‘अवकाळीची व्याप्ती ८ जिल्ह्यात, गारपीटीचीही शक्यता ‘
माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ
शनिवार (ता.१६) ते बुधवार (ता.२०) पर्यंतच्या पाच दिवसात विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ,गडचिरोली तसेच मराठवाड्यातील नांदेड अश्या एकूण ८ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ अवकाळी (विजा, वाऱ्यासहित) पावसाची शक्यता जाणवते. ह्या पाच दिवसात ८ जिल्ह्यात व लगतच्या परिसरात काही ठिकाणी (विशेषतः१९ मार्चला अधिक) गारपीट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
खानदेशात केवळ ढगाळ वातावरण
खान्देशातील ३ जिल्ह्यात मात्र केवळ ढगाळ वातावरण जाणवेल. तर महाराष्ट्रातील उर्वरित २५ जिल्ह्यात मात्र वातावरण कोरडे असण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांनी विचलित होवु नये, असेच वाटते.
उष्णतेत वाढ
महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर ह्या चार जिल्ह्यात मात्र उष्णतेत चांगलीच वाढ झालेली जाणवणार असुन दुपारचे कमाल तापमान ३८ ते ४० तर कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात ३४-३७ डिग्री से. ग्रेडपर्यंतही पोहोचू शकते, असे वाटते.
मुंबईसह कोकणात मात्र अनपेक्षितपणे हा बदल जाणवणार नाही. तेथे दुपारचे कमाल तापमान केवळ सरासरीच्या खाली असुन २८-३० डिग्री से. ग्रेड दरम्यान असु शकते, असे वाटते.
पाऊस अन् बर्फवृष्टीही
एका पाठोपाठ असे दोन पश्चिमी झंजावात, १८ व २० मार्च (सोमवार व बुधवार) रोजी रात्री जम्मु काश्मिर, लेह-लडाख हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अश्या उत्तर भारतातील पश्चिमी हिमालयीन ३ राज्यात, प्रवेशतील. त्याच्या परिणामातून तेथे २० ते २२ मार्च दरम्यानच्या ३ दिवसात पाऊस बर्फवृष्टी, थंडी जाणवेल. परिणामी महाराष्ट्रात जरी कमाल तापमानात वाढ जाणवत असली तरी पहाटेचे किमान तापमानात कमालीची वाढ अजुन जाणवणार नाही.
इये मराठीचिये नगरी
मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.
👍 Facebook Page Follow करा
