घरात धान्य साठविताना काळजी घ्या
🍪🌱🍪🌱🍪🌱🍪🌱🍪🌱🍪
धान्य साठवताना कोणती काळजी घ्यायला हवी ? सध्या कोणत्या पद्धती प्रचलित आहेत ? या पद्धती कशा घातल आहेत ? यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी ? यावर कृषी विज्ञान केंद्राचे (कोसबाड हील, ता. डहाणू, जिल्हा पालघर) पीक संरक्षण तज्ञ प्रा. उत्तम सहाणे याचा लेख…
आपण खेड्यात राहत असू की शहरात, आपल्याला काही दिवस पुरेल इतके गहू, तांदूळ तसेच कडधान्य आपण घरात साठवून ठेवत असतो. आणि गरजेप्रमाणे त्याचा वापर करतो. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. या काळात हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढते म्हणून कीटकांचे प्रजजन जलद होऊन धान्याला किडी लागतात आणि धान्य खराब होते. किडींमध्ये सोंडे किडा, सुरसा, पांढरी अळी, पाकोळी, म्हैस किडा, इत्यादी अनेक प्रकारचे कीटक धान्याचे नुकसान करतात.
सध्या याचे नियंत्रण कशा प्रकारे केले जाते?
१) बाजारात सेल्फोस टॅबलेट मिळतात याचा उपयोग कोठीतील ध्याण्यात केला जातो. हे कीटकनाशक कोठीत टाकून बंद केले म्हणजे कोठीच्या आतील तापमान वाढते आणि विषारी वायू तयार होतो. या वायूने आतील सर्व प्रकारचे कीटक मारले जातात.
२) बाजारात बोरीक पावडर मिळते. ही पावडर धान्यात मिसळली म्हणजे कीटकांच्या खाण्यात येऊन कीटक मरतात.
हे दोन्ही उपाय करायला सोपे आहेत आणि लोक सर्रास याचाच वापर करतात. लक्षात ठेवा हे दोन्ही उपाय सोपे असले तरी मानवाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहेत, त्यामुळे याचा उपयोग करणे तात्काळ बंद करा…..
का ते आपण पाहू या
पहिल्या उपयात सेल्फोस टॅबलेट सांगितले. त्यातून फॉस्फिन नावाचा विषारी वायू तयार होतो जो हवेपेक्षा जड आहे. म्हणून सतत घरात जमिनीच्या समांतर राहतो. रात्री झोपताना आपण खिडक्या दारे बंद करतो. त्यावेळी आपल्या श्र्वासातून हा विषारी वायू आपण आत घेत असतो. त्याचा परिणाम लगेच नाही पण काही दिवसांनी जाणवतो. आपली प्रतिकार शक्ती कमी कमी होत जाते आणि आजार वाढतात.
दुसऱ्या उपायात बोरीक पावडर सांगितली आहे. बोरीक पावडर म्हणजे बोरीक असिड असून ते धान्यासोबत आपल्या शरीरात जात असते. आणि त्यातून क्रॉनिक टॉक्सिसिटी म्हणजे स्लो पोईझन आपल्या शरीरात जात असते. म्हणून हे दोन्ही उपाय करू नये असा सल्ला दिला आहे.
काय केले पाहिजे?
पूर्वीच्या काळी धान्य साठवायला कणगी असायची, त्याला देशी गाईचे शेण गोमुत्र ने सारवले जाई. धान्य साठविण्याआधी कनगीला मिरची आणि लसूणची धुरी दिली जात असे. त्यामुळे किडी चार हात लांब राहत होत्या. शिवाय धान्य साठविताना करंज पाला, कडुनिंब पाला टाकला जायचा.
सध्या काय करायला हवे?
१) धान्य मे महिन्याच्या उन्हात चांगले वळवून घ्यावे. यामुळे धान्यात आधीच असलेले कीटक आणि अंड्यांचा नाश होईल. धान्यतील आर्द्रता कमी झाली की कीटकांचा प्रादुर्भाव कमी होतो.
२) धान्य साठवत असताना त्यात कापडाच्या पिशवीत बांधलेला वाळलेला पाला टाका.
या पिशवीत पाला कोणता असावा? कडुनिंब, करंज, घाणेरी या वनस्पतीचा पाला आधीच एक दिवसाच्या उन्हात वळवून कापडी पिशवीत बांधून ठेवावा. ही पिशवी धान्य साठविताना धान्यात टाकावी. यामुळे नुसता पाला टाकल्यावर आधी जो कचरा व्हायचा तो यात होत नाही.
हा प्रयोग कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड येथे केला असून त्याचे खूप छान निष्कर्ष दिसले आहेत
३) डाळी (चना, हरबरा, मूग, उडीद इत्यादी) डब्यात ठेवताना त्याचे झाकण चांगले बसवा. म्हणजे कीटकांचे पतंग अंडी घालायला आत जाणार नाहीत.
४) डाळींना हलके खाद्य तेल चोळले म्हणजे कीटकांच्या मादीला यावर अंडी घालता येत नाही.
५) कडधान्याला गौरीची राख चोळली तर कीड लागत नाही. हा प्रयोग बियाणे साठविताना अवश्य करावा.
हे प्रयोग करून बघा. नक्कीच यश येईल.
एक पाऊल विषमुक्त अन्नाकडे….