April 20, 2024
vehicle-maintenance-needed-to-avoid-accident
Home » वाहनाची तंदुरुस्ती… पुढे धोका आहे !
विशेष संपादकीय

वाहनाची तंदुरुस्ती… पुढे धोका आहे !

वाहनाची स्थिती महत्वाची कारण ते यंत्र आहे. त्याचा सजग वापर आपण केला तरच आपण सुरक्षित…अन्यथा पुढे धोका आहे.

प्रशांत दैठणकर

रस्ते आणि सुरक्षितता याचा संबंध ठेवला नाही तर अपघात वाढणार आणि जगात सध्या सर्वच ठिकाणी असे घडताना आपण बघत आहोत. अपघात ही एक आपत्ती असं म्हणता येईल पण ही मुख्यत: मानव निर्मित आपत्तीत सामील करावी लागेल. आपण वाहन रस्त्यावर उतरविण्याच्या आधी त्याची योग्य किंवा अयोग्य अशी तपासणी करतो का ? अर्थातच या प्रश्नाचे उत्तर नाही असेच असणार याची खात्री देता येईल.

सध्याच्या पिढीची स्थिती म्हणजे मी वाहन चालवण्यात इतका व्यस्त आहे की मला वाहनात इंधन भरायला वेळच नाही अशी काहीशी आहे. यातील गंमतीचा भाग बाजूला ठेवला तरी आपण आपल्याला इतकं व्यस्त केलं आहे की आपल्याला खूप धावपळ करावी लागते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनशैलीवर झालेला दिसतो.

वाढत्या शहरीकरणामुळे शहरे विस्तारत आहेत. त्यात लोकसंख्या वृध्द सोबत सार्वजनिक परिवहन व्यवस्थेची कमतरता देखील आहे. सोबत कोरोना नंतर आता लोकांमध्ये मिसळण्यास लोक टाळतात याचा परिणाम स्वत:चे वाहन खरेदी करुन प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढण्यात झाला आहे.

वाहन संख्या झपाटयाने वाढत आहे त्या तुलनेत रस्त्यांचे जाळे विस्तारलेले नाही परिणामी वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ यात सातत्याने वाढे होत आहे. या वाहनांच्या गर्दीत वाहनांचा धूर, त्यामुळे होणारे प्रदुषण त्यातच विनाकारण जोरात हॉर्न वाजविणारे व त्याने वाढलेले ध्वनी प्रदूषण याचा थेट परिणाम मानवी मनावर होतो. त्यात वाहन स्थितीकडे लक्ष न दिल्याने नादुरुस्त होणारी वाहने या सर्वांचा संयुक्त परिणाम अपघातामध्ये होतो.

सुरक्षितता हा आपल्या शिस्तीचा विषयय आहे. आपण वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी त्याचे ब्रेक, क्लच व्यवस्थित आहेत का याची तपासणी करणे, इंधन पुरसे आहे का याची पडताळणी करुन वाहन घरातून रस्त्यावर आणल्यास आपणास काही प्रमाणात तणावमुक्त होवून वाहन चालवता येते.
रात्री वाहन रस्त्यावर आणण्यापूर्वी हेड लाईट, टेल लॅम्प तसेच इन्डीकेटर व्यवस्थित काम करतात की नाही याची खात्री अवश्य करावी. वाहनाला रि फ्लेक्टर देखील आवश्यक असतात याचीही आपणास जाणीव हवी. हा देखील एक वाहन चालविण्यातील शिस्तीचाच एक भाग आहे.

रस्त्यावर बिना हेडलाईट चाललेली अनेक वाहने आपण बघतो. हे वाहनचालक स्वत:सह इतरांच्या जीवाला धोका वाढवितात… टेल लॅम्प नसला तरी चालतं अस म्हणतं रस्त्यावर वाहने दामटविणारे हजारो सापडतील. इथ त्या वाहनाला मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्यावर कळतं की पैसा महत्वाचा नाही त्यापेक्षा प्राणाचे मोल अधिक आहेत.

वाहन तंदुरुस्त हवे असेल तर त्याला वेळोवेळी सर्व्हिसिंग आवश्यक असते. यातूनही अपघातचा धोका टाळता येतो. वाहन ऐन आणिबाणीच्या प्रसंगात ब्रेक लागले नाही म्हणून अपघात झाला असे किस्से सांगितले जातात वाहन वेळेवर सर्व्हिंसिंग केल्यास या तांत्रिक बाबी आपणास सहज कळतात व वेळीच उपाय केल्याने सुरक्षितता देखील वाढत असते.

गरज लागेल त्यावेळी वाहन आपण वापरतो अशात नेमकेपणाने किती जण वाहनाच्या चाकातील हवेचा दाब योग्य आहे की नाही याची तपासणी करतात. ही देखील सातत्याने करण्याची बाब आहे. दिवस आणि रात्री वेगवेगळे तापमान असते त्याचा चक्रातील हवेवर परिणाम होत असतो. सतत लांब पल्ल्याचा प्रवास करताना चाकाच्या रस्त्यावरील घर्षणाने चाकातील हवा प्रसरण पावते त्यांनी चाक फुटून अपघात होतात त्याबाबत खबरदारी अधिक महत्वाची आहे.

उपलब्ध आकडेवारी नुसार भारतात 75 टक्के वाहनचालक वाहनाच्या चाकातील हवेचा दाब तपासत नाही. यामुळे होणाऱ्या अपघातात दरवर्षी 250 ते 315 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे आणि आपण ही शिस्त लावून घेतली नाही तर येणाऱ्या काळातही असे मृत्यू होत राहतील.
50 मोठ्या शहरात 36 हजार चाकांमधील हवेचा अभ्यास एका विख्यात टायर कंपनीने केला. त्यामध्ये केवळ 22 टक्के चाकांमध्ये योग्य प्रमाणात हवेचा दाब होता. 44 टक्के चाकांमध्ये प्रमाणाबाहेर दाब आढळून आला तर उर्वरित 34 टक्के वाहनात कमी दाब होता. अखेरच्या दोन्ही प्रकरणात अपघात होण्याची शक्यता अधिक आहे.

वाहनाची स्थिती महत्वाची कारण ते यंत्र आहे. त्याचा सजग वापर आपण केला तरच आपण सुरक्षित…अन्यथा पुढे धोका आहे.

Related posts

अनुसया जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

बावधन यात्रेतील बगाड…(व्हिडिओ)

फलसूचक कर्म…

Leave a Comment