरुणाईंच्या भावविश्वातून साकारलेला दस्तऐवजच आहे. यातील कवी हे महाविद्यालयीन वयातले आहेत. आजवर इतरांच्या कवितेचा अभ्यास करणारी ही मुलं आज यांना व्यासपीठ मिळवून दिल्याने स्वतः व्यक्त झाले आहे. आपल्या भावना कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच ही स्पर्धा आणि स्पर्धेतून साकारलेल पुस्तक दखलपात्रच ठरणार आहे.
जगभरात पसरलेल्या कोरोना महामारीने माणसाला पोखरून टाकले. मंदिरांचे दरवाजे बंद झाले. माणूस माणसांकडे येऊ नये म्हणून गल्लोगल्ली काटे कुपाट्या लावण्यात आले. कडब्यांच्या पेंढ्या पडाव्यात तशा माणसांच्या मुडद्यांचा ढीग पडू लागला. गावातल्याच माणसाला गावात येण्यास बंदी. अॅम्बुलन्सचा आवाज कानावर पडला की, दुरडीतल्या भाकरीही गोड लागायची नाही. लॉकडाऊनच्या काळात झालेली ही अवस्था या कोरोनाने करुन टाकली. शाळेच्या मैदानात व घरांच्या अंगणात मुक्तपणे खेळणारी मुले कोरोनाच्या भीतीने घराच्या कोपऱ्यात बंदिस्त झाली. या झालेल्या घडामोडी तरुणांनी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांना लिहिता येते, व्यक्त होता येते. हा कवितासंग्रह वाचल्यानंतर कळते. मुलं मुली किती छान लिहू शकतात.
पुणे येथील नाईकबा गिड्डे यांची पहिली कविता ही कोरोनाची साखळी तू जोडू नको. तू थांब तरच जग थांबू शकते, अशी आर्त हाक माणसाला देणारी आहे. ‘चांगले दिवस नक्की येतील’ ही अंकिता गव्हाणेची कविता आहे.
असो किती मोठा
किंवा असो किती लहान
पण जो घरात बसेल
तोच ठरेल महान
कोरोना आला आणि भलताच कहर केला. बाजारपेठे आणि शहरं ओस पडली. गरिबांचे हाल केलास आणि श्रीमंताना हात टेकायला लावलास. धावणाऱ्या विश्वाला तू थोपवलास. असा कसा रे तू कोरोना ? आलास तसा परत जा अशी भावना कवितेतून व्यक्त करते.
ध्यानी मनी नसताना
असा कसा रे तू आला
तुझ्या येण्याने तर
भलताच कहर झाला
हात टेकले श्रीमंतांनी
गरिबांचे हाल झाले
थाट विरला श्रीमंतीचा
कामगारांचे काम गेले.
जगभरात पसरलेल्या कोरोनांशी आपण दोन हात करु आणि या निमित्ताने आपल्या गावी, आपल्या घरी आजी आजोबा, कुटूंबासोबत आनंदाने खेळू या. अनेक वर्ष शहरात गेलेली माणसे आपल्या गावी आली आणि गाव, घर गजबजले आहे. अशी भावना अजित आडेकर यांनी व्यक्त केली आहे. गावाकडे येऊन बिनकामाची पोरं कामे करु लागली, असे बालाजी उजणे लिहितो.
कोरोना आला पण माणसाला माणुसकी शिकवून गेला असे ठाणेची हीनल कुंभार म्हणते.
कोरोना आला पण,
माणुसकी शिकवून गेला
टाळेबंदीत ऑनलाईन शिक्षणाने मुलांचे खूप वाटोळे केले, ही भावना नांदेडची जयश्री गायकवाड हीने व्यक्त केली. कोरोनामुळे मोठा बदल झाला ही खंत सारिका गायकवाड व्यक्त करते. तर बंदिस्त वेळ जीवन कसं जगायचं ते शिकवते. हे उदगीरची सारीका दापकेकर हीने लिहलं आहे. विज्ञानच श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी तू कोरोना होऊन आलास. असे अमरावतीच्या गौरी पेंडसेला वाटते. हा तर निसर्गाचा नवा अवतार आहे. असे सांगलीच्या वैशाली मोहिते हीला वाटते.
कोरोनाशी लढून आपण आपला देश सुरक्षित करूया. हिम्मत धरुया. तरच आपण जगू शकतो असे उमेश राजभोजला वाटते. कोरोनाच्या या बिकट अवस्थेला न घाबरता डॉक्टरांनी कशी देवतारुपी दूत बनून रुग्णांची सेवा केली. डॉक्टर म्हणजे देवतारुपी दूतच आहेत असे अमरावतीच्या शिवानी श्रीरावला वाटते. तर अशाही संकटाला सामोरे जाणारा विशाल हृदयाचा जिद्दी भारत आहे असे पुणेच्या विशाल थोरातला वाटते.
कोणी रस्ता तर
कोणी दवाखान्यात पाहिला देव
दोन घास कमी जेव पण
मित्रा त्याची जाणीव ठेव
कोरोनाने माणूस माणसांत राहिला नाही, अशी भावना अमोल वाघमारे यांनी व्यक्त केली. यातील प्रत्येक नवख्या तरुण कवी आणि कवियत्रीने आपापल्या कोरोना काळातील भावना टिपलेल्या आहेत. या कोरोनाने जगण्यांचे संदर्भ बदलून टाकले. परिवर्तनाची दिशा बदलली. आर्थिक गणित सोडवताना माणसांची घुसमट झाली. माणूस माणसातही आला आणि माणूस माणसांपासून दूरही गेला. याचे संचीत माडणारी ही कोविड १९ कविता आहे. कवी दासू वैद्य यांची पाठराखण आहे. बीज प्रकाशनाने या संपादन संग्रहातीची सुंदर निर्मिती केली आहे. एक वेगळा उपक्रम डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे व डॉ. म. ई. तंगावार यांनी राबवून या तरुणांना लिहितं केलेले आहे.
पुस्तकाचे नाव – कोविड -१९
संपादक – डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे, डॉ. म. ई. तंगावार
प्रकाशक – बीज प्रकाशन, शेगाव
पृष्ठे – ८३ मूल्य – २०० रुपये
पुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ… पुस्तके पाठविण्याचा पत्ता – राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी श्री अथर्व प्रकाशन, १५७, साळोखेनगर, कोल्हापूर ४१६००७. मोबाईल – ९०११०८७४०६
2 comments
मला कोविड १९ हे कवितासंग्रह मिळेल का
खूप सुंदर मनाला भावणारया कविता👌👌👍👍